Tuesday 14 December 2010

२-जी स्पेक्ट्रम आणि २६/११ एक कनेक्शन!!

 २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात कोणी किती हजार किंवा लाख कोटी रूपये खाल्ले याची मोजदाद फक्त त्या पैसे खाणार्‍यांनाच माहीती. पण एकूणच वर्तमानपत्रात ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत, तसेच विविध नेत्यांची अगदी वेळ ठरवून दिल्यासारखी वादग्रस्त वक्तव्य येत आहेत त्यावरून तर माझा हाच कयास आहे की २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि २६/११ चा हल्ला यात नक्की काहीतरी कनेक्शन आहे. कसं ते बघुयात.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळा हा नक्की काय आणि कशामुळे झाला ते समजून घेणं क्रमप्राप्त आहे. माझ्या अल्प बुद्धीनुसार मला समजलेलं २-जी घोटाळ्याचं सोप्या भाषेतील स्वरूप म्हणजे सरकार तर्फे कोणतंही काम जेव्हा एखाद्याला द्यायचं असेल तर टेंडर म्हणजेच निविदा मागवल्या जातात. २-जी स्पेक्ट्रम म्हणजे आपल्या देशात मोबाईलच्या प्रचंड वाढलेल्या वापरामुळे उपल्ब्ध स्पेक्ट्रम (बॅंडविड्थ) अपूरी पडत होती. म्हणून दुसर्‍या जनरेशनची म्हणजेच अधिक बॅंडविड्थ मोबाईल कंपन्यांना देऊ करणे म्हणजे २-जी स्पेक्ट्रम देणे. आता हे अशा पद्धतीने होतं की ज्या कंपन्या अशी बॅंडविड्थ पुरवतात त्यांना अधिक क्षमतेचे भले मोठे टॉवर्स उभे करावे लागतात. त्यासाठीच सरकार त्यांच्या कडून पैसे घेते (एक गठ्ठा). मग त्या कंपन्या भारतातील मोबाईल कंपन्यांना ती बॅंडविड्थ विकतात. भारतीय मोबाईल कंपन्या अधिकाधिक वेगवान कनेक्शन पुरवून ते लोकांकडून वसूल करतात. सरकार ज्यांच्याकडून पैसे घेते या कंपन्या मुख्यत: विदेशी आहेत. आता २-जी स्पेक्ट्रम च्या बाबतीत सरकारने निविदा मागवायच्या होत्या पण स्पेक्ट्रमची किंमत आधीच्याच भावाने अत्यंत कमी दर घेऊन विकली गेली. निविदा तर काढलीच नाही पण जो पहिला आपलं बजेट समोर ठेवेल त्याला ते दराची कोणतीही चौकशी न कराता दाखवलेल्या दराने विकलं गेलं. त्यानंतर थोड्याच दिवसात लक्षात आलं की त्या कंपन्यांनी आजचा दर न लावल्याने सरकारचं काही लाख कोटींचं नुकसान झालं. कारण त्यांनी आणि भारतातील मोबाईल कंपन्यांनी यात प्रचंड पैसा कमावला. आता ह्या असल्या आतबट्ट्याच्या व्यवहारासाठी (जेव्हा चोर पकडला गेला तेव्हा) फक्त माजी केंद्रीय मंत्री एकटेच जबाबदार कसे? ते त्याच खात्यात मंत्री होते म्हणून त्यांची मान अडकलेली, सोडवणं अशक्य. म्हणून ते बळीचा बकरा झाले. बाकीच्यांचं काय? 

त्यापाठोपाठच कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रात असलेले सत्ताधारी यांच्यातील दलाल (फिक्सर) नीरा राडीया आणि भारतीय उद्योग जगताचे अनभिषिक्त सम्राट रतन टाटा यांचं खासगी संभाषण बाहेर आलं. टाटांनी "राजा" यांनीच दूरसंचार मंत्री बनावे असा आग्रह का धरला याचं आपल्या सामान्य बुद्धीला उत्तर मिळत नाही. साधारण एक महिन्यापूर्वी लोकसत्तामध्ये रतन टाटांच्या फाउंडेशनने २६/११ च्या हल्ल्यातील पीडीतांना कशी मदत केली आहे याचे वर्णनच लिहून आले होते. त्यांनी केवळ ताज आणि ट्रायडंट पुन्हा एक वर्षात उभेच नाही केले तर हल्ल्यात ताजच्या ज्या कर्मचार्‍यांना प्राण गमवावे लागले किंवा जखमी व्हावे लगले अशांच्या कुटुंबियांना सढळ हाताने मदत केली आहे. ते येवढं करूनच थांबलेले नाहीत तर सी एस टी हल्ल्यात पीडीत अनेकांना सढळ हाताने मदत केली आहे. आता जागतिक मंदीच्या काळात, २६/११ च्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झालेलं असताना देखिल टाटा उद्योग समूहाला इतका खर्च परवडतो तरी कसा? म्हणजेच केंद्रातील कॉंग्रेस सरकार आणि टाटांसारख्या इतर उद्योग समूह भारतीय आणि विदेशी यांच्या एखादा छुपा करार झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच २-जी स्पेक्ट्रम मध्ये कॉंग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ठरवून राजा यांना बळीचा बकरा बनवलं. संयुक्त संसदीय समीतीच्या चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळत आहेत. जर का कॉंग्रेसचे नेते यात गुंतलेले नाहीत तर जेपीसी चौकशी करण्यास विरोध का? सगळ्यांचंच बिंग फुटेल म्हणून? मग जनतेचं या मोठ्या गोष्टींपासून दुर्लक्ष होण्यासाठी उगाचच वादग्रस्त विधानं करून सगळ्यांचंच लक्ष वेगळीकडेच वेधायचा प्रयत्न करायचा. कदाचित २-जी स्पेक्ट्रमचं जहाज कधी ना कधीतरी फुटणार हे माहीत असल्यानेच त्याआधी राष्ट्रकुल घोटाळे, आदर्श, गुलमोहर इमारतींचे घोटाळे आधी बाहेर काढले. टाटा समूहाचं झालेलं नुकसान वेगळ्या प्रकारे भरून आणलं कॉंग्रेसने आणि त्याच बरोबर टाटांच्या गळ्यात दी बीगेस्ट फिलॉन्थ्रॉपीस्ट इन इंडीया अशा उपाधीची (अनौपचारिक) माळही पडली आहे. सामान्य जनता, चाकरमाने, करदाते यांचे काय? त्यांची स्थिती काही सुधारली नाही. उलट त्या क्रूरकर्मा कसाबला वाट्टेलते बोलू देण्यासाठी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न होता उगाचच खटल्याचा, अपिलाचा फार्स चालू आहे. आणि हे सगळं देखिल पुन्हा करदाते आणि जनसामान्य यांच्याच खिशातून.
रात्र वैर्‍याची आहे.

Saturday 11 December 2010

नाईट अ‍ॅट द म्युझीयम (भाग २)!!

लॅरी डेली, की जो दोन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मध्ये सिक्युरिटी गार्ड असतो, आज डेली सर्विसेस या डायरेक्ट रिस्पॉन्स टेलिव्हिजन कंपनीचा सर्वेसर्वा झालेला असतो. या कंपनी मार्फत लॅरी त्याच्या सिक्युरीटी गार्ड असतानाच्या अनुभवांवर आधारित नाविन्यपूर्ण अशा गोष्टी बनवून विकत असे. दोन वर्षांत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावण्यात आणि भरपूर पैसे कमावण्याच्या नादात, लॅरीला म्युझियम मध्ये जायला वेळच मिळालेला नसतो. एका लाईव्ह शोमध्ये त्याच्या म्युझियममधील सिक्युरिटी गार्डच्या नोकरीचा उल्लेख होतो आणि म्युझियमची तीव्रतेने आठवण झाल्याने तो तातडीने  म्युझियमला भेट द्यायला जातो. म्युझियममध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत असताना लॅरीची तिथल्या सगळ्या एक्झीबीट्सशी दोस्ती झालेली असते. तिथे गेल्यावर त्याला समजतं की म्युझियम डागडुजी आणि नाविन्यपूर्ण बदलांसाठी बंद होतं आहे आणि तिथल्या प्रदर्शनात मांडलेले लहान मोठे तसेच पूर्वीच्या विविध जातीजमातींचे पुतळे, प्राणी यांना वॉशिंग्टन येथील स्मिथोनियन इन्स्टीट्युट मध्ये हलवणार आहेत. संग्रहालयात नाविन्य आणण्यासाठी यातील बर्‍याच पुतळ्यांची जागा इंटरअ‍ॅक्टीव्ह हॉलोग्राम घेणार असल्याने अशा पुतळ्यांचं अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हेसुद्धा त्याला समजतं. यासगळ्यांत  इजीप्शीअन राज्यांतील फाराओह अखमेनरहाची एक सोन्याची टॅबलेट असते की जिच्यामधील जादूई शक्तीमुळे सूर्यास्तानंतर सर्व पुतळे जिवंत होऊन सकाळी सूर्योदयापर्यंत म्युझियम मध्येच जीवंतपणे वावरत असत. ती टॅबलेट आधीच्याच म्युझियममध्ये राहणार असल्याने जे पुतळे वॉशिंग्टनमधील संस्थेत हलवले जाणार ते कधीच पुन्हा जीवंत होऊ शकणार नाहीत याची त्यासगळ्यांना मोठी खंत असते. दुसर्‍या दिवशी जेव्हा हे सगळे पुतळे वॉशिंग्टनच्या स्मिथसोनिअन संस्थेत हलवले गेल्यावर लॅरीला त्यातील जेडेडीहचा फोन येतो की डेक्स्टरने अखमेनरहाची टॅबलेट चोरून आणली आणि अतिशय क्रूर म्हणून कुप्रसिद्ध असलेला फाराओह कहमुनराह (अखमेनरहाचा मोठा भाऊ) पुतळ्यांवर चाल करून आला आहे. काळजीपोटी लॅरी वॉशिंगटनला जातो आणि त्यासगळ्या पुतळ्यांना ज्या तळघरात ठेवलेलं असतं तिथे पोहोचतो. लॅरीच्या हातात टॅबलेट आल्यावर नेमका सूर्यास्त होतो आणि टॅबलेटच्या पॉवर मुळे त्याठीकाणी असलेले सगळे पुतळे जिवंत होतात. त्यातच नेपोलिअन, इव्हान टेरीबल आणि इतर दुष्टप्रवृत्तीच्या नेत्यांना सोन्याच्या टॅबलेट्च्या मदतीने जग जिंकण्याचं अमिष दाखवून फाराओह कहमुनराह लॅरीवर हल्ला करतो आणि टॅबलेट हस्तगत करतो. टॅबलेटचा आधीचा कोड वर्ड बदलेला असल्याने कहमुनराहला टॅबलेटचा उपयोग त्याची अंडवर्ल्डची सेना बाहेर काढंयासाठी होत नाही. त्यामुळे जेडेडीहला ओलीस ठेऊन लॅरीला त्याचा नवा कोडवर्ड शोधून काढण्यास सांगतो. हा कोड शोधत असताना लॅरीला एमिली एअरहार्ट, अब्राहम लिंकन, आईनस्टाईन्स, नील आर्मस्ट्रॉंग यांसारखे अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व भेटतात आणि त्याला नवा कोड वर्ड शोधायला मदत करतात. एमिली एअरहार्ट लॅरीच्या मनातील मूलभूत गोंधळ नेमका पकडते आणि आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पॅशनेटली करावंसं वाटतं तेच करावं हा मंत्र नकळत देऊन जाते. नवा कोडवर्ड म्हणजे पाय या ग्रीक अक्षराची गणिती किंमत असते. जेडेडीहला वाचवण्यासाठी लॅरी ती सोन्याची टॅबलेट नव्या कोड वर्ड सकट फाराओह कहमुनराहकडे सूपूर्द करतो. फाराओह कहमुनराह आधी कबूल केल्याप्रमाणे जेडेडीहला न सोडता लॅरीलाच पकडतो. अंडरवर्ल्डची आर्मी आल्यावर नक्की काय होतं? लॅरी त्याच्या पुतळ्यांना वाचवण्यात  यशस्वी होतो का? लॅरी त्याच्या पॅशनचं काम करण्यात यशस्वि होतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाईट इन द म्युझियम (भाग २) हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाच्या सुरूवातीपासून असं कुठेही जाणवत नाही की ह्या चित्रपट कथानकाचा पहिला भाग आधीच प्रदर्शित झाला आहे. फक्त या भागात मला एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की जी पहिल्या भागात असतील. पहिला म्हणजे त्या टॅबलेटचा जुना कोड वर्ड कसा बदलला? आणि अखमेनरहाची कथा की जी त्या टॅबलेटची पार्श्वभूमीपण सांगत असणार. त्यामुळे पूर्ण चित्रपट पाहील्यावर पहिला भागही किती मजेशीर असेल आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं काय असतील याची उत्सुकता लागून रहाते. नाईट इन द म्युझियम या चित्रपटाचे दोनही भाग अमेरिकन चित्रपट क्षेत्रातील साहसी विनोदी (अ‍ॅडव्हेन्चर कॉमेडी) यासदरात मोडतात. आपल्याला जे मनापासून करायला आवडतं तेच करावं म्हणजेच इंग्रजीत फॉलो युवर हार्ट)  त्याचप्रमाणे गोष्टी जुन्या झाल्या तरी त्यांचा योग्यअसा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसा करता येऊ शकतो हे दोन संदेश देणारा हलका फुलका चित्रपट पाहताना जाम मजा येते. 

Thursday 25 November 2010

पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों"!!

दिवाळीच्या सुट्टीत वाचण्यात आलेल्या पुस्तकांत एक पुस्तक श्रीमती विनीता कामटे यांचं "टू द लास्ट बुलेट" हे एक. ते वाचल्यानंतर पुन्हा एकदा सगळं २६/११ डोळ्यांसमोर उभं राहीलं. २७ नोव्हेंबरला सकाळी साडे सहा वाजता नेहमीच्या सवयी प्रमाणे चहा पीतांना आज तक चॅनल लॅपटॉपवर लावला. एक महिनाभर मालेगाव बॉंब स्फोट तपासा संदर्भात दरवेळी काही ना काही ब्रेकींग न्यूज शीळी आणि खर्‍या अर्थाने ब्रोकन होईपर्यंत आजतक वर दाखवत असत. त्यामुळे हेमंत करकरेंचा चेहरा एकदम ओळखीचा झाला होता. त्यांच्याच नावाची ब्रेकींग न्यूज होती. न्यूज सारखी हलती असल्याने आणि ढॅण ढॅण पार्श्वसंगीतामुळे माझं लक्ष सर्व प्रथम जॅकेट घालतानाचा करकरेंचा शॉट दाखवत होते त्यावरच गेले. मग पुढचा शॉट हॉटेल ताजचा की जिथे गोळ्यांचे आवाज आणि कॅमेर्‍यांच्या आडव्या फ्रेम्स. काही आकलन करण्याचा प्रयत्न चालू असतानाच ढॅण ढॅण मधून मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी ऐकायला आली आणि पाठोपाठ हेमंत करकरे आणि अजुन दोन पोलीस अधिकारी, तसेच काही पोलीस शिपाई शहीद झाल्याची बातमी! तेवढ्यात सी एस टी रेल्वे स्थानकाचा शॉट. रक्ताची थारोळी आणि कण्हण्याचे आवाज. पहिले घरी फोन करून बातमीच्या सत्यासत्यतेची शहानीशा करून घेतली, मुंबईतील ओळखीचे आणि नातेवाईक यांना फोन करून पुन्हा खात्रीकरून घेतली. त्यातच बातमी आली की एक अतिरेकी जीवंत पकडला गेलाय आणि त्याचा साथीदार मारला गेलाय. मग त्याच दोघांनी सी एस टी मध्ये कसा अंदाधुंद गोळीबार केला त्याची सीसी टीव्ही फुटेजेस दाखवणं चालू. युद्धभूमी कशी असते, काश्मीरमधील लोक नक्की कशा परिस्थितीला सामोरे जात असतील याचा ट्रेलरच बघायला मिळत होता......न्यूज चॅनल वाल्यांच्या कृपेने (?).   
येवढे उत्तम क्षमता आणि शौर्य असलेले पोलीस अधिकारी अचानकपणे हल्ल्याच्या सुरूवातीलाच एकत्रितपणे एकाच ठीकाणी मारले जातात हेच मूळात अतिशय अस्वस्थ करून टाकणारं होतं. मुंबई पोलीस आयुक्तांकडून चित्रं असंच रंगवलं गेलं की हे तिघेही त्यांच्या स्वत:च्या हलगर्जीपणामुळे मारले गेले. पण त्या रात्री कामा हॉस्पीटलच्या गल्लीत नेमकं काय झालं हे विनीता कामटे यांनी पुराव्यांसहित दिलं आहे. खरी चूक ही कंट्रोलरूम मध्ये बसलेल्या राकेश मारीया यांची आहे. आता त्यांनी तसं का केलं याला कोणीच उत्तर देत नाहीये. उलटपक्षी राकेश मारीयांना मामला थंडावल्यानंतर बढतीच दिली गेली. का? कशासाठी? तर २६/११ च्या अतिशय महत्त्वपूर्ण हल्ल्याच्यावेळी स्वत: कंट्रोलरूममध्ये सुरक्षीत बसून, अतिशय शूरपणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता परिस्थिती हाताळायला निघालेले ते बेडर अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे शिपाई यांना अतिशय चुकीची माहीती पुरवणे, तसेच जख्मी अधिकार्‍यांना, शिपायांना कोणतीही मदत वेळेवर न पोहोचवणे हे सगळं केल्यामुळेच त्यांना ही बढती दिली गेली. हेमंत करकरेयांनी घातलेलं बुलेटप्रुफ(?) जॅकेट अतिशय तत्पर असण्याचा लौकिक असलेल्या मुंबई पोलीसांकडून अचानक गायब होतं? आणि त्या क्रूरकर्मा कसाबला फाशीची शिक्षा होऊन सुद्धा त्याला अजुनही फाशी दिली गेली नाही. कदाचित अजुन एका अपहरण नाट्याची वाट बघणार म्हणजे एका बरोबर एक फ्री या स्कीमने अफजल गुरू बरोबर कसाब फ्री किंवा कसाब बरोबर अफजल गुरू फ्री. 
ज्या तुकाराम ओंबाळेंनी स्वत:च्या छातीवर आणि अंगावर कसाबच्या गोळ्यांचा वर्षाव झेलत कसाबला पकडून ठेवलं केवळ लाठीच्या जोरावर. ........केवढी मोठी शौर्याची गोष्ट. त्या कसाबला ताबडतोब फाशीची शिक्षा अंमलात आणूनच तुकाराम ओंबाळे आणि बाकीचे शहीद अधिकारी आणि एन एस जी जवान यांना खरा न्याय मिळेल. पण सगळीच पोपटपंची चालू आहे. मेजर उन्नीकृष्णन संदर्भात अतिशय अपमानकारक असा उल्लेख  केलेल्या केरळच्या मुख्यमंत्र्यांचं विधान संतापजनक असलं तरी अजुनही ते केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशी विसंगती का? चोर सोडून सन्याशाला फाशी का? आपल्याकडच्या राजकारण्यांना हे कधी उमजणार? त्यांच्या स्वत:च्या घरात घुसून अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालायला हव्यात म्हणजेच कदाचित जाग आली तर येईल. देशहित हेच सर्वप्रथम बाकी सगळं दुय्यम असं कधी होणार? आपण कमीत कमी या शहीदांच्या शौर्याची आठवण ठेवायला हवी आणि लगोलग कसाब, अफजल गुरू यांना फाशीची अंमलबजावणी केली जावी यासाठी सरकारवर दबाव टाकला जावा. एकवेळ दगडाला पाझर फुटेल, वाळू रगडल्यावर तेलही गळेल पण या राजकारणी लोकांचा भ्रष्टाचार आणि अल्पसंख्यांकांचं लांगूनचालन कधीच संपणार नाही असंच वाटतंय.
असा काही हल्ला झाला की सगळे अगदी आपापली भूमिका ठरवून दिल्यासारखे वागतात. अतिरेकी हल्ला झाला की राजकारणी "आम्ही हे सहन करणार नाही" च्या आरोळ्या उत्तर-पश्चिमेकडे बघून ठोकतात, तर संधीसाधू राजकारणी यासाठी हिंदूत्त्ववादी संघटनाच कशा जबाबदार आहेत याचा राग आळवतात. अतिशय थंड जनता आपल्या असमर्थतेचं प्रदर्शन ठीकठीकाणी मेणबत्त्या लावून करते......मग या मेणबत्ती लगाव कार्यक्रमात अगदी मोठमोठे बॉलीवुडचे तारे, उद्योगपती सहभागी होतात. ज्यांनी जीवन मृत्युचा थरार अनुभवलेला असतो ते सामान्य नागरीक आपापल्या रोजीरोटीच्या मागे लागतात.  हे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षं पंधरा ऑगस्ट पांढरे शुभ्र किंवा खादीचे कपडे घालून तिरंगा हातात घेवून प्रभात फेर्‍या काढत निघणं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला ब्रिटीशांवर आगपाखड करून मोकळं व्हायचं, नंतर हळू हळू चौकांत रांगोळ्या आणि मोठा ध्वनीवर्धकांचा संच बडवणं, पुढे पुढे तर पंधरा ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन अशी दिवसांची आदलाबदल करणं....या स्वतंत्र भारताच्या प्रजेने आपल्याच सत्तेत (??) अजून एक-दोन सुट्ट्या उपभोगणं.........असंच काहीसं वाटतं.
सत्तापिपासू, भ्रष्ट राजकारणी; मदांध आणि पैशासाठी हपापलेले उद्योगपती विविध अधिकारी, तळहातावर प्राण ठेवून सीमेवर घुसखोर आणि सीमेच्या आत अतिरेक्यांशी लढणारे सामान्य जवान; स्वत:तच मशगुल असलेली जनता. खूप अस्वस्थ वाटतं. पूर्वी लता मंगेशकरांचं "ऐ मेरे वतन के लोगों" गाणं कुठुनही ऐकायला आलं की डोळ्यात पाणी उभं रहात असे. छाती एका वेगळ्याच अभिमानाने भरून येत असे. आता डोळ्यात पाणी उभं रहातं पण छातीत भिती आणि काळजी यांचं एक विचित्र मिश्रण असलेली भावना असते.  पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों" या गीताने काळजाला हात घालण्याची वेळ आली आहे. आहे का कोणी असं की जो/जी हे करू शकेल?
या सगळ्या निराशावादी पार्श्वभूमीवर शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या कन्येने आणि कुटुंबीयांनी दाखवलेले दातृत्त्व थोर आहे. खालील बातमी वाचल्यावर उर अभिमानाने भरून आला. यातून भूखंडंचे श्रीखंड खाणार्‍या आणि सत्तेची मलई चाटणार्‍या राजकारणी लोकांना काही शिकता येईल?

Sunday 21 November 2010

विक्रम - घोटाळ्यांचे आणि निर्लज्जपणाचे!!

राष्ट्रकुल खेळांतील भ्रष्टाचाराची नांदी झाली आणि जणूकाही सगळ्या विक्रमी घोटाळ्यांचा बांध फुटला आणि सगळे सरकारी पोतड्या सोडून पटापटा बाहेर पडले. आता एक बाहेर पडल्याचा परिणाम म्हणून बाकीचे बाहेर आले की ते सहजच बाहेर पडले हा एक संशोधनाचा मुद्दा असू शकतो. पण अशा संशयास वाव आहे. कलमाडी राष्ट्रकुल मधे येवढे घोटाळे करूनही सध्या चीनमध्ये भरलेल्या एशियाडमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत यातच सगळं आलं. मग ती कारवाई वगैरे बघुहो. काय घाई आहे. कदाचित कलमाडींवर कारवाई करणार असं सांगतानाच दबक्या आवाजात त्यांच्या कानात ही देखिल कुजबुज गेली असण्याची शक्यता आहे....की "कलमाडी तुम्ही निश्चिंत असा. आहो तुम्ही येवढं खाल्लंय तर किमान तोंड देखलेपणाकरता तरी आम्हाला तुम्हाला दूर ठेवलंच पाहीजे. तुम्ही निवांत चीन मधील एशियाड मध्ये तुमच्या (आणि आमच्या) मनी भोजनाची बोली लावा. इकडे आम्ही एकसे एक विक्रमी घोटाळ्यांचे बॉम्बगोळे टाकतो. आहो जनतेची स्मरण शक्ती इतकी वाईट आहे की आपल्याला काळजीचं कारणच नाही. आपण एकसे एक विक्रमी घोटाळ्यांच्या आवाजाने लोकांचे कान बधीर आणि डोळे दीपवून टाकू. म्हणजे जनतेची तसेच विरोधी पक्षांची अवस्था कोणत्या घोटाळ्याचा निषेध करू आणि कोणाला खरंच दोषी मानू अशी संभ्रमित होईल. मग आम्ही मि क्लीनना व्हॅक्युम क्लीनर सहित पाचारण करू.......पक्षाला क्लीन करण्यासाठी. तोपर्यंत जनता अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे निर्माण झालेल्या तसेच मा कृषीमंत्र्यांनी वेळीच साठेबाजांना विविध विधानं करून आगाऊ सूचना दिल्यामुळे निर्माण झालेल्या महागाईचा विचार करत जीवनाचं रहाटगाडगं ओढायला सुरूवात करेल. कोणाला येवढा वेळ आहे लक्षात ठेवायला आणि जाब विचारायला?" झाले कलमाडी या कानमंत्राने एकदम सुखावले आणि बिनधास्तपणे चीनला पुढची बोली लावण्यासाठी गेले.
इकडे आदर्शचं भूत कोणी बाहेर काढलं हे अगदीच ओळखता येतंय. पण ती व्यक्ती हे विसरली की आपण शेखचिल्लीपणा करायला जातो आहोत. पण म्याडमचा वरदहस्त इतका जबरदस्त आहे की लगेच.....शूर आम्ही सरदार (म्याडमचे) आम्हाला काय कुणाची भिती? म्हणूनच येवढा २६/११ चा हल्ला झाल्यावर लोकांना दाखवण्यासाठी जरी त्यांना राजीनामा द्यावा लागला तरी पुनर्वसन योजनेआंतर्गत त्यांना केंद्रीय मंत्रीपद बहाल केले गेले.
कारगीलमध्ये शहीद झालेल्या वीरांच्या विधवांसाठी देण्यात येणार्‍या घरांच्या जागेवर चक्क राजकीय तसेच लष्करातील अधिकारी सगळेच मिळून डल्ला मारतात. भ्रष्टाचाराचा इतका कडेलोट की नेव्हीची जागा असली तरी त्यांच्याकडून ना-हरकतीचं पत्रं मिळालंय हे खोटंच भासवून मजल्यांवर मजले इतके चढले की शेवटी नेव्हीच्या सुरक्षीततेचा धोका निर्माण झाला. किती आदर्शपणे हा सगळा घोटाळा घडवून आणला आहे नाही. कोणाच्या विरूद्ध बोलण्याची सामान्य जनतेला हिंमत नाहीच. महाराष्ट्रात भूखंडाचे श्रीखंड चापण्याची सुरूवात शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासूनच चालू झालेली आहे. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्त्वात नव्हती तेव्हाची गोष्ट आहे. केंद्रीय मंत्रीपदी असताना सध्याचं लवासा प्रकरणही नारायण राण्यांमुळे दाबलं गेलंय. १८ जूनलाच मटा मध्ये एक बातमी वाचली की मुंबईत सरकारी निवासाचा लाभ घेणार्‍या आय ए एस अधिकार्‍यांनी जुहु येथे "वसुंधरा" या सहकारी हौसिंग सोसायटीत अतिशय कमी दरात चांगल्या भागातले फ्लॅट्स आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. आणि त्यातील अनेक जणांनी तर स्वत: सरकारी निवास स्थानात राहून  वसुंधरा मधील फ्लॅट्स मध्ये भाडेकरू ठेवले आहेत. मध्येच टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा बाहेर आला की जो भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. कितीतरी लाख कोटी रूपयांचं शासनाचं नुकसान झालं. टू-जी स्पेक्ट्रमची विक्री करताना, निविदा मागवणे, तसेच त्यावर चर्चा घडवून आणून योग्य त्यादरात टू-जी स्पेक्ट्रम विकणं अपेक्षित होतं. पण म्हणतात ना पैशाची चटक जात नाही. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री यांनी सरळ सरळ जो पहिल्यांदा बोली लावेल त्याला अतिशय कमी किंमतीत टू-जी स्पेक्ट्रम विकले. काही वर्षांनंतर आता थ्री-जी स्पेक्ट्रमची गरज पडल्याने त्याची विक्री व्यवस्थित निविदा मागवून केली. टू-जी स्पेक्ट्रम विकल्यावर योग्य दर न घेतल्याने सरकारी तिजोरीचे नुकसान झाले.
भारतीय राजकारणी आणि नेते मंडळी यांनी तर भ्रष्टाचार, घोटाळे आणि निर्लज्जपणा यांचे प्रचंड मोठे विक्रम करण्यात गुंतले आहेत. एका मागून एक भ्रष्टाचार बाहेर येत असल्याने सामान्य जनतेला नक्की कशाचा पाठपुरावा करून दोषींवर कारवाई करावी हेच सूचत नाही. तिथंच सगळं संपतं. येवढं सगळं होउन देखिल मेरा भारत महान! "जय हो" भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांचा. 

Friday 12 November 2010

पीपली लाईव्ह



जेव्हा एखाद्या चित्रपटात गोष्ट किंवा कथेची मांडणी हीच हीरो असते आणि बाकीचे काम करणारे बाजूल पडतात....तेव्हा ते खरं पडद्यामागच्या टीमचं यश असतं. पीपली लाईव्ह मध्ये आमीर खानचं दर्शन असंच होतं. पीपली लाईव्ह खरंतर तसा उशीराच पाहण्यात आला. पण चित्रपट संपल्यानंतर पहिलं वाक्य ओठांवर आलं तेच: "आमीर खान झिंदाबाद". चित्रपटाचा विषय तसा गंभीर! म्हणजे शेतकरी आत्महत्त्यांचा. संपूर्ण चित्रपट प्रचंड विनोदी अंगाने पुढे सरकत जातो. एखादा निष्णात डॉक्टर जसा पेशंटच्या घशाखाली कडू कडू औषध गोड आवरणाच्या माध्यमातून उतरवतो अगदी तसाच आमीरखानने इतका गंभीर विषय पण विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे. हीच तर प्रसिद्ध आमीरखान स्टाईल! जेवढे मला दिल चाहता है, तारे जमीन पर, थ्री इडीयट्स हे त्याचे चित्रपट आवडले होते तेव्हढाच पीपली लाईव्ह पण आवडला. चार्ली चॅपलीनच्या विनोदाला जशी दु:खाची झालर असायची, प्रत्येक विनोदी चित्रपटात काही ना काही गंभीर संदेश असायचाच तसंच आमीर खानचं आहे. प्रसारमाध्यमांचं सध्याचं अतिरेकी रिपोर्टींग आणि त्यांची समाजच्या सर्व थरांत असलेली दहशत अगदी अचूक टीपली आहे. मला तर पदोपदी दिपक चौरासिया आणि बरखा दत्त यांचीच आठवण येत होती. संधीसाधू राजकारणी, बिनडोक वार्ताहर कसे असतात त्याचप्रमाणे असवंदेनशीलता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींमध्ये कशी असते याचं सुयोग्य चित्रण पीपली लाईव्हमध्ये आहे. 
नथ्थु आणि बुधिया या दोन शेतकरी भावंडांची पीपली लाईव्ह ही कहाणी. त्यांचं वडिलोपार्जीत शेत बॅंकेचं कर्ज थकल्याने बॅंकेलाच विकावं लागणार असतं. त्यासाठी गवतील राजकीय नेत्याकडे जाऊन सुद्धा मदत मिळत नाहीच उलट आत्महत्त्या करून "आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना एक लाख रूपये शासनाकडून मिळतात" ही माहीती पुरवली जाऊन आत्महत्त्या करण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा नथ्थु आत्महत्त्या करणार ही बातमी एका स्थानिक वर्तमानपत्रात छापून येते त्यावेळी त्या वृत्तपत्रचा परवाना काढून घेतला जातो पण हीच बातमी जेव्हा इंग्रजी चॅनलचे लोक टीव्हीवर लाईव्ह दाखवतात तिथुन पुढे खर्‍या विनोदाला सुरूवात होते. नथ्थु आत्महत्त्या करतो का? तो मेल्यावर त्याच्या घरच्यांना शासनाकडून एक लाख रूपयाचा मोबदला मिळतो का? त्यातून कोणाच्या अयुष्यात किती फरक पडतो? त्यांचं वडिलोपार्जीत शेत वाचतं का? यासगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि आमीर खानला शाबासकी देण्यासाठी पीपली लाईव्ह हा चित्रपट नक्की पहावा. आपल्या मा (माजलेल्या) केंद्रीय आणि राज्यस्तरीय कृषीमंत्र्यांनी हा चित्रपट पाहून काय बोध घेतला हा एक संशोधनाचा मुद्दा बनु शकतो.

Monday 1 November 2010

चला उजळून निघुयात!


ह्यावेळी दिवाळी साजरी करताना एक पणती घरात आणि मनात आपल्या अशा बांधवांसाठी लावूयात की जे काही ना काही कारणाने कोणत्याच सणाचा आनंद उपभोगू शकत नाहीत. एक पणती विश्वशांतीसाठी, एक पणती आपल्या आदिवासी भागातील बांधवांसाठी, एक पणती आपल्या देशातील रस्त्यांवर राहणार्‍या जनतेसाठी, एक पणती वृद्धाश्रमात राहणार्‍या आजी-आजोबांसाठी, एक पणती देशातील लाखो अनाथ मुलांसाठी. आपल्याला फक्त एकच पणती लावायचीय या सगळ्यांच्यासाठी.......असे एक लाख लोक जरी निघाले तरी अशा लक्ष पणत्यांनी आपलं मन उजळून निघेल. खर्‍या दिवाळीचा आनंद मिळेल! फटाके लावून पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाबरोबरच आपण पैशांचाही अपव्यय करतो आहोत. त्यामुळे ह्यावेळी ते न करून आपण पैशाचा अपव्यय टाळू शकतो. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेऊयात. चला उजळून निघुयात!

उत्सव हा दिपावलीचा।
पावित्र्य अन मांगल्याच॥
स्मरून नाते मैत्रीचे।
मनी प्रेमभाव जपण्याच॥

उत्सवात दिपावलीच्या।
सारं काही आठवत॥
ज्योतीत पणतीच्या पाहताना।
नजरेत बालपण उभं राहत॥

त्या सार्‍या आठवणी।
दाटून आल्या या क्षणी॥
शब्दांतून अवतरल्या।
कवितेच्या रूपानी॥

समस्त वाचक आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिपावली आपल्या सगळ्यांना सुख, आरोग्य आणि समृद्धी देवो!

(या कवितेची पहिली दोन कडवी कुठेतरी वाचली होती. त्याला शेवटचं कडवं मी जोडलंय.)

Thursday 21 October 2010

मुक्त होणे...

छायाचित्र महाजालावरून साभार
(खालील उतारा श्री जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर आहे. मागे खूप वर्षांपूर्वी मी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राच्या मुख्य कार्यालयात गेले असताना तिथेच काच फलकात मला हा इंग्रजी उतारा दिसला. तो वाचल्यावर मला एकदम खूप काही गवसल्यासारखं वाटलं आणि मी तो माझ्या डायरीत लिहून घेतला. आजही मला अस्वस्थ वाटत असेल तर मी ताबडतोब हा उतारा वाचते आणि मन शांत होतं. असं काय आहे या उतार्‍यात? वाटलं तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावं. म्हणून हे भाषांतर करते आहे.)
*********************************************************************************
मुक्त (फ्री) होण्यासाठी आपल्याला आपल्याच आत असणार्‍या सगळ्या परावलंबित्वावर (डीपेन्डन्सी) मात करावी लागेल. जर आपल्याला हेच समजलं नाही की आपण असे इतरांवर अवलंबुन का आहोत तर आपण आपल्या परावलंबित्वावर मात करू शकणार नाही. आपल्या मुक्तीचा मार्ग हा आपण परावलंबी (डीपेन्डट) का आहोत हे समजलं तरच उघडेल नाहीतर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण मुक्ती म्हणजे काही फक्त एक प्रतिक्रीया नाही. पण प्रतिक्रीया म्हणजे काय? जर मी काही तुम्हाला लागेल असं बोललो म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तर तुम्ही माझ्यावर चिडाल. हे चिडणं म्हणजे प्रतिक्रीया की जी परावलंबित्वातुन जन्मलेली आहे. स्वातंत्र्य (इंडीपेन्डन्स) ही अजुन एक प्रतिक्रीया झाली. पण मुक्ती ही काही प्रतिक्रीया नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला प्रतिक्रीया म्हणजे नक्की काय हे समजत नाही आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपण कधीच मुक्त होणार नाही.
     एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? एखाद्या झाडावर प्रेम करणं किंवा एखाद्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणं किंवा एखाद्या पक्ष्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? जरी ते झाड तुम्हाला सावली, फळं असं काहीच देणार नसलं तरी ते तुमच्यावर अवलंबुन नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या झाडाची, त्या पाळीव प्राण्याची किंवा पक्ष्याची तुम्ही काळजी घेता, त्याला खाऊ-पिऊ घालता, त्याची नीगा राखता. यालाच प्रेम असं म्हणतात. आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही. आपल्यापैकी कित्येकांना हे असं प्रेम म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. कारण आपलं प्रेम हे मुख्यत: राग, लोभ, मोह, मद, मत्सर, भिती यांच्याशी निगडीत असतं. यामुळेच आपण आपल्या आतून प्रेम करून घेण्यावर पराकोटीचे अवलंबुन असतो. आपण फक्त प्रेम करून तिथेच सोडून देत नाही पण परतफेडीची अपेक्षा करतो आणि या अपेक्षेमुळेच आपण परावलंबी बनतो.
      म्हणून मुक्ती आणि प्रेम हे हातातहात घालून जातात. प्रेम ही काही प्रतिक्रीया नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमच्यावर प्रेम केलं तर तो एक केवळ व्यापार होईल, एक अशे गोष्ट की जी बाजारात खरेदी केली जाते. ते प्रेम नव्हे. प्रेम करणं म्हणजे त्याबदल्यात काही मागणं नव्हे. अगदी असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही काहीतरी देता आहात. अशाच प्रकारच्या निरपेक्ष प्रेमाला मुक्ती जाणून घेता येते. पण आपल्याला यासाठी शिक्षण मिळतच नाही. आपल्याला गणित, रसायनशास्र, भूगोल, इतिहास याचं शिक्षण मिळतं आणि तिथेच ते थांबतं देखिल. कारण तुमच्या पालकांची काळजी ही फक्त तुम्हाला चांगली नोकरी मिळणे आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे यासाठीच असते. जर त्यांच्याकडे पैसा असेल तर ते तुम्हाला परदेशात पाठवतील, पण सगळ्या जगासारखाच त्यांचाही हेतू हाच असतो की तुम्ही श्रीमंत बनावं, तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान असावं; जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता. कारण त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागते, अगदी निर्दयी व्हावं लागतं. पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतात की जिथे महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे पण प्रेम आजीबात नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखा समाज सतत संघर्षात आणि गोंधळलेल्या अवस्थेत जातो आहे. म्हणूनच आपल्या देशातील राजकिय नेते मंडळी, न्यायमूर्ती आणि तथाकथित आदरणीय विद्वान जरी सतत शांततेच्या गप्पा करत असले तरी त्या शब्दाला फारसा अर्थ प्राप्त होत नाही.
 **************************************************************************
 


Saturday 16 October 2010

स्वातंत्र्याचे लेखक - फ्रीडम रायटर्स!!

(छायाचित्र महाजालावरून साभार)
१९९२ साली लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीयामधील विविध वांशिक गटांमधील दंगलींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शिक्षण मंडळ, कॅलीफोर्नीया हे लॉस एंजलीस मधील एका नामांकीत शाळेत एक धाडसी शैक्षणिक अभ्यासक्रम चालू करते. इंटीग्रेटेड स्कूल प्रोग्रॅम असे त्या अभ्यासक्रमाचे नाव. ह्या अभ्यासक्रमाचा उद्देश हा फारसे शाळेत न गेलेले, काही कारणामुळे याआधीच शाळांना रामराम ठोकलेले, विविध कारणांमुळे तुरूंगात गेलेले, रस्त्यवर राहणारे अशा विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून त्यांना पुढचे शिक्षण घेण्यास उद्युक्त करणे हा असतो. या वर्गात विविध एथनिसीटी असलेली म्हणजेच कृष्णवर्णीय, कंबोडीयन, मेक्सीकन, हिस्पॅनिक, व्हाईट अशा विविध वंशांची मुलं-मुली असतात. या मुलांना शिकवण्यासाठी एक नवी अतिशय तरूण इंग्लीश शिक्षिका येते. हे काम तिने स्वेच्छेने स्विकारलेलं असतं कारण तिला या मुलांना शिकवण्यात रस असतो. पहिल्याच दिवशी शाळेची उपमुख्याध्यापिका तिला त्या मुलांची वर्गातील परिस्थिती आणि त्यांचे गुण याविषयी सूचना देऊन सावध करते. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा सोडून जाणे आणि शाळेची पत कमी होणे यासाठी या अभ्यासक्रमाच्या मुलांना जबाबदार धरलेले असते. त्यांना शिकण्याची इच्छाच नाहीये, त्यांना शिस्त नाहीये वर्गात कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते यासारख्या कानपिचक्या देऊनच उपमुख्याध्यापिका तिला तिचे शिकवण्याचे नियोजन बदलायला सांगतात. सुरूवातीचे काही दिवस वर्गात आणि वर्गाबाहेर अक्षरश: राडा म्हणजे प्रचंड मारामारी म्हणजे अगदी गोळीबाराच्या तयारीने मुलं येणं  इत्यादी होते. तिला त्यामुळे या मुलांना शिकायला प्रवृत्त कसं करायचं हेच लक्षात येत नसतं. त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यात अधिक रस निर्माण व्हावा म्हणून ती पुष्कळ प्रयत्न करते आणि शेवटी तिच्या लक्षात येतं की जोपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्याशी निगडीत, त्यांना समजून घेईल असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षणात रस वाटणार नाही. ती त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करते. त्यांना खेळांच्या माध्यमांतून, वेगवेगळी चांगली पुस्तकं वाचायला देणं, बाहेर ट्रीपला घेवून जाणं, मुझीयम्स ना भेटी देणं, बाहेर एकत्र जेवायला घेऊन जाणं असे अनेक नवनविन उपक्रम करते. यात शाळेकडून तिला कोणतीच मदत मिळत नाही कारण त्यांचं सगळ्यांचं मत असतं की ह्या मुलांना शिकवणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे.
    या सिनेमात एखादा चांगला शिक्षक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना शिक्षणात रस वाटावा यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवलं आहे. या चित्रपटातून अमेरिकेसारख्या सांस्कृतिक आणि  वांशिक विविधता असलेल्या राष्ट्रात या विविध गटांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र, नविन शैक्षणिक प्रयोग, शिक्षकांचं मानसशास्त्र, समूहाचं मानसशास्त्र यासगळ्याचं उत्तम दर्शन घडवलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्या मुलांसाठी ती इंग्लीश शिक्षिका काय काय करते, त्या प्रयोगांचा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर तसेच त्या शिक्षिकेच्या वैयक्तीक आयुष्यावर काय परिणाम होतो? त्यातील किती विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमांना जातात हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. चित्रपट १९९९ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असून त्याचे दिग्दर्शक आणि लेखक रीचर्ड लाग्राव्हेन्सी हे आहेत.
    योगायोगाची गोष्ट अशी की अशाच प्रकारची घटना १९९९ च्या सुमारास मी एका शाळेत शिकवत असताना माझ्या आयुष्यात घडून गेली. त्यासगळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या.  मी त्यावेळी आसाम मधील एका शाळेत गणित शिकवत होते. मलाही त्यावेळी एक आव्हान म्हणून आणि मुद्दाम अभ्यासात कच्च्या, आत्मविश्वास नसलेल्या, सर्व शाळेत डफर याच संबोधनाने परिचित असलेला वर्ग दिला होता. गंमत म्हणजे त्यांची तुलना कायम त्यांच्या पुढे एक वर्ष असलेल्या वर्गाशी केली जात असे. यासगळ्याचा परिणाम त्या वर्गाच्या मानसिकतेवर, आत्मविश्वासावर, अभ्यासावर, गुणांवर न झाला असता तरच नवल. मला त्यांना यासगळ्यातून बाहेर काढून जमेल तसं गणित शिकवायचं होतं. बरं तो वर्ग इयत्ता नववीचा वर्ग होता. म्हणजे मला त्यांच्यावर काम करायला जेमतेम एक वर्षाचा कालावधी होता. मला वर्गातील मुलांनी सांगीतलं की गेल्या दोन वर्षांत एकूण ८ गणिताचे शिक्षक बदलले आणि मी आठवी. अशाप्रकारे शिक्षक सोडून जाण्याने किंवा बदलल्याने त्याचा मुलांच्या मूलभूत संकल्पना निर्मितीवर प्रचंड वाईट परिणाम होतो. त्याचा प्रत्यय तर मला येतच होता. मी त्या वर्गाची क्लास टिचर होते. त्यासगळ्या प्रकारात अजुन एक मेख होती की एका स्थानिक टिचरला (की जो दोन वर्षांपूर्वी त्याच शाळेत शिकवत होता पण त्याच्या गैरवर्तनामुळे त्याला शाळेतून कमी केले होते) त्या शाळेत इंटरेस्ट होता. त्याला शाळेतल्याच काही शिक्षकांचीही साथ होती. म्हणूनच दोन वर्षांत त्याने ७ शिक्षकांना पळवुन लावलं होतं. मला मुद्दामच त्या ठीकाणी टाकलं होतं. हळूहळू विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करून, त्याचवेळी त्या स्थानिक शिक्षकाने केलेल्या काड्यांना तोंड देत मी माझं काम चालू ठेवलं. काही वेळा मुख्याध्यापिकांची साथ होती काहीवेळा नव्हती. एक-दोन वेळा मला धमक्या मिळाल्या की स्थानिक वर्तमानपत्रात तुमच्या बद्धल बदनामीकारक मजकूर छापू वगैरे पण मीही यासगळ्याला धैर्याने तोंड दिलं. आता मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं की तेवढं बळ मला माझ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जुळलेल्या बंधांमधुन मिळालं होतं. केवळ त्यांचं नुकसान होवू द्यायचं नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा येवढंच एक ध्येय डोळ्यांसमोर होतं. त्यावेळी केवळ अभ्यास आणि गणितच नाही तर मी अगदी त्यामुलांना राष्ट्रभक्तीपर गीतं सुद्धा शिकवुन गायला लावली होती. आमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळाच बंध निर्माण झाला होता. त्याचा शेवट फक्त एकाच प्रसंगात सांगते म्हणजे कल्पना येईल, मी ज्यावेळी पुण्याला परत यायला निघाले त्यावेळी पूर्ण वर्ग त्यांच्या गणवेषात मला सोडायला बस स्थानकावर आला होता. हे असलं दृष्य मी माझ्या आयुष्यात आणि त्या गावाने सुद्धा पहिल्यांदाच अनुभवलं होतं. अजुनही मी त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यातील अपेक्षित सुधारणा होण्यास मी एक निमित्तमात्र झाले ह्यातच मला आनंद वाटतो. नाहीतर आपण इतके सामान्य असतो की फारसं काहीच करू शकत नाही. असो.
"फ्रीडम रायटर्स" हा चित्रपट पाहीला नसेल तर जरूर पहा. एक उत्तम प्रतिचा उद्बोधक असा चित्रपट अशी मी त्याची गणती करते. चित्रपटाचं आणि त्या सत्य घटनेवर आधारित कादंबरीचं नाव फ्रीडम रायटर्स का आहे हे चित्रपट पाहील्यावरच समजेल.

Wednesday 13 October 2010

**रेशीमगाठी**


रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरेच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृती मध्ये या रेशीमगाठी बर्‍याच वेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो. लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी असंही म्हणताना आढळतात की लग्नाआधीच बरं होतं, लग्नं करून पस्तावलोय/पस्तावलेय इ.इ. जेव्हा एकत्र रहाणं अशक्यच होतं तेव्हा काहीजण कायद्याचा आधार घेवून वेगळे होतातही.....पण असं करून (खरं पाह्यला गेलं तर) त्यांचे प्रश्न कितपत सुटलेले असतात किंवा वाढलेले असतात हे त्यांच त्यांनाच ठावुक. लग्न न केलेले किंवा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमातून फारसं यश न लाभलेले, स्वत:चं स्वत:च न जमवता आलेले अनेक जण आजूबाजूला दिसतात. काही जणांची गाडी ही नको-ती/ हा नको तो असं करत करत लग्न करण्याच्या/जमवण्याच्या वयाच्या स्टेशन वरून कधीच सुटलेली असते. कारणं काहीही असोत हे सगळं आपल्याला आपल्या समाजात पहावयास मिळतं. वधुवर-सूचक मंडळांच्या नोंदवह्या आणि  मॅटर्निटी नर्सिंग होम्स मधील नोंदी (खर्‍या दाखवल्या तर) ह्या तर समाजाच्या खर्‍या प्रगतीचा आरसाच असतो. कारण संपूर्ण समाज जीवन वैयक्तिक जीवनाशी सांगड घालत तिथेच गुरफटलेलं असतं. वधू-वर सूचक मंडळांमधील नोंदवल्या गेलेल्या उपवर वधु-वरांसाठीच्या (अवाजवी) अपेक्षा असोत किंवा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या असोत हे सगळंच एकमेकांत बांधलं गेलं आहे. कितीही वैयक्तिक असा म्हटला तरी अतिशय सामाजिक आणि तितकाच ज्वलंत विषय. 
आपल्या सगळ्यांनाच उपवर अशा वधू आणि वर या दोघांच्या आणि त्यांच्या  आई-वडीलांच्या वाजवी-अवाजवी अपेक्षा माहिती आहेत त्यामुळे त्या इथे लिहीणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही. खरंतर अशा पद्धतीच्या अपेक्षा, त्यानंतर येणारा फोलपणा, लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे. काही जणांना लग्न म्हणजे उत्तमोत्तम दाग-दागिने, कपडे घालून विविध प्रकारच्या केशरचना करून स्टेजवर मिरवणे असंच वाटत असतं. उपवर मुला-मुलींच्या पालकांना त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातून मिळालेला बहुमूल्य शहाणपणा (??) आपल्या मुला-मुलींबरोबर वाटून घ्यावा, त्यांच्याशी याबाबतीत अतिशय मोकळेपणाने बोलावं असंच वाटत नाही. त्यामुळेच तर खरं ९९% प्रश्न निर्माण होतात/झालेले असतात. 
मागे काही वर्षांपूर्वी मला एका नेट-मित्राची इ-मेल आली होती. मला म्हणजे ती त्याने सगळ्यांनाच ग्रुपवर पाठवली होती. इ-मेलचं शीर्षक होतं अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड आणि तशीच काही अंशी कथाही जुळवली होती. पण मला यातली अ‍ॅलीस कोण आणि वंडरलॅन्ड काय हे लक्षात आल्याने त्याला प्रतिसादाची मेल  लिहिली......"आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो." मला ताबडतोब त्याचं उत्तर आलं, "माझ्या इतक्या सगळ्या संपर्कां मधुन, मित्र-मैत्रिणीं मधुन फक्त तूच माझी इ-मेल खर्‍याअर्थाने वाचलीस आणि समजून घेतलीस. मला उत्तर आवडलं". व्यक्ती विचारी असेल तर बर्‍याचवेळी हा सगळा विचार चालू असतो फक्त निर्णय घेण्यासाठी दोन शब्दांचं पाठबळ कुठलाही निर्णय न-सुचवता दिलेलं (हे महत्त्वाचं) लागतं. पण बहुतांशी उपवर मुलं-मुली या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीत. साहजिकच लग्न होवून आणि न होवून सुद्धा प्रश्न सुटत नाहीतच.
    पुण्यात साथ-साथ म्हणून परिचयोत्तर विवाह जुळवणारी एक संस्था आहे. वर संशोधनाची अपेक्षा कमी पण संस्थेविषयी कुतुहल अधिक म्हणून मी सुद्धा कधीतरी त्या संस्थेची पायरी चढले होते. मला तिथे दिला जाणारा एक फॉर्म बर्‍यापैकी भावला. म्हणजे त्याने वधु-वर शोधायला प्रत्यक्षपणे कितपत मदत होते ते माहीत नाही (कारण यात कितीही गणित आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो., आवडी-निवडी जुळणे, विचार जुळणे याची मोजदाद करून हिशेब करून लग्न जुळवता येत असतं तर चहापोहे काय वाईट?) पण स्वत:चे विचार स्वत:लाच समजायला, ते पक्के व्ह्यायला मदत होते हे नक्की. मला तर वाटतं सगळ्या उपवर मुला-मुलींनी अगदी पूर्णपणे साथ-साथ स्टाईल मध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा. त्यात पहिल्या टप्प्यात स्वत:च्या, इतरांच्या, आई-वडीलांच्या अपेक्षा लिहून काढाव्यात. (हा प्रयोग प्रामाणिकपणाने आणि स्वत:च एकट्याने करावा). मग त्यातील महत्त्वाच्या अशा दहा अपेक्षा शॉर्टलिस्ट कराव्यात. त्यांची पुन्हा एकमेकांशी तुलना करून पहावी म्हणजे एक असेल आणि एक नसेल तर काय वाटेल? इ. अशाप्रकारे तुलना केल्यावर त्या दहा अपेक्षा उतरत्या क्रमाने मांडाव्यात. त्यातील पहिल्या पाच अपेक्षा (म्हणजे याशिवाय चालूच शकणार नाही) पहाव्यात. त्यावर पुन्हा विचार करावा आणि मगच पुढे काय ते ठरवावं. मग अपेक्षां मध्ये अगदी काळ्या-गोर्‍या रंगा पासून ते घरची आर्थिक परिस्थिती, करीअर नोकरी ते बौद्धिक पातळी, सवयी, आवडी-निवडी (या सगळ्यां मध्ये केवळ नुसत्या अपेक्षाच ठेवून उपयोग नसतो तर स्वत: कडे सुद्धा तेवढ्याच चिकित्सेने आणि तटस्थपणे पहायला जमलं पाहीजे.......नाहीतर बर्‍याचवेळा अनेकजण नुसत्याच अपेक्षा करतात)याचा समावेश असावा.
    आता चष्मा नको ही एक महत्त्वाची (?) अट असते. मग एखाद्याला/एखादीला लग्नानंतर चष्मा लागला तर काय घटस्फोट घेणार? गंमतच आहे.  चोखोबांच्या "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा" ह्या शिकवणुकीचा पार बोर्‍या वाजवत लोकांना कायम बाह्य रंगाने काळी मुलगी नको असते.......मग एखाद्या गोर्‍या मुलीचं अंतरंग कितीही काळं असलं तरी......पत्रिका बघणे आणि त्यातून मंगळ आहे म्हणून नकार तर कांदेपोह्यांपर्यंतचा प्रवासच दुर्धर करून टाकतो तर काही जण मुलगी पाहिल्यानंतर मंगळ आहे असे कारण पुढे करतात. अगदी दोन एकाच जाती मधल्या कुटुंबांत सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात म्हणून मुलगा/मुलगी विशिष्ट जातीतीलच पाहीजे यासाठी हट्ट धरण्यात मतलब आहे की नाही हे आपणच ठरवावे. आहार हा काही जणांना कळीचा मुद्दा वाटू शकतो कारण शाकाहारी व्यक्तींना मांसाहार अजिबात चालतच नसेल (म्हणजे समोर सुद्धा पहावत नसेल) तर अवघड होवून बसतं. खरंतर पत्रिका पहाणे, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शहरं [पुण्यासारख्या शहरात (अमुकच पेठेत किंवा भागात), मुंबईत अमुक एकाच लाईनवर (वेस्टर्न दादर वगैरे उत्तमच पण बोरीवली, अंधेरी वेस्ट, चांगलं, मालाड ठाणा डोंबिवली चालेल शिवडी, सायन, चुनाभट्टी नकोच. पनवेल खूपच लांब आहे], परदेशातील स्थळे यांसारख्या इतर अनेक उपविषयांची अपेक्षा या अंतर्गत चर्चा करायची असल्यास प्रत्येकी एक एक प्रकरण सहज लिहीता येईल.
१) कांदेपोहे पद्धतीत काहीच मुद्दे एखाद्या व्यक्तीचे दिसू शकतात. उदा. बाह्यगोष्टी, शिक्षण, नोकरी (खरी  माहिती दिल्यास), घरची पार्श्वभूमी (जुजबी........प्रत्यक्ष लग्न करून घरात गेल्याशिवाय कोणाचेच खरे स्वभाव कळत नाहीत)
२) प्रेमविवाहात सुद्धा प्रेमाने आंधळे झाल्यामुळे काही गोष्टी दिसत असून न-दिसल्या सारख्या होतात आणि मग लग्नानंतर डोळे उघडू शकतात.
३) परिचयोत्तर विवाहात यातील काही धोके कमी असतात. आपल्याला व्यक्तीशी बोलता येतं (व्यक्ती प्रामाणिक असेल तर अनेक गोष्टी बोलून ताडता येऊ शकतात), व्यक्तीच्या देहबोलीवरून डोळ्यांच्या हालचालीवरून व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे समजू शकते.
४) रंग, रूप, नोकरी, पैसा, स्टेट्स, पत्रिका, राहण्याचे विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शिक्षण, सिनेमातील विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री सारखेच दिसणे, एखादा खेळ येणे, एखादी कला येणे, स्वयंपाक करता येणे, पैसे भरपूर कमवून आणावेत, अती शिकलेली आणि करिअरिस्टिक मुलगी नको, श्रीमंत आई-बापांची एकुलती एक असली तर चांगलं आहे, एकच भाऊ असेल तर आदर्श स्थळ नाही, एक बहीण चालेल पण जास्त बहिणीच आणि भाऊ नाही म्हणजे त्या मुलीची घोड चूक आहे (हे मुलींच्या बाबतीतले) तर मुलावर कोणाची जबाबदारी नको, स्वतंत्र फ्लॅट असल्यास प्राधान्य, स्वत:ची गाडी हवी, एकुलता एक मुलगा सोन्याहून पिवळं, एक बहीण उत्तम, एक भाऊ चालेल, जास्त भाऊ नकोतच (हे मुलांच्या बाबतीतले) यासगळ्या भाऊगर्दीत आरोग्य, स्वभाव, चारित्र्य ह्या गोष्टी हरवलेल्या असतात. आपण वरील गोष्टींचा विचार नक्की का करतो? लग्न हे कशासाठी करतात? म्हणजे आपल्याला सर्वार्थाने जोडीदार हवा असतो, त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. वरील मुद्दे हे विचार करण्यासारखे नक्कीच आहेत पण प्राधान्य क्रम नक्की कोणता असावा हे आपलं आपणच ठरवा. जो काही निर्णय घ्याल तो कुठल्याही फॅन्टसी मधे घेऊ नका. आयुष्याची सत्य खूप वेगळी असतात.
वरील अधिकाधिक मुद्द्यांमध्ये फारसा दम नसला तरी याच गोष्टीं मध्ये रेशीमगाठी अडकलेल्या असतात.  एक मात्रं खरं की जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे. त्यात एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम (केवळ शारीरिक आकर्षण नाही) हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. त्यात दोघांनी मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडणे, घरातील कामं वाटून घेणे या गोष्टी ओघाने आल्याच. त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते. ताणण्याने काहीच साध्य होत नसतं पण जोडून सामोपचाराने राहण्यातच खरी कसोटी आणि यश दडलेलं असतं हे महत्त्वाचं. दोघांनीही आपापल्या आणि एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन (घरच्यांनी सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं) दोन घरं खर्‍या अर्थाने जोडावीत. या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय  वस्तुनिष्ठपणे  या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे. स्वत:च्या प्राथमिकता स्वत:च ठरवून जबाबदारी घेण्यास शिकलं पाहीजे येवढंच मनापासून सुचवावंसं वाटतं.

Thursday 30 September 2010

अजि सोन्याचा दिनु!!



गेली कित्येक वर्षे रखडलेला अयोध्या वादग्रस्त भूमीचा निकाल रामाच्या बाजूने लागला आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजाडलाच! बर्‍याच वर्षांपूर्वी मी अयोध्येत गेले असतानाचा काळ, रामलल्लाची बाहेर एका तंबुत चाललेली पूजा सगळं सगळं आठवलं. स्वत:चं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी सीतामाईला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली तशीच कठोर परीक्षा रामलल्लाला स्वत:च्या जन्मभूमीचं अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी द्यावी लागली. अयोध्या-साकेत ही दोन जुळी शहरं, जुन्या काळातील. अयोध्येतील रामायण कालातील पाऊलखुणांमुळे आक्रमक त्याचं नाव नाही बदलू शकले. पण साकेतचं नाव मात्रं फैजाबाद ठेवलं गेलं आणि ते आजही तसंच आहे. आपण कधी जर अयोध्ये मध्ये गेलात तर फैजाबादला जरूर भेट द्यावीच लागते. कारण ते जिल्ह्याचं ठीकाण आहे. तिथे सगळीकडे दुकानांवर तुम्हाला साकेत हे नाव प्रकर्षाने दिसेल आणि मग लक्षात येईल साकेत या नावाचं रहस्य.....फैजाबाद या नावाखाली दडपलं गेलेलं. जरी बाबराने तिथलं श्रीरामजन्मभूमीचं मंदीर तोडून मुस्लीम धर्माच्या विरूद्ध पद्धतीने घाईघाईत डोंब उभे केले पण मूळ बांधकामाचे काही पॅटर्न्स तसेच ठेवले. उदा. घुमटांच्या कमानींवर कमळाच्या फुलांची नक्षी, डोंबांच्या पुढील भागात असलेली पुष्करणी. त्यामुळेच मुस्लीम धर्मिय लोक तिथे कधीच नमाज पढत नसत. कारण ती मशीद आहे हेच त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे ती वास्तू तशीच भकास पडून राहीली.
    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अयोध्येतील लोकांच्या मनात आलं की आता रामलल्ला पुन्हा तिथे प्रस्थापित झाला पाहीजे. रामायणात अयोध्या पण अयोध्येत राम नाही हे कसं शक्य आहे. म्हणून साधारण १९४८ साली २२, २३ डिसेंबरच्या सुमारास काही महंतांनी गुपचुप रामलल्लाची मूर्ती तिथे प्रस्थापित केली. पण त्यांना रामलल्लाच्या मूर्तीची पूजा अर्चा करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जवळ जवळ १९८९ पर्यंत राम लल्ला कुलुपात बंद होते आणि महंत लोक बाहेरच्या जागेत त्यांची पूजा करत असत. शहाबानो प्रकरणी जेव्हा राजीव गांधी सरकारने मुस्लीम पर्सनल लॉ च्या कायद्यातच सुधारणा करून मुस्लीम समाजाची मने जिंकायचा (मतांसाठी) प्रयत्न केला त्यावेळी हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या जागरूकते मुळे राजीव गांधी सरकारला हिंदूंना सुद्धा खुष करण्याची जाणीव झाली. म्हणून त्यांनी अयोध्येतील रामलल्लाला बंधन मुक्त केलं. हिंदूंना तिथे आत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची आणि त्याची तिन्ही त्रिकाळ पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. पण हेच सय्यद बुखारी सारख्या धर्मांध मुल्लाला मानवलं नाही.....की ज्याने शहाबानो प्रकरणात सरकारला कायदा बदलण्यास भाग पाडलं होतं. सुन्नी वक्फ बोर्डाला हाताशी धरून विरोध करायला सुरूवात केली. बरं हा मुल्ला दिल्लीच्या जामा मशीदीत बसून अयोध्येतील मशीद नसलेल्या वास्तू मध्ये लोकांनी नमाज पढायला जावे असे तेथिल मुस्लीमांना सांगत होता. त्यांना चिथावत होता. एकीकडे १९९० साली हिंदू महासभेने आणि विश्वहिंदूने रामजन्मभूमीच्या ठीकाणी प्रभुरामाचे मंदीर बांधायचा संकल्प केला आणि वादाला ठीणगी पडली.
    त्यावेळी केंद्रात पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांचे. १९९० च्या नोव्हेंबर अंताला अयोध्येत कारसेवा करण्याचा संकल्प सोडला गेला. खरंतर कारसेवा हा शब्द नसून "करसेवा" हा खरा शब्द आहे. शिख गुरूद्वारांमध्ये ही संकल्पना मूलत: अस्तित्त्वात आहे. हाताने (कराने) केलेली सेवा ती करसेवा. मग बांधकाम, स्वयंपाक करणे अशा विविध प्रकारच्या सेवा या करसेवेत येतात. हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांनी प्रभुरामाचे मंदीर बांधण्यासाठी अशीच करसेवा करण्याचं ठरवलं आणि तसं तरूणांना आवाहनही करण्यात आलं. पण प्रत्यक्ष करसेवेच्या दिवशी म्हणजे २९ आणि ३० नोव्हेंबर १९९० या दिवशी मुस्लीम व्होट बॅंक वाचवण्यासाठी उप्र मधील मुलायम सिंह सरकारने करसेवकांवर अक्षरश: बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. कित्येक हजार करसेवक जखमी झाले शेकडो करसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. झालेला नरसंहार दडपण्यासाठी रेल्वेच्या मालगाड्या मृत आणि अत्यवस्थ करसेवकांच्या गाड्या भरून कुठेतरी पाठवण्यात आल्या. त्या दिवसां नंतर अनेक लोकांना आपली करसेवेला गेलेली मुलं परत दिसलीच नाहीत. यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान मधील करसेवक होते. हा प्रकार खूपच संतापजनक होता. पंजाब मध्ये जलियानवाला बागेत जनरल डायरने ज्याप्रकारे हत्याकांड घडवले त्याच प्रकारे मुलायम सिंगने करसेवकांवर गोळीबार करवला होता. हिंदू लोकां मध्ये संतापाची प्रचंड लाट पसरली. त्यातच उत्तर प्रदेशात निवडणुका होवून मुलायम सिंगाच्या पार्टीचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आलं आणि कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले. दर्म्यान अयोध्येतील हत्याकांडावर प्रसारमाध्यमे आणि केंद्रसरकार सुद्धा आश्चर्यकारकरित्या गप्प राहीले. याचा राग हिंदूंच्या मनात सलत होताच. पुन्हा डिसेंबर १९९२ मध्ये ६ तारखेला करसेवा करण्याचे निश्चित करण्यात आले. लाखो हिंदूंना देशाच्या विविध भागांतून अयोध्येत गोळा केले गेले. त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष होते. ह्यावेळी कल्याण सिंह सरकारने पोलीसांना आदेश दिलेले होते की काहीही झालं तरी लाठी हल्ला सुद्धा करायचा नाही. आणि अखेर ६ डिसेंबरला अनेक वर्षांचं ठसठसणारं गळू फुटलं. म्हणजे करसेवकांना आपल्यावर होत असलेला अन्याय सहन झाला नाही. प्रभुरामचंद्राचं त्याच्याच जन्मभूमीत मंदीर नाही आणि कोण परकिय आक्रमक बाबर त्याच्या नावाच्या इमारतीचं, त्याकाळी हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं, त्यांच्या अस्मितेची लक्तरं करणार्‍या इमारतीचं दर्शन त्यांना राम लल्लाच्या दर्शनाच्या वेळी घ्यावं लागत होतं. त्यामुळे अखेर ६ डिसेंबर १९९२ साली त्या इमारतीचे तीनही घुमट कोसळले (पाडले) आणि त्याबरोबर रामलल्ला मुक्त झाले. मशीद नसलेल्या जागेचा उल्लेख पंतप्रधानांनी बाबरी मशीद असा केल्याने आणि प्रसार माध्यमांनी प्रचंड उत्साहाने अतिरंजीत बातम्या दिल्याने थोड्याच काळात सगळीकडे दंगली उसळल्या.  महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सर्वाधिक दंगली झाल्या. नंतर होतच राहील्या.
    या सगळ्याच्या मागे पाकीस्तानचे हस्तक असलेल्या दहशतवादी संघटना होत्या हे आता जाहीर आहे. गंमत म्हणजे आपण जर प्रतिभा रानडे यांचं "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" हे पुस्तक वाचलं तर याचं मूळ पाकीस्तानातच आहे हे लक्षात येतं. पाकीस्तान निर्मिती झाल्यावर जाणून बुजुन पाकीस्तानचा खोटा इतिहास लिहीण्याचं काम चालू झालं. त्यात बाबराचा उल्लेख अत्यंत मानाने घेतला गेलेला आहे. पाकीस्तान मध्ये कायमच हिंदू विरोधी आणि भारत विरोधी कारवायांना पाठींबा आणि खतपाणीच मिळालं आहे. याचाच परिपाक म्हणजे काश्मीर मधील हिंदू वरील वाढते हल्ले आणि काश्मीर मधील दहशतवाद.  खरंतर ६ डिसेंबरला फक्त एक वादग्रस्त इमारत जमीनदोस्त झाली होती (मशीद नाही) आणि एकही मुस्लीम मारला गेला नव्हता तरी बांग्लादेशात, पाकीस्तानात बरीच मंदीरे जाळली अनेक हिंदूंना मारलं. ह्या सगळ्याची माहीती तस्लीमा नसरीन यांच्या लज्जा या कादंबरीत वाचायला मिळते. पाकीस्तान पुरस्कृत हा दहशतवाद काश्मीरपर्यंत सीमीत होता तो एकदम मुंबईत पसरला दाउद इब्राहीम या अंडरवर्ल्ड डॉनच्या रूपाने. पुढच्या घटना सर्वांनाच माहीत असतील. प्रयत्न पूर्वक अयोध्यावाद चिघळवत ठेवला गेला. यात भाजपा सारख्या हिंदूत्त्ववादी पक्षांचा सुद्धा काहीप्रमाणात दोष आहे. पण त्यांनाच फक्त दोष देवून उपयोग नाही कारण विशिष्ट धर्माचं लांगूलचालन करून सत्ता मिळवायचा खेळ कॉंग्रेस फार आधीपासून खेळत आहे. ज्यांना १९४७ नंतरच्या भारतीय राजकारणातील घडामोडींचं ज्ञान आहे त्यांना ते सहज लक्षात येईल. पण भाजपा काय किंवा रास्वसं काय यांनी गोध्रा सारख्या भयंकर हत्याकांडाची आणि त्यानंतरच्या गुजरात मधील दंगलींची अपेक्षाच केली नव्हती.जर आपण एम व्ही कामत आणि कालिंदी रणधेरी लिखित "नरेंद्र मोदी :आर्कीटेक्ट ऑफ मॉडर्न  स्टेट" हे पुस्तक वाचलंत तर दोन आयोगांपैकी एका आयोगाच्या रीपोर्ट मध्ये हे स्पष्ट होतं की गोध्रा मध्ये १९९२ नंतर सीमा ओलांडून अनेक पाकीस्तानी लोक अनधिकृतरित्या आलेले होते, त्यांचे पाकीस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध होते. गोध्राला साबरमती एक्स्प्रेसचा (जी अयोध्येहून येत होती) एस ६ डबा जाळण्याचा प्रकार हा पूर्व नियोजित कट होता. प्लॅटफॉर्मवरच्या फेरीवाल्याशी झालेल्या बाचाबाचीचं निमित्त दाखवलं गेलं पण जर हे पूर्व नियोजित नव्हतं तर संपूर्ण डबा जाळण्यास ज्या मात्रेत पेट्रोल लागतं तेव्ह्ढं अचानक कुठुन आलं? तिथला पोलीस अधिकारी उप्र मधील मुस्लीम होता आणि त्या घटनेच्या एकच दिवस आधी त्यानं महीन्याभराची सुट्टी मागून उप्र मधील गावी पलायन केलें होतं.त्यानंतर च्या दंगलींचं भडक कव्हरेज सगळ्या वाहीन्यांनी दाखवल्याने दंगलींमध्ये अजुनच भर पडली. आपल्या बरखा दत्त बाईंचं आतताई रीपोर्टींग तर सगळ्यांच्या परिचयाचं आहेच. नरंद्र मोदींना खूनी, मुस्लीम द्वेषी अशी बिरूदावली जोडली गेली. त्यांना बदनाम करण्याचा चंगच बांधला. पण आज त्याच गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जी शांतता प्रस्थापित केली आहे, गुजरातची जी प्रगती केली आहे त्यावर हे सगळे एकदम चिडी चुप. असो.
    आज घडीला (२६/११, २३/१२, १२/३, गोध्रा, गुजरात दंगली) असे सगळे अनुभव घेतल्यावर दोन्ही धर्मांचे लोक शहाणे झालेत. सरकारने सुद्धा सावधानता बाळगली आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांना काबूत ठेवलंय (नाहीतर असं काही असलं की त्यांना खूप चेव चढतो आणि मोकाट सुटलेल्या जनावरासारखे रीपोर्टींग करत फिरत असतात). त्यामूळे सगळीकडे या निकाला नंतर शांतता आहे. लोकांना पाकीस्तानचा अंतस्थ हेतू समजलेला आहे त्यामुळे कदाचित लोकांनीच आपणहून ठरवलं असणार की शांतता राखली पाहीजे. हा सुद्धा एक सोन्याचा दिवसच म्हंटला पाहीजे. पण ह्या सोन्याच्या दिवसाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणं आता आपल्याच हातात आहे. हा निकाल काही एका धर्माच्या बाजूने लागलेला नाही. पण हिंदूंना एक समाधान की रामजन्मभूमीचं अस्तित्त्व मान्य केलं गेलं. हे ही नसे थोडके. कालांतराने अर्जदार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपिल करतील तेव्हा सुद्धा कदाचित असाच तणाव वातावरणात असेल. राहून राहून हेच वाटतं की बाबराने अनेक वर्षांपूर्वी आक्रमण करून प्रभुश्रीरामाचं मंदीर तोडणं आणि २३/१२ ला पाकीस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला करणं, तसेच २६/११ ला मुंबईवर हल्ला करणं ह्या मध्ये साम्य एकच, हे सगळे आपल्या राष्ट्रीय अस्मितेवरचे हल्ले आहेत. कारण यांमध्ये आक्रमणकर्ते हे परकीय होते आणि त्यांची मानसिकता दहशत पसरवणे हीच होती. मग प्रभुश्रीरामाच्या जन्मभुमीच्या जागेवर आक्रमक बाबराचं स्मारक उभं करायचं (की जो पाकीस्तानचा राष्ट्रपुरूष म्हणून खोट्या इतिहासात मानला जातो) म्हणजे अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न करणं आणि कसाबला जावई म्हणून वागवत तुरूंगात ठेवणं आहे. मला आनंद याच गोष्टीचा होतो की आलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या राष्ट्रीयअस्मितेचा विचार केला आणि निर्णय दिला. आता लवकर अफजल गुरू आणि कसाब यांच्या फाशी्च्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची बुद्धी आपल्या न्यायव्यवस्थेला लवकर मिळो हीच प्रभुरामचंद्राच्या चरणी प्रार्थना.
    काही जणांना घडल्या गोष्टीं मध्ये काहीच रस उरलेला नाही, आजच्या मटा मध्ये तर चक्क एका कारसेवकाचे पश्चाताप दग्ध असे पत्रं ही छापून आले आहे, खूप काळ गेल्याने अनेकांना अयोध्यावाद काय आहे हेच माहीती नाही तर काही जणांना एकदम भारतातील भ्रष्टाचार, महागाई, दारिद्र्य, शेतकरी अत्महत्त्या, रस्त्यांवरील खड्डे, झपाट्याने पसरत चाललेली रोगराई यांसारखे मुद्दे अचानक महत्त्वाचे वाटू लागले आणि या वादापेक्षा याच मुद्द्यांकडे लक्ष द्यावे असाही प्रचार केला गेला. मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे हे घरचे मुद्दे आहेत आणि अयोध्या वाद हा परकिय आक्रमणाशी निगडीत असून राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पण अयोध्या वादाचा निकाल काहीही लागला असता तरी ह्या घरच्या मुद्द्यांवर कृती करणं हे सरकारचं काम आहे. बहुतांशी या घरातील मुद्द्यांना सरकार आणि निष्प्रभ विरोधी पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे या मुद्द्यांची आणि अयोध्या वादाची कोणी तुलना सुद्धा करू नये. दोन्ही धर्माच्या समाजातील लोकांनी तसेच देशाने त्याची जबर किंमत मोजली आहे हे श्री अन्सारी यांच्या वक्तव्या वरून दिसून येतेच. त्यामुळे हा सोन्याचा दिवस आपल्याला दिसला आहे त्याची झळाळी तशीच ठेवून पुढे पाऊल टाकायला हवे येवढीच प्रभुश्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना.

Tuesday 21 September 2010

|| गंगा ||

(छायाचित्र महाजालावरून साभार)
निवेदन: ह्या कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. घटना आणि पात्रांचं कोणत्याही सत्यघटनेशी किंवा पात्रांशी साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. (ही कथा मी पावसाळी अंकात प्रकाशित केलेली आहे. तिच इथे पुर्नप्रकाशित करत आहे.)

जेव्हा सुमीने गुवाहाटीच्या बस स्थानकावरून शिवसागर साठी बस घेतली तेंव्हा पहाटेचा गार वारा सुटला होता. जवळ जवळ वीस-एक वर्षांनी ती शिवसागरला परत जात होती. शिवसागर हे आसाम मधील एक छोटंसं शहर. तिथेच आर जे व्ही ची एक शाळा आणि आता विस्तारित ज्युनिअर कॉलेजही होते. वीस वर्षांपूर्वी तिने याच शाळेपासून तिच्या यशस्वी कारकिर्दीला सुरूवात केली होती. आजूबाजूची हिरवाई बघून तर तिच्या मनात उमटलं, "किती सुंदर आहे नाही आसाम!! नाहीतर महाराष्ट्रातील ते बोडके डोंगर. अगदीच महाराष्ट्रगीता मधील वर्णना सारखाच दगडांचा देश आहे. त्याउलट आसाम मध्ये जिथे नजर जाईल तिथे गर्द हिरवी झाडी आणि मैलोनमैल पसरलेले चहाचे मळे". जसजशी गाडी घाट रस्त्यांची वळणं घेत पुन्हा सपाट रस्त्याला लागली तेंव्हा आजूबाजूचे विस्तीर्ण असे चहाचे मळे पहात सुमीचं मन वीस वर्षं मागे गेलं.

..............(२० वर्षांपूर्वी)

आईच्या विरोधाला न जुमानता मी कशी एवढ्या लांब परप्रांतात नोकरी स्विकारली याचं नवल होतंच. आईचा विरोध असला तरी बाबांच्या ठाम पाठींब्यामुळे हे सगळं शक्य झालं हे सुध्दा तितकंच सत्य होतं. फिजीक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आव्हानात्मक असे काहीतरी करावे अशी माझी इच्छा. तशी मी स्वतंत्र विचारांची आणि स्वत:च्या क्षमता तपासण्यातच मला जास्त रस होता. आईने माझ्या मागे लग्नाचा धोशाच लावल्याने खूपच घुसमटल्यासारखं होत होतं. या सगळ्यापासून दूर जायचं असेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे लांब कुठेतरी नोकरी शोधणे. अश्या ठिकाणी की जिथे आई आणि तिचा तो लग्नाचा धोशा सहजासहजी पोहोचणार नाही. म्हणून मग टाईम्स ऑफ इंडियात आर जे व्ही ची जाहीरात पाहीली आणि अर्ज करून मोकळी देखिल झाले. नोकरी मिळाल्याचं पत्रं हातात पडून तिथे रूजू होण्याची तारीख समजल्यावरच मी आईला सगळं सांगीतलं. अपेक्षेप्रमाणे आईने घर डोक्यावर घेतलंच. याच कारणासाठी सगळं ठरल्यावरच आईला सांगायचं असं मी ठरवलं होतं नाहीतर मला कधीच बाहेर पडता आलं नसतं. बाबांनी आईची कशीबशी समजूत काढली आणि दोन वर्षांसाठी मी आसामला जाण्यास तयार झाले. बाबांना मनातून खूप आनंद आणि थोडी धास्ती वाटत होती. कधी हॉस्टेलवर सुध्दा न राहीलेली सुमी येवढ्या लांब राहील का? तिथले लोक कसे असतील? ते सुमीशी चांगलं वागतील नं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात डोकावत होते. तर आईच्या मनात या प्रश्नांबरोबरच माझ्या लग्नाची चिंता ठाण मांडून बसली होती. निघायच्या आदल्याच दिवशी बाबांनी मला एक कॅमेरा भेट म्हणून दिला. आसाम खूप सुंदर आहे हे त्यांनी सुध्दा ऐकले होतेच. त्यांची फोटोग्राफीची आवड माझ्यातही उतरली होती. त्यालाच अजुन वाव देण्यासाठी बांबांची ही कृती मला खूप उत्साहवर्धक वाटली. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच पण माझ्या निर्धारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि मी शिवसागरला जायला निघाले.

शिवसागर बस स्थानकावर मला घ्यायला शाळेतून कुशल नावाचा एक शिपाई आला होता. "स्कूल तो बाजूमें हैं, हम पैदल ही जायेगा" असं बोलून तो सामान उचलून चालायलाच लागला. त्यांचं असमीज मिश्रीत हिंदी ऐकून मला जरा विचित्रं वाटलं. खरंतर पुण्याहून मुंबई, मुंबई ते गुवाहाटी असे चार दिवस ट्रेन चा प्रवास आणि गुवाहाटी ते शिवसागर बारा तासांचा प्रवास यामुळे हा "स्कूल तो बाजूमें हैं" चा काही मिनीटांचा प्रवास माझ्या अगदी जीवावर आला होता. पण सांगते कोणाला........सगळं आपणच तर ओढवून घेतलं होतं नं! शाळा तशी छोटीशीच. टुमदार इमारती समोरच लालमातीचं भलंमोठं मैदान आ वासून पसरलेलं होतं. शाळेच्या इमारतीमधील व्हरांड्यात शोभेच्या फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसत होत्या. कुशलने मला एका अंधार्‍या खोलीपाशी नेलं. एक पांढरी साडी नेसलेल्या बाई एका मोठ्या टेबलच्या मागे खुर्चीमध्ये बसलेल्या होत्या. त्या खोलीतील अंधार आणि त्या बाईंचा रंग इतका सारखा होता की त्यामुळे मला त्यांची पांढरी साडी अजुनच पांढरी शुभ्र वाटली. त्यांच्या कपाळावरचा मोठ्ठा लाल कुंकवाचा टीळा आणि त्यांचे मोठे काळेभोर डोळे, तसेच अस्ताव्यस्त केस पाहून मला त्यांची जरा भीतीच वाटली. थोडंसं स्मित करून त्यांनी माझं स्वागत केलं. त्या स्मित हास्यातूनही त्यांचे पिवळसर दात डोकावत होत. खूप थकवा आल्याने आणि त्यांच्या उच्चारां मुळे क्षणभर त्या काय बोलत आहेत हेच मला समजलं नाही. त्यामुळे मी फक्त थोडसं हसूनच प्रतिसाद दिला. "यू मस्ट बी फिलिंग टायर्ड" हे त्यांचे शब्द कानात शिरले आणि मला हायसं वाटलं. त्यांनी मला चहा विचारला आणि उत्तराची वाट न पाहताच त्या खोलीच्या दारापाशी गेल्या. अचानक "गंगा, गंगा........एक गेस्ट के लिये छाय बनाओ" असं दाक्षिणात्य हिंदी वाक्यं माझ्या कानावर पडलं. हाच माझा गंगाशी .......तिला न पाहताच झालेला पहिला परिचय.


थोड्याच वेळात एक बसकं नाक आणि पिचपिचे डोळे असलेली साधारण पाच फूट उंचीची गौरवर्णीय, नेटक्या अवतारातली बाई माझ्यापुढे चहा घेवून उभी राहीली. तिने त्या पांढर्‍या साडीतील बाईंना विचारले, "दिदी, ये वो नया दिदी है क्या?" एकूणच तिथल्या सगळ्यांचं हिंदी ऐकून माझी खात्रीच पटली की शाळेत असताना हिंदी भाषेवर राष्ट्रभाषा म्हणून घेतलेली मेहनत पूर्णपणे वाया जाणार. गंगाच्या बोलण्यावरून तरी असं जाणवत होतं की मी येणार हे तिथल्या सगळ्यांना माहीती होतं.

"छलो छलो अभी ये नया दिदी को उसका कमरा दिखाओ" या शब्दांनी माझी तंद्री भंग पावली. माझं सामान उचलून एव्हाना गंगा भराभर खोली बाहेर सुध्दा पडली. मी तिच्या मागे चालायला लागले. खरंतर आमच्या घरी नोकर चाकर असली भानगड नसल्याने आणि भांडी घासायला येणार्‍या बाईंना सुध्दा आदरार्थी संबोधण्याची सवय असल्याने मला गंगाला काय संबोधावे हेच लक्षात येईना.

"तो दिदी आपका घर कहॉं हैं?" या तिच्या सहज प्रश्नाने माझा गोंधळ थोडा कमी केला. तिला काही उत्तर देण्याच्या आतच आम्ही एका बर्‍यापैकी मोठ्या खोलीपाशी पोहोचलो. खोलीत दोन भिंतींच्या बाजूंना दोन शिसवी पलंग होते. खोलीत अजून एक मोठ्ठं व एक छोटं अशी दोन कपाटं, एक टेबल, एक कपड्यांचा जुन्या बंगाली चित्रपटांतून असतो तसा स्टॅंड आणि एक ड्रेसींग टेबल होतं. क्लॉथ स्टॅंड कडे पाहून तरी असंच वाटलं की त्या खोलीत अजून एकजण किंवा दोन व्यक्ती रहात असतील. हे सगळं न्याहाळत असतानाच मी गंगाला उत्तर दिलं, "मैं पुने से आयी हूं".

"दिदी आप के घरमें कौन कौन हैं?" अतिशय उत्साहात गंगाने टाकलेल्या दुसर्‍या प्रश्नावरून तिच्या बडबड्या स्वभावाचा अंदाज मला आला.

"मॉं और पिताजी" असं उत्तर देवून तिच्या पुढच्या प्रश्नाची वाट न पाहता मी सरळ फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळाले..

काही वेळ विश्रांती घेवून फ्रेश झाल्यावर मी शाळेच्या परिसरात फेरफटका मारायला गेले. व्हरांड्यामध्येच अजुन दोन बायका बसलेल्या दिसल्या. त्यातली एक अतिशय हाडकुळी आणि दुसरी बर्‍यापैकी बारीक होती. दोघींची तोंडं पानाने रंगलेली होती. त्या हाडकुळ्या बाईच्या कपाळाला कुंकू लावलेलं दिसत होतं तर दुसर्‍या बाईचं कपाळ रिकामंच होतं. माझ्याकडे पाहून ती हाडकुळी बाई म्हणाली, "क्या दिदी रेस्ट हो गया क्या?" आणि ती अंग घुसळवून आणि रंगलेले दात काढून हसायलाच लागली. मला जाणवत होतं की माझ्या आगमनाची वार्ता आणि प्रत्येक हालचालींची खबर सगळ्यांनाच होती. मी आपल्याच विचारांत गर्क असताना समोरून शाळेत जाण्याच्या वयाच्या दोन मुली येताना दिसल्या. त्यांच्याशी नजरानजर होत असतानाच माझ्या कानावर आलं, "ए देवी और गुड्डी ये देखो नया दिदी". दोघीही माझ्याकडे पहात म्हणाल्या, "नमस्ते दिदी".

मीही त्यांना नमस्ते केलं. घरात एकुलती एक असल्याने मला आदरार्थी संबोधन ऐकायची आणि ते सुध्दा "दिदी" सवयच नव्हती. मी त्या दोन मुलींमधली कोण देवी आणि कोण गुड्डी यांचा अंदाज बांधायला सुरूवात केली. तेव्हढ्यात त्यांच्यातील एकीनेच तो प्रश्न सोडवला.

त्या हाडकुळ्या बाईला उद्देशुन तिने बोलायला सुरूवात केली, "ओय मॉं, मोय भूख xxxxxxxx".

त्या बाईने लगेच उत्तर दिलं, "ओय देवी, xxxxxxxx.....".

माझ्या लक्षात आलं की त्या दोघींमधली जाडगेलीशी आणि तुलनेनं बुटकी मुलगी म्हणजे देवी आणि ती त्या हाडकुळ्या बाईची मुलगी होती.

तेव्हढ्यात माझ्या कानावर आलं, "ओ साधना दिदी , xxxxxxxx मॉं xxxxxxxx."

गुड्डी त्या हाडकुळ्या बाईला विचारत होती. आता माझी खात्री पटली की त्या हाडकुळ्या बाईचं नाव साधना होतं आणि गुड्डीची आई कोणीतरी दुसरीच बाई होती. देवी चेहर्‍यावरून तरी साधनादिदीची मुलगी वाटत होती. गुड्डीचे डोळे आणि कपाळ मोठ्ठं होतं. वाढत्या अंगाची असल्याने उंच वाटत होती. देवी चे केस कुरळे आणि दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. ती दिसायला चांगली असली तरी मरगळलेली वाटत होती. तिच्या चालण्यातून ते लक्षात येत होतं. याउलट गुड्डी रंगाने तशी सावळी पण स्मार्ट आणि तरतरीत दिसत होती. दोघीजणी माझ्या राहण्याच्या खोलीच्या मागच्याच बाजूला रहात होत्या. पण राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता की गुड्डी कोणाची मुलगी?

आमच्या राहण्याच्या ठिकाणीच मुख्याध्यापक बाईंच्या म्हणजेच कृष्णादिदींच्या खोलीत रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना असे आणि शाळेत राहणार्‍या सगळ्यांनी त्या दोन्ही प्रार्थनांना हजर राहण्याचा शिरस्ता होता. संध्याकाळी आम्ही सगळे (मी, गुड्डी, देवी, गंगा, साधना आणि अजुन दोन दिदी) कृष्णादिदींच्या खोलीत प्रार्थनेसाठी जमलो. कृष्णादिदी स्वत: चांगल्या गायच्या. त्यांच्या गायनाने प्रार्थनेला सुरूवात होत असे आणि मग हळूहळू एक एक करत बाकीचे सगळे काही प्रार्थना आणि भजनं गात असत. प्रार्थनेच्या वेळी माझ्या लक्षात आलं की गुड्डीचा आवाज छान होता आणि उच्चारही स्पष्ट होते. गंगा काही स्वतंत्रपणे गायली नव्हती पण सुरात मागोवा घेत होती. देवी स्वतंत्रपणे गायली पण तिचा आवाज थोडा किंनरा आणि नाकात होता. यथावकाश मला समजलं की गुड्डीचं नाव निवेदीता होतं आणि ती गंगादिदीची मुलगी होती. गंगा आणि साधना जरी आया म्हणून शाळेत काम करत असल्या तरी सगळे जण त्यांना दिदी म्हणूनच संबोधायचे. पण माझ्या मनात काही प्रश्न मात्रं ठाण मांडून बसले होते.......निवेदीता आणि गंगा मध्ये इतका जमीन आस्मानाचा फरक कसा काय?


नकळतच मी गंगा-साधना आणि निवेदीता-देवी यांची मनोमन तुलना करायला सुरूवात केली. गंगा एकदम साधी आणि सरळ-भोळ्या स्वभावाची तर साधना तशी नटवी आणि वस्ताद. तिच्या बोलण्यातून आणि चेहर्‍यावरून ते जाणवत होतं. मी असंही ऐकलं होतं की दोघींनाही नवर्‍याने सोडून दिलेलं. गंगादिदीला तर मी चांगली साडी नेसून, पावडर वगैरे लावून बाहेर जाताना क्वचितच पाहीलं होतं. पण साधना मात्रं दर रविवारी नटुनथटुन बाहेर जायची. मी तर असंही ऐकलं होतं की साधना कोणा माणसाबरोबर फिरते. तसं विधवा बाईने किंवा परित्यक्तेने पुन्हा कोणाबरोबर संसार उभा करावा या मताची मी होते. पण साधनाचं वागणं थोडं खटकण्यासारखं होतं. कृष्णादिदींना सुध्दा ते आवडायचं नाही. पदरात वयात येणारी मुलगी असताना तिने आपलं वागणं आटोक्यात ठेवायला पाहीजे असं त्यांचं मत होतं. निवेदीता आर जे व्ही च्याच शाळेत म्हणजे इंग्रजी माध्यमात सहाव्या इयत्तेत शिकत होती. त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात जाणवण्या इतपत फरक होता. देवी एका असमीज माध्यमाच्या शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होती. निवेदीता तिच्या पेक्षा लहान असून सुध्दा तिचं वागणं एकदम वेगळं आणि समज जास्त होती. मला वाटलं म्हणूनच तर कृष्णादिदींनी निवेदीताला त्याच शाळेत इंग्रजी माध्यमात शिकण्याची संधी दिली असेल.

हळूहळू माझी आणि निवेदीताची गट्टी जमली. मी जरी तिला प्रत्यक्षात शिकवत नसले तरी शाळेतच रहात असल्याने तिला अभ्यासात थोडीफार मदत करत असे. त्याचप्रमाणे शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या प्रार्थनेत दोन तास असत. त्यावेळी मी काहीतरी वाचन करत असे किंवा शाळेच्या परिसरात फिरून गंगा-साधना आणि इतर मंडळी यांच्याशी संवाद साधत असे. शाळेच्या भूतकाळाची (निवेदीताला आठवत होतं तोपर्यंतची) इथ्यंभूत माहीती मला निवेदीताशी गप्पांमधून समजत होती. कृष्णादिदींसकट इतर शिक्षक आणि बाकी सगळे यांच्या स्वभावची माहीतीही मला त्यांतून मिळत असे. निवेदीता बर्‍याचवेळी तिच्या वर्गातील गमती-जमती सांगत असे. निवेदीता आणि गंगादिदीच्या बोलण्यातून मला अजून एक गोष्ट समजली की त्यांचे कोणीतरी नातेवाईक दिब्रुगढला रहात होते आणि सुट्टीत कधी कधी त्या दोघी दिब्रुगढला जायच्या. निवेदीताला खेळाची खूप आवड होती. तिच्या म्हणण्यानुसार ती धावण्यात तरबेज होती आणि तिला अ‍ॅथलेटीक्स मध्ये अधिक रस होता. मला तर तिचे मोठे मोठे डोळेच खूप आवडायचे. नाही म्हणायला मायलेकीं मध्ये एक साम्यं होतं. गंगाला आणि निवेदीताला दोन्ही गालांवर छान खळ्या पडायच्या.

साधना थोडी कामचुकार असल्याने कृष्णादिदी तिला खूपच कमी कामं सांगत. गंगा तर त्यांचे कपडे धुण्यापासून ते कपडे वाळवून घड्या करून आणे पर्यंत सगळीच कामं करत असे. शाळेत कोणी पाहूणे आलेच तर त्यांच्या साठी चहा बनवण्याचं काम, कृष्णादिदींचं जेवण बनवणे अश्या बर्‍याच गोष्टी ती हसत मुखाने करत असे. गंगा आणि साधनाला शाळा चालू असताना मध्येच नर्सरी आणि ज्युकेजी च्या मुलांना शू-शी ला नेवून आणणे, त्यांची काळजी घेणे अशी कामे तर शाळा सुटल्यानंतर सगळ्या वर्गखोल्या झाडून, व्हरांडा झाडून-धुणे ही सुद्धा कामे असत. बर्‍याच वेळेला त्यांचे ते कष्ट पाहून माझा जीव हेलावून जायचा. वाटायचं की असं काय घडलं असेल म्हणून या दोघींच्या नवर्‍यांनी त्यांना सोडून दिलं असेल? साधनाकडे पाहून वाटायचं की तिच्या वागण्यामुळे तिच्या नवर्‍याने तिला सोडून दिलं असेल. पण गंगा चं काय? ती तर खूपच चांगली होती. आम्ही एकाच ठिकाणी फक्त वेगळ्या इमारतींमध्ये रहात असल्याने आणि साधना-देवी पेक्षा गंगा-निवेदीता बरोबर माझे सूर जुळल्याने मी बर्‍याच वेळा गंगापाशी मन मोकळं करत असे. तसंच गंगा आणि निवेदीता सुध्दा त्यांचं मन माझ्यापाशी मोकळं करत.

एक दिवस अश्याच मी आणि गंगादिदी बोलत बसलो होतो. आणि गुड्डीचा म्हणजेच निवेदीताचा विषय निघाला. मी म्हणाले, "गंगादिदी आप कितनी भाग्यवान हो की आपको गुड्डी जैसी बेटी मिली। लेकिन आपके कष्ट बहुत है। अच्छा हैं आप यहॉं स्कूल में काम करती हो। नहीं तो बाहर की दुनीया में बहुन परेशानी होती। यहॉं आपलोग सुरक्षित है। निवेदिता के पिताजी कहॉं हैं?

अश्रू भरल्या डोळ्यांनी गंगा उत्तरली, "दिदी आपको क्या बताउं? निवेदीता के पिताजी तो दिब्रुगढ में हैं। वो एक पुलिस अफसर है और बंगाली है। दिदी निवेदीता तो बंगाली है और मैं एक नेपाली।"

मला ती काय म्हणतेय हे समजायलाच थोडा वेळ लागला. कारण ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलिकडील होतं. गंगा सांगत होती आणि मी सुन्न मनाने ऐकत होते.

"यहॉं आने से पहले मैं दिब्रुगढ में मेरी दिदी और जीजा के साथ रहती थी। वहीं पर मुझे गुड्डी के पिताजी मिले. उन्होंने मुझसे शादी की। लेकिन उनके घरवालों को पता नहीं था। गुड्डी के जनम के साथही वो मुझे और गुड्डी को छोडकर चले गये। अभी इन्होंने दुसरी शादी बनायी है। एक बंगाली के साथ। मैं तो नेपाली हूं लेकिन उनकी बेटी तो बंगाली हैं। निवेदीता अपने पिताजी का चेहरा लेके आयी हैं।"

गंगादिदीचे पाणावलेले डोळे  बदलले आणि तिचा चेहरा एकदम प्रसन्न झालेला दिसला.

"वो एक अच्छे घर से है, और इसलिये मुझे उसे पढाना हैं। अगर वो अपने पिताके साथ होती तो अछ्छे अंग्रेजी स्कूल में जाती। मैं उसे पुलिस अफसर बनाना चाहती हूं। इसलिये मैं ये आर जे व्ही स्कूल में आया का काम करती हूं। मैं तो पढीलिखी नहीं हूं इसलिये आया का काम ही कर सकती हूं। मुझे इतनी ही आशा है की जब निवेदीता बडी पुलिस अफसर बन जायेगी तो उसके पिताजी उसे अपना लेंगे।"

मी फक्त गंगा दिदीच्या चेहर्‍याकडे पहात होते. तिच्या चेहर्‍यावर वेगळाच तजेला दिसत होता. मला त्याक्षणी तिच्या पाया पडावसं वाटलं. मला ती नावाप्रमाणेच गंगा वाटली आणि ज्या माणसाच्या नावाने कुंकु लावलं अशा पापी माणसाचं पाप ती धूत होती. एका शाळेत आयाचं काम करून, अपार कष्ट करून आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होती. आणि तरीही मुलीचं शाळेतील आडनांव "देब" म्हणजे बंगालीच लावलं होतं. एका माणसाच्या चुकीसाठी आपलं उभं आयुष्यं तिने पणाला लावलं होतं. नाहीतर एखादी साधना सारखी असती तर कधीच दुसर्‍या माणसा बरोबर लग्नं करून मोकळी झाली असती. रोज प्रार्थने नंतर कर्मयोग आणि अध्यात्माच्या गप्पा ऐकणार्‍या मला ती खरी कर्मयोगी वाटली. पुढच्या आयुष्यात निवेदीताने किती प्रगती केली हे बघायला मी तिथे नव्हते कारण मला दुसरी कडे बदलून जावं लागलं होतं. तिथून निघताना आणि नंतर सुध्दा मी अशीच प्रार्थना करत होते की या वेड्या गंगेच्या तपश्चर्येला फळ येवू दे.

.................................................


सगळा वीस वर्षांपूर्वीचा चित्रपट सुमीच्या नजरेसमोरून अगदी कालच घडल्यासारखा सरकला. एव्हाना बस शिवसागरला पोहोचली होती. सुमी एक नविन मुख्याध्यापिका म्हणून त्या शाळेत पुन्हा जात होती. ह्यावेळी तिला जवळच्या जवळच गाडी पाठवली होती. पण सुमीने "स्कूल तो नजदीक हैं" असं म्हणत चालायला सुरूवात देखिल केली. तिचं सामान घेवून गाडी परत शाळेकडे निघाली. सुमीची पावलं शाळेकडे झपझप चालत होती तर मन मात्र गंगादिदी कडे धाव घेत होतं. तिच्या पवित्र अश्या मार्गाच्या पाउलखुणा धुंडाळत. सुमीचे कान आसुसले होते गुड्डीच्या यशाची कथा ऐकण्यासाठी.........कारण तेच तर गंगेच्या तपश्चर्येचं, आराधनेचं फळ होतं.

Friday 17 September 2010

अमृता तेही पैजा जिंके अशी ही माझी माय मराठी..........

  (छायाचित्र महाजालावरून साभार)
आजच पहाटे सुधीर फडक्यांचं अपूर्ण आत्मचरित्रं "जगाच्या पाठीवर" वाचून पूर्ण झालं आणि अपर्णा वेलणकर भावानुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली. कोणतही पुस्तक वाचताना अगदी प्रस्तावनेपासून ते परिशिष्टाच्या पानांपर्यंत सगळं पूर्ण वाचल्या शिवाय पुस्तक पूर्ण वाचल्याचं समाधान मला मिळतच नाही. याच सवयीने मी शांताराम च्या मुखपृष्ठ, पार्श्वपृष्ठ यांपासून सुरूवात केली (शांता्रामची कहाणी या दोनही पानांवर थोडक्यात दिली आहे). ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियन लेखकाची "शांताराम" ही आयुष्याचं सत्य  अतिशय उत्कट पणे सांगणारी भावपूर्ण कादंबरी की जिच्यामुळे मुंबई आणि मुंबईतील आयुष्य आज पाश्चात्य जगतात पॉप्युलर आहे. सहा सात वर्षांपूर्वी ही कादंबरी इंग्रजी मध्ये सर्वप्रथम प्रकाशीत झाल्यावर सहाच महिन्यांच्या आत मुंबईकडे येणारा पर्यटक वर्ग झपाट्याने बदलला. धारावी सारख्या संपूर्ण अशिया खंडातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीला एका पर्यटन केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आणि धारावी दर्शनच्या दोन दिवसाच्या पॅकेज टुर्स पाश्चात्य पर्यटकां मध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या त्या याच कादंबरी मुळे. अतिशयोक्ती नाही पण मुंबईच्या कुलाबा भागात बर्‍याच वेळा शांताराम मध्ये संदर्भ असलेल्या अनेक ठिकाणांचा शोध घेत (हातात शांताराम घेवून) असलेले पर्यटक दृष्टीस पडत असत. या कादंबरीची कथाच खूप भावपूर्ण आणि आयुअष्याच्या अनुभवांनी ओथंबलेली आहे. एखादं रोपटं आपल्या मूळ जागेतून उपटून टाकल्यावर त्याला एखाद्या दलदलीच्या ठीकाणी रूजण्यास वाव मिळावा आणि मग ते फोफवावं असंच काहीसं ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस आणि मुंबई यांचं नातं. हे नातं तर मला आधीच माहीती होतं. पण अपर्णा वेलणकर अनुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली आणि श्री रॉबर्टस यांच्या मराठी भाषे विषयीच्या भावना आणि त्यासुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहून निर्माण झालेल्या आहेत हे पाहून भरून आलं. श्री रॉबर्ट्स यांच्या भावना अपर्णा वेलणकर यांनी इतक्या समर्थपणे पोहोचवल्या आहेत की त्यांनी मला ही पोस्ट लिहायला भाग पाडलं. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीची गोडवी "अमृतातेही पैजा जिंके........" अशा शब्दांत वर्णन केलेली वाचली होती. श्री सुरेश भट यांनी त्याची महती मराठी अभिमान गीता मधून साकारली. हे दोघेही आपलेच, महाराष्ट्रातच जन्मलेले पण एखाद्या परदेशी माणसाने मराठीची गोडवी गावी, तिच्या प्रत्येक बाजाला संगिताच्या विविध पैलूंची उपमा द्यावी हे माझ्यासाठी तरी नविनच आणि सध्याच्या "महाराष्ट्रात मुंबई पण मुंबईत मराठी नाही" या पार्श्वभूमीवर खूपच आशादायक आणि अभिमानास्पद वाटली म्हणून हा लेख. कॉपी राईटचं पान मला खुणावत असल्याने मी काही मजकूर इथे देवू शकत नाही. जर मला मेहता पब्लिशिंग किंवा अपर्णा वेलणकर यांची परवानगी मिळाली असती तर काही भाग इथे जसाच्या तसा टाकला असता. पण कॉपी राईट चा भंग न कराता आवश्यक तेवढा भाग माझ्या लेखाच्या संदर्भासाठी खाली देत आहे
"भारतात पऊल ठेवल्याक्षणी माझ्या कानावर पडलेली पहीली स्थानिक भाषा होती मराठी. त्या डौलदार भाषेमध्ये गुंफलेल्या लयीने पहिल्या भेटीतच एक अजब गारूड घातलं. मुंबईत रूजता रूजता मराठी ऐकत राहिलो आणि शिकलो."    अत्यंत साधेपणाने मराठी विषयीची ओढ यात व्यक्त झाली आहे.  सार्‍याच भारतीय भाषा अत्यंत सुस्वर. त्यात मराठीचा गोडवा काकणभर वरचढच. माझ्या वैराण, नीरस आयुष्यात मराठीने पहिल्या प्रेमाचा पाऊस आणला. त्या कृतज्ञतेपोटी मी मराठी शिकलो........आणि बघता बघता या रूणुझुणुत्या भाषेच्या प्रेमात पडलो."   ह्या वाक्यांतून मुंबईत वर्षांनुवर्षे राहणार्‍या आणि ज्यांना मुंबईने जीवन दिलं आहे, स्वत:ची अशी ओळख दिली आहे त्यांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. " प्रत्येक शब्दाच्या मुळाशी एकेक गाणं पुरलेलं असावं; इतकं अंगभूत, अत्युत्कट सुरेलपण हा महाराष्ट्राच्या मराठीचा प्राण! ही गाणी मला आजही हाका घालतात. मुंबईत असलो की त्या सवयीच्या सुरेल लकेरी चोहोबाजूंनी अखंड ऐकू येतात."   ह्यातील प्रत्येक शब्द न शब्द श्री रॉबर्ट्स यांचं मराठी विषयी, मराठीच्या विविधते विषयी असलेलं प्रेमच व्यक्त करतंय. यातून पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, नाशिककर, कोल्हापूरकर, सातारकर, सांगलीकर, सोलापूरकर, लातूरकर, औरंगाबादकर इ. इ. मराठी बांधवांनी आपापला मराठीचा बाज जपत आपल्या माय मराठी विषयी आत्मियता बाळगावी ना की कोणती भाषा किती शुद्ध आणि चांगली यावरून काथ्याकूट करावा. येवढं जरी या पुस्तकाने साधलं तरी ते या पुस्तकाचं महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून १००% यश असेल यात शंकाच नाही.

Saturday 11 September 2010

माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो..........

 (छायाचित्र महाजालावरून साभार)
अकरा सप्टेंबर आलं की मला नेहमी स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उद्गारलेले "माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो.........."  हे उद्गार आठवतात. त्याच बरोबर याच अमेरिकेतील बंधु भगीनींवर "विश्वबंधुत्त्व दिनाच्या दिवशीच" २००१ साली झालेला भीषण हल्ला सुद्धा आठवतो. सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. जिथे लिहीलेलं असतं  "येथे थुंकु नका" तिथल्याच भिंतींवर पानाच्या पिचकार्‍यांनी रंग भरलेले असतात. शिवाजी महाराजांच्या किंवा महात्मा गांधींच्या नावाखाली त्यांच्या शिकवणुकीच्या बरोबर विरूद्ध वर्तन करायचं. कलीयुग आहे........पण स्वामी विवेकानंदांना मात्र भारत सार्‍या जगाला अध्यात्माचं ज्ञान देईल याची खात्री वाटत होती......म्हणून तर त्यांनी भविष्यच वर्तवलं होतं की "भारत हा एक दिवस जगतगुरू होणार आणि सार्‍या विश्वाला बंधुत्त्व, अध्यात्म शिकवणार". तसं आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म इतर जगाच्या तुलनेत मुरलेलं आहे. म्हणूनच इथे निर्वासीतांना आसराही मिळतो आणि शरण आलेल्याला अभय. हे स्वामी विवेकानंदांचे शिकागोच्या भाषणातील उद्गारांमधील काही शब्द आहेत. आज त्याप्रसंगाला ११७ वर्षं पूर्ण झाली म्हणून मनात विचार आला की स्वामी विवेकानंदांनीच वेळोवेळी त्यांच्या पत्रांतून आपल्या शिष्यांना लिहीलेल्या काही निवडक विचारांचं संकलनच प्रसिद्ध करूया. म्हणून ही प्रस्तावना!
(खालील विचार हे स्वामी विवेकानंदांचे असून "विवेकानंदांची पत्रे" या पुस्तकातील मी काढलेल्या टिपणांवर आधारित आहे.)
 १) भगिनी निवेदिता यांना: माझें ध्येय कांही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्वरत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनांतील प्रत्येक कार्यांत हे ईश्वरत्त्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
२) जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय. जो आत्मत्याग करेल तोच जगाला प्रकाश देईल. पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना आत्मबलिदान करावेच लागेल.
३) अंत:करणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
४) धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज चारित्र्याची नितांत गरज आहे.
५) संपूर्ण आयुष्य म्हणजे एक स्वप्न मालिका आहे. जाणीवपूर्वक ही स्वप्ने पहावीत इतकीच माझी आकांक्षा आहे.
६) प्रलय म्हणजे कार्याचे कारणांत विलीन होत जाणे होय आणि सृष्टी म्हणजे कारणांतून कार्य प्रकट होत जाणे होय.
७) वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फंदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
८) प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरूषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वत: प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साह्य करणे हाच परम पूरूषार्थ होय.
९) अनुभवानेच आपण सर्व शिकत जातो. दुर्दैव एवढेच की या ज्ञानाचा उपयोग मात्र या जगात करता येत नाही; कारण ज्या क्षणी आपण शिकून तयार झालो असे आपल्याला वाटते त्याच क्षणी जगाच्या या रंगभूमीवरून आपल्याला अदृष्य व्हावे लागते आणि हीच खरी माया आहे.
१०) या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिल्या प्रकारचे लोक खंबीर मनाचे, शांत, निसर्गापुढे मान तुकविणारे व कल्पनेच्या आहारी फारसे न जाणारे, परंतु चांगले, सज्जन, दयाळू व मधुर स्वभावाचे असतात. जग हे अशा लोकांसाठीच आहे. हे लोक सुखी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. याच्या उलट दुसर्‍या प्रकारचे लोक अत्यंत संवेदनक्षम मनाचे असतात, ते कल्पनाप्रधान असतात व त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात. हे लोक एका क्षणात आकाशांत भरारी मारतील, तर दुसर्‍या क्षणी एकदम खाली येतील. या लोकांच्या नशिबी सुख नसते. पहिल्या प्रकारच्या लोकांचे आयुष्य साधारणपणे सुखाच्या सम पातळीवरून जात असते, तर दुसर्‍या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा ओघ कधीच सम नसतो; कधी कधी हे लोक अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतात तर दुसर्‍याच क्षणी ते दु:खी होताना दिसतात. परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्‍हेचा वेडेपणा’ या सध्याच्या प्रचलित सिद्धांतात काही सत्यांश आहे यात शंकाच नाही.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्‍या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्‍या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.

Wednesday 8 September 2010

गोंद्या गेला रे गेला.......

(छायाचित्र महाजालावरून साभार)
श्रावण कृष्ण अष्टमी जवळ आली की सगळीकडे ’गोविंदा आला रे आला’ चे नारे ऐकायला येतात. हिंदी चित्रपटांतील दहि-हंडी संदर्भातील गाणी वाजत असतात. विविध राजकीय पक्षांची छोट्या छोट्या गल्लीबोळातली गोविंदा पथकं उंचच उंच दहि-हंडी फोडायच्या तयारीला लागतात. मग पारंपारिक दहि-हंड्यांची बोली लावणं चालू होतं तर कुणी नविन दहि-हंडीची विक्रमी बोली लावून गोविंदा पथकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. दहि-हंडीच्या बोलीच्या प्रमाणात तिची उंची म्हणजेच थरांची संख्याही वाढवली जाते. वर्तमानपत्रांत जाहिरातींचा ओघ सुरू होतो तर आंतर्जालावर दहि-हंडीसाठी स्पेशल संकेतस्थळं सुरू होतात. प्रत्यक्ष दहि-हंडीच्या दिवशीतर सगळ्यांचा उत्साह नुसता ओसंडून वहात असतो. हंडीतील दह्याच्या म्हणजेच बक्षिसाच्या आशेवर थरावर थर चढवले जातात. एक नाही दोन नाही तर शक्य असतील तेवढ्या दहि-हंड्या फोडण्याची जणू इर्ष्या पेटलेली असते. हंडीतील बक्षीसाची रक्कम ही कायम पाच किंवा सहा अकड्यातच असते. त्यामुळे दहि-हंडी उत्सव हे एक काळ्याचा-पांढरा करण्याचं एक साधन बनलेलं आहे. फार मोठी आर्थिक उलाढाल या उत्सवात होत असल्याने या उत्सवाला एक वेगळंच आर्थिक महत्त्वही आलेलं आहे. यासगळ्यातच काही थर कोसळतात, पुन्हा उभे राहतात. पडलेले गोविंदा स्वत:ला सावरत आपल्याला काहीही झालेलं नाही या उत्साहात बक्षिसाच्या आशेनं पुढे सरकतात. त्यांचेच सहकारी गोविंदा मोठ्या काळजीनं पडलेल्यांची विचारपूस करतात तर आयोजक तू नहीं तो कोई और सही च्या थाटात पुढच्या पथकाचे स्वागत करण्यात गुंग असतात. मग दुसर्‍या दिवशीच्या बातम्यांमध्ये किती रकमेची हंडी फोडली, सगळ्यात अधिक थर कोणी आणि कुठे लावले याच बरोबर किरकोळ आणि गंभीर जखमी झालेल्या गोविंदांची संख्याही असते. मग इ-मेल द्वारे काही घटना विस्ताराने लिहून पैशाच्या रूपात सहानुभूती/मदत गोळा करण्याचे प्रयत्न होतात. नाहीतर कोणा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आम्ही कशी त्या "गेलेल्या" गोविंदाच्या कुटुंबाची किंवा पूर्णपणे अपंग झालेल्या गोविंदाची काळजी कशी घेणार आहोत असे जाहिर करण्यासाठी अहमहमिका लागते.
मला आठवतंय दोन वर्षांपूर्वी सुद्धा दहि-हंडी झाल्यावर एक मेल सगळीकडे फिरत होती. एक १२-१३ वर्षा्चा गोविंदा सातव्या थरावरून पडल्याने खांद्याच्या खालचा सगळा भाग लुळा झाल्याने त्याच्या हॉस्पीटलायझेशन्साठी घरच्यांना आर्थिक मदत करा इ. इ. गेल्या वर्षी दहि-हंडीत एक २० वर्षांचा गोविंदा छातीत रक्त साकळल्याने मृत्यू पावला. तो सुद्धा दोनवेळा वरच्या थरांवरून पडला होता. पण आपल्याला काही झालंय/ त्रास होतंय याकडे लक्ष द्यायला त्याला फुरसत कुठे होती? त्याच वर्तमानपत्रांत चार गोविंदा लुळे झाल्याची बातमी आहे. वर्षा-गणिक जशी थरांची आणि हंड्यांच्या बक्षिसांची रक्कम वाढते आहे तशी जखमी, लुळे झालेले, गेलेले गोविंदा यांचीही संख्या वाढतेच आहे. यासर्व तरूण मुलांमध्ये ते गोविंदा आहेत हे जरी साम्य असले तरी अजुन एक साम्य आहे ते म्हणजे सर्वच जण निम्न आर्थिक स्तरातील मराठी आहेत. इतकं सगळं अधोरेखित करण्याचं कारण एकच की दहि-हंड्यांच्या आधी आणि दहि-हंडीच्या दिवशी जी गोविंदा आला रे ची धुन वाजते तीच दोन दिवसांनंतर गोंद्या गेला रे गेला मध्ये बदलून जाते. कित्येक कुटुंब उध्वस्त होतात.
या राजकीय पुढार्‍यांचे काय जाते हंडीची उंची वाढवत रहायला. त्यांचा तर राजकीय फायदाच........एक प्रकारे हे सुद्धा शक्ती प्रदर्शनच आहे. राजकीय शक्तीचे प्रदर्शन पण या गरीब असहाय तरूणांच्या जिवावर. या दही हंड्यांची गरज काय? श्रीकृष्णाचे इतर गुण बघा की. एक मजा म्हणून छोटी दही हंडी फोडणं ठीक आहे. पण या राजकीय पुढार्‍यांचं म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच प्रकार आहे. या सगळ्या गोविंदा पथकात एक तरी आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थिती असलेला, राजकीय पुढारी गोविंदा बनलेला दिसतो का? मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यांना........तथाकथित मानवी हक्क संघटनांना याचं काहीच वाटत नाही. खरंच गरीबी फार वाईट असते. त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याची लालसाही चांगली नाही. कलीयुग आहे हेच खरं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं श्रीकृष्णाच्या नावाने चालू आहे.
आता असंही ऐकायला येतंय की या दहि-हंड्यांच्या थरांची तुलना परदेशातील मानवी मनोर्‍यांचे विक्रम मोडण्यासाठी केली जातेय. पण परदेशातील मानवी मनोर्‍याचे जागतिक पातळीवरील विक्रम मोडण्याची स्वप्ने दाखवताना हे सुद्धा लक्षात घेतले पाहीजे की तिथे प्रत्येक खेडाळूच्या जीवाची काळजी घेतली जाते. मनोर्‍यांच्या आजूबाजूला ठराविक अंतरापर्यंत स्प्रींगच्या गाद्या किंवा तत्सम सुरक्षा यंत्रणा सजग असते. त्या सगळ्या खेळाडुंना व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. कदाचित त्यांचा आरोग्य विमा पण उतरवला जात असेल. इथे तर पैशाचं आमीष दाखवून गोविंदांच्या आयुष्यांशी जुगार खेळला जातोय. या गोविंदांच्या जीवावर इतक्या लाखो रूपयांची लयलूट चालू असते पण एकालाही अशी इच्छा होत नाही की त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित उपाययोजना आखल्या पाहीजेत. त्यांना व्यव्स्थित प्रशिक्षण, आरोग्य विमा आणि मानवी मनोरा करते वेळी बाजूला स्प्रींगच्या गाद्या किंवा पडलेल्यांना झेलण्यासाठी सुरक्षा जाळी या उपाय योजना तर असायलाच हव्यात. आणि बघ्यांना प्रत्यक्ष मानवी मनोर्‍यापासून ३०-५० फूट दूर उभं करायला हवं. जर एक उपनगर एक दहीहंडी असं ठेवलं तर सुरक्षा उपाय करण्यास योग्य होईल. आरोग्य विमा उतरवण्याची जबाबदारी गोविंदा पथकांना अनिवार्य हवी तर सुरक्षा पुरवण्याची हमी आयोजकांसाठी अनिवार्य हवी. हे सगळं तपासूनच पोलीसांनी दहीहंडी उत्सवाला परवानगी द्यावी.
पूर्वी नाही मुघल राजांच्या राज्यांत निव्वळ मनोरंजनासाठी कोंबडे, बैल यांच्या झुंजी लावल्या जात. त्या झुंजीतच त्यातल्याच एका कोंबड्याचा जीव गेल्याशिवाय झुंज थांबत नसे. तसंच काहीसं विकृत मनोवृत्तींचं दर्शन यासगळ्यातून होतंय. ह्या झुंजीत एकच काय अनेक गोविंदांचे बळी जातायत.......पण ही झुंज कधी थांबणार आणि कोण थांबवणार?........मनात राहून राहून एकच येतंय "गोंद्या गेला रे गेला", "गोंद्या गेला रे गेला"!!

Thursday 26 August 2010

इतिहास नक्की कोण बदलतंय?

इतिहास नक्की कोण बदलतंय? हे राजकारण कुठे नेतय आपल्याला?

*********************************************

परदेशातील संशोधक की केंद्रातील सरकार? पुरावा घ्या.

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजां विषयीच्या काही मजकुरावरून संभाजी ब्रिगेड सारख्या गटांनी वादंग उठवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आपल्या लाडक्या कॉंग्रेसचे सरकार असलेल्या केंद्रात आणि केंद्रीय अभ्यासक्रमा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नक्की काय भावना आहेत, त्यांची तसेच मराठा साम्राज्याची महती कशा प्रकारे आणि काय पातळीवर शिकवली जाते हे आपणच पहा.
सीबीएसई सातवी इतिहास धडा १०
त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी असे संबोधन वापरून फक्त २-३ वाक्यांत आला आहे. पेशव्यांचा उल्लेख २ वाक्यांत आला आहे. संपूर्ण सीबीएसई च्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या नशिबी फक्त ४७३ शब्द आले आहेत. संभाजी ब्रिगेड सारख्या लोकांची मजल फक्त भांडारकर संस्थेवर हल्ला करण्यात आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून हटवण्या पर्यंतच आहे.  केंद्रातील सरकारला जाब विचारण्याची ना कुणाची इच्छा आहे ना हिम्मत. 
सीबीएसई च्या इतिहासाच्या पुस्तकां मध्ये मुघलांना केवढे स्थान आहे हे जर सोबत एनसीईआरटी ची लिंक दिलेली आहे तिथे बघीतल्यास दिसेलच. बरं हा युक्तीवाद मानला की भारत केवढा मोठा आहे मग सगळ्या प्रदेशांतील गोष्टी लिहीणार काय? नाही मान्य. पण कोणत्या गोष्टी आणि कशा पध्दतीने लिहायच्या हे तर या लोकांच्या हातात आहे. आता महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा आणि सीबीएसईच्या शाळांचे पेव फुटले आहे (गुणांच्या राजकारणासाठी). मग खरा इतिहास मुलांना कसा आणि कोण सांगणार? बरं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुण्यासारख्या शहरां मधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंवर हल्ला करायचा त्यांची तोडफोड करायची. मग पुढच्या पिढीला काय तोडफोडीचा मुघल इतिहास शिकवत बसणार? ज्या मराठा साम्राज्याच्या नावाने ही सगळी तोडफोड चालू आहे त्या साम्राज्याचा मागमूसच जर इतिहासात राहीला नाही तर काय उपयोग?

याला अजुन एक कारण सुध्दा आहे. जर इतिहासाचा अभ्यासक्रम बनवणारी समिती बघीतली तर त्यावर एकही महाराष्ट्रीय व्यक्ती नाही. ९०% लोक दिल्ली मधील आहेत. एक व्यक्ती पुणे विद्यापीठातील आहे पण ती मराठी नाही. सोबत त्याचाही दुवा देत आहे. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ होईल. 

जेम्स लेन चं पुस्तक असे किती लोक वाचणार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही उठुन काहीही लिहीलं आणि कुणाच्याही गावगप्पांचा परिपाक म्हणूनही काहीही लिहीलं गेलं तरी आमची छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा इतकी कमकुवत नाहीये की लगेच तिला तडा जायला. मुख्य म्हणजे याचं श्रेय महाराष्ट्रातील पूर्वीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांना तसेच श्री बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या इतिहास संशोधकांना जाते. त्यांनी आजतागायत महाराष्ट्रातील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं आहे.
ज्या समर्थ रामदासांनी स्वत:च्या समर्थ वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात (मुघल साम्राज्याच्या वर्चस्वामुळे) आलेली मरगळ झटकली अशा समर्थांचा एकेरी नावाने उल्लेख आणि त्यांच्या विषयीच सध्या अपप्रचार करणे चालू केले आहे. संभाजी ब्रिगेड वाल्यांना जर असं वाटत असेल की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नाहीत (तसे पुरावे ते मान्य करत नाहीत) तर मग त्यांनी ऐतिहासिक पुरावे द्यावेत की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नसून त्यांना इतर शिक्षक शिकवायला होते. त्यांची नावे जाहीर करावीत. उगाच राजा शिवछत्रपती सारख्या पुस्तकांतील अर्धवट मजकूर (स्वत:ला पाहीजे ते शब्द उचलून आणि अतिरीक्त शब्द टाकून बनवलेली अशुध्द मराठी वाक्ये) संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईट वर घालून श्री बाबासाहेबांविषयी अपप्रचार करू नये. (पहा) नुसत्या ब्राम्हण कुळात जन्म घेवून कोणी खरा ब्राम्हण होत नाही तसेच नुसत्या क्षत्रिय कुळात जन्म घेवून कुणी क्षत्रिय होत नसतं. ब्राह्मणाने जर ब्राह्मणाचे कर्म म्हणजे विद्याध्ययन, विद्यादान केलं नाही तर त्याला/तिला ब्राह्मण म्हणता यायचं नाही तसंच जर जन्माने क्षत्रिय रक्षण न करता तोड फोड करत असेल तर तो कसला आलाय क्षत्रिय? असेल हिम्मत संभाजी ब्रिगेड वाल्यांची तर त्यांनी दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारला जाब विचारावा नाहीतर सरळ बांगड्या भराव्यात.
भारत सरकारची अधिकृत वेब साईट आहे तिच्यावर तर  भारताच्या मध्ययुगीन इतिहासात तसेच इतर इतिहासांत मराठा साम्राज्याचा साधा उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्याच्या  विभागात खाली दिल्या प्रमाणे उल्लेख आढळतो.
While the Bahamani rule brought a degree of cohesion to the land and its culture, a uniquely homogeneous evolution of Maharashtra as an entity became a reality under the able leadership of Shivaji. A new sense of Swaraj and nationalism was evolved by Shivaji. His noble and glorious power stalled the Mughal advances in this part of India. The Peshwas established the Maratha supremacy from the Deccan Plateau to Attock in Punjab.

यासाठी केंद्रातील कॉग्रेस सरकारला संभाजी ब्रिगेड तसेच महाराष्ट्र सरकार जाब का विचारत नाही? कारण संभाजी ब्रिगेडचा हा सगळा स्टंट फक्त राजकिय हेतूने प्रेरीत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखिल सूर्याजी पिसाळ होते आणि आत्ता देखिल आहेत. म्हणूनच राजकिय हेतूने प्रेरीत होवून आधीच दुरावलेल्या मराठी समाजात अजुन फूट पाडण्याचे कारस्थान रचले आहे.

यांचे काय करायचे ते आपणच ठरवा!

Saturday 21 August 2010

कॅनडा ट्रीप - भाग ७

चायनीज ड्रॅगनचा विळखा!

डंडास वेस्ट, चायना टाऊन, टोरंटो
मागे कधीतरी इ-मेल मधून जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या पहील्या १०-१५ क्रमांकांच्या भाषांची यादी आली होती. त्यात चायनीज भाषा्‍ बोलणार्‍यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. म्हणजेच चायनीज भाषा ही जगा्तील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे असं वाचण्यात आलं होतं. खरं पहायला गेलं तर चायनीज लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त असल्याने तसं असेल असं मला वाटलं होतं. पण टोरंटो, एड्मंटन, व्हॅन्कुव्हर या ठीकाणांना भेट दिल्यावर जाणवलं की कॅनडाच्या सध्या्च्या अधिकृत भाषा इंग्रजी आणि फ्रेंच या  असल्या तरी (कारण सगळीकडे सूचना फलक, विविध उत्पादनांवरील सूचना ह्या सगळ्या मुख्यत: इंग्रजी आणि फ्रेंच मध्ये असतात) चायनीज लोकांची तिथली वाढत जाणारी संख्या बघून असं वाटतंय की पुढील १०-१२ वर्षांत चायनीज ही कॅनडाची सेकंड लॅंग्वेज होईल. टोरंटो मधील दोन मोठ्ठी चायना टाऊन्स बघीतली की त्याचा प्रत्यय येईल. 
रस्त्यावर भाजी विक्री, चायना टाऊन
चायना टाऊन्स मध्ये सगळी दुकानं चायनीज लोकांची. उत्पादनं सुध्दा (म्हणजे अन्नापासून ते विविध कपडे, मसाज पार्लर्स पर्यंत) "मेड इन चायना". सगळीकडे सूचना फलक चायनीज मध्ये, अगदी तिथल्या चायनीज उपहारगृहां मध्ये असलेली व्यवस्था चायनीज वळणावर म्हणजे एखाद्या चीन मधल्याच शहरातल्या छोट्या भागात आलो असल्याचा भास होतो. हाईट म्हणजे एअर कॅनडाच्या विमानात सुध्दा काही वस्तू "मेड इन चायना" चं लेबल झळकवत होत्या. एकूणच चीनी वस्तू, माणसं आणि जीवन पध्दती यांचं जगभरात वाढत जाणारं प्रस्थ पाहीलं की चायनीज ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला बसतोय याची खात्रीच पटते. 
लिटील इंडीया!
लिटील इंडीया
टोरंटो मध्ये "लिटील इंडीया" म्हणून एक भाग आहे. म्हणजे एक रस्ताच म्हणा ना. त्या रस्त्यावर भारतीय वस्तुंची दुकानं, कपडे, उपहारगृह आहेत. पण आपण जर त्याच्या छायाचित्रांवर नजर टाकली तर त्या दुकानां मधील वस्तु आणि दुकानांची नावं यापलीकडे त्यात भारतीय असं काहीच दिसत नाही. म्हणजे चायना टाऊनच्या तुलनेत आजीबात भारतीय भाग आहे असं वाटत नाही. 
केवळ तिथे मिळणारे भारतीय खाद्यपदार्थ आणि साड्या नेसवलेले पाश्चिमात्य पुतळे, दुकानांच्या बाहेर अडकवलेले भारतीय वेष यापलीकडे कुठेही भारतीय वातावरणाचा भास झाला नाही. म्हणजे तिथल्या वातावरणात सुध्दा ती एनर्जी वाटत नाही. याउलट चायना टाऊन मध्ये चायनीज लोकांची वर्दळ, चायनीज दुकानदार, चायनीज फेरीवाले, चायनीज भाषेतील फलक हे वातावरण निर्मीती करून  जातात. त्याच बरोबर अजुन एक मोठा फरक म्हणजे चायना टाऊनच्या आसपास चायनीज लोकांचीच वस्ती आहे. पण लिटील इंडीयाच्या आसपास भारतीय लोकांची वस्ती असल्याचं जाणवलं नाही.
खलिस्तानवादी शिख समुदाय!
टोरंटो, एडमींटन, व्हॅन्कुव्हर या तीनही शहरां मध्ये शिख समुदायाचं अस्तित्त्व सुध्दा जास्त प्रमाणात जाणवलं. टोरंटो आणि व्हॅन्कुव्हरला विशेषत: टॅक्सी ड्रायव्हर्स शिख आढळले. तसा भारतातून परदेशात स्थलांतर करणार्‍यां मध्ये शिख समुदाय अग्रेसरच आहे. तशातच १९८४ साली इंदीरा गांधी यांच्या हत्ये नंतर दिल्ली मध्ये ज्या शिख विरोधी दंगली उसळल्या आणि तिथे जो कत्लेआम झाला त्याचे घाव घेवून बरेच जण कॅनडा, इंग्लंड यादेशांमध्ये स्थलांतरीत झाले. त्यामुळे खलिस्तान वाद जरी भारतातून गेलाय असं वाटत असलं तरी या भारताबाहेर स्थायिक झालेल्या शिख समुदाया मध्ये अजुनही तो जिवंत आहे. मुख्यत: त्यांच्या मनात १९८४ साली त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबध्दल चीड आहे. त्याच्या पाउलखुणा जर एखाद्या गुरूद्वारामध्ये गेलात तर झेंडे, फलक, मृत अतिरेक्यांचे हार घातलेले ’शहीद’ म्हणून गणले जाणारे फोटो याद्वारे दिसतील. बर्‍याच जणांना "कनिष्क" विमान दुर्घटना आठवत असेल. काही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी एअर इंडीयाचे कॅनडाहून भारतात जाणारे बोईंग विमान पॅसीफिक ओशन मध्येच हवेत उडवुन दिले. त्यात जे गेले ते मुख्यत: भारतीय नागरिक आणि कॅनडीयन नागरिक असलेले भारतीय होते. नुकत्याच पूर्ण झालेल्या चौकशी आंतर्गत हेच बाहेर आलं की त्यावेळी कॅनेडीअन गुप्तचर यंत्रणेला असा काही हल्ला होईल याची माहीती मिळाली होती पण पोलीस यंत्रणेने ती माहीती फारशी गांभिर्याने घेतली नाही. त्यासाठी सध्याच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांची क्षमा सुध्दा मागीतली. तसेच कॅनडातील एका उपनगरात "कनिष्क" विमान दुर्घटनेतील लोकांच्या स्मरणार्थ एक पार्क स्मारक म्हणून उभारले आहे. त्याचे उद्घाटनही नुकतेच झाले.

इस्कॉन: हरे कृष्णा मुव्हमेंट!!
टोरंटो मधील भारताशी आणि हिंदू धर्माशी निगडीत अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इस्कॉन मंदिर. हे इस्कॉन मंदिर बाहेरून पाहीलं तर एका जुन्या चर्चची दगडी इमारत आहे. पण आतून सगळंच नविन बांधलं आहे. मी असं ऐकलं की इस्कॉन ने ती जागा विकत घेण्याआधी तिथे एक रोमन कॅथलीक चर्च होतं. पश्चिमेकडील सगळ्याच देशां मध्ये ख्रिश्चन धर्माला उतरती कळा लागलेली असल्याने त्या चर्चने सुध्दा ती जागा विकायचं ठरवलं.
गंमत म्हणजे ती जागा कुणा व्यावसायिक व्यक्तीला किंवा गव्हर्नमेंटला न विकता त्यांनी ती त्यांच्या सारख्याच धार्मिक संघटनेला विकली. ती संघटना म्हणजे इस्कॉन- कृष्णभक्तीची चळवळ. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा दरवाजातच एक कृष्ण्वर्णिय साधक (अंगात भगवी कफनी, कपाळावर हरे कृष्णा वाल्या लोकांप्रमाणे गंध लावलेलं) हातात जपाची माळ घेवून बसलेला दिसला.
आम्हाला बघुन त्याने स्मित हास्य करून आमचं स्वागत केलं. दरवाजातून आत गेल्यावर पादत्राणे काढून ठेवण्यास एक स्टॅंड दिसला. पादत्राणे काढून आत प्रवेश केल्यावर एका मोठ्या पॅसेज मध्ये एक छोटासा स्वागत कक्ष होता. तिथे सगळी माहीती आणि पुस्तकं विक्रीसाठी एक साधक बसला होता. आत मध्ये शिरल्यावर आपण चर्चच्या इमारतीमध्ये आहोत असं कुठेही जाणवलं नाही. त्या पॅसेज मधुनच मुख्य मंदिरात जाण्यास प्रवेशद्वार होते. मुख्य मंदिर म्हणजेएक मोठा हॉलच होता.
मला काहीशी मुंबईला खार येथे असलेल्या इस्कॉन मंदिराची आठवण झाली. खारच्या मंदिरात सगळीकडे श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मूर्ती, चित्रं सगळीकडे दिसतात. तर इथे सगळ्या भिंतींवर महाभारताची चित्रं रंगवली होती. अश्वमित्र पूर्वी इथे दर रविवारी महाप्रसाद घेण्यास आणि कधी कधी त्यांच्या "गोविंदा" या शाकाहारी उपहारगृहात जेवण्यासाठी जात असे.
 त्याने पुरवलेल्या माहीती नुसार ही महाभारतावर आधारित चित्रं नविनच काढलेली आहेत. त्याच हॉल मध्ये एका बाजूला स्वामी प्रभूपाद (इस्कॉनचे संस्थापक) यांची मूर्ती आणि त्यांच्या मूर्ती समोरच्याच बाजूला मोठ्या देव्हार्‍यात राधा-श्रीकृष्ण यांच्या मूर्ती. दुपारची वेळ असल्याने राधा-कृष्णाच्या मूर्तींचा गाभारा बंद होता. इस्कॉन मधील श्वेतेवर्णीयांची वाढती संख्या आणि एका कृष्णवर्णियाचे अस्तित्त्व पाहून हरे कृष्णा मुव्हमेंटची तिथली वाढती लोकप्रीयता लक्षात येते.
गंमत म्हणजे मला आम्ही एकदा यंग आणि डंडास या दोन रस्त्यांच्या मधोमध चौकात रस्ता ओलांडत असताना पाहीलेला प्रसंग आठवला. दोन-तीन तरूण कशावरून तरी मोठयाने वाद घालत होते आणि ते पाहण्यासाठी आपल्याकडच्या सारखी बघ्यांची गर्दी पण झालेली होती. तिथून जाताजाता जे कानावर पडले त्यातून अधिक कुतुहल जागृत झालं म्हणून आम्ही पण तिथं दोन मिनीटं थांबलो. एक श्वेतवर्णीय आणि एक कृष्णवर्णीय तरूण हातात बायबल घेवून रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या लोकांना बायबल मधले काही संदेश बळच सांगून ख्रिश्चन धर्मच कसा चांगला आहे, येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही इ. इ. बोलून इतरांना कन्वीन्स करण्याचा प्रयत्न करत होते. सभोवताली जमलेल्यांपैकी दोघे जण (श्वेतवर्णीय) त्यांना आव्हान देत होते आणि त्यांचा वाद चालू होता की ते सांगताहेत ते कसं खोटंय ते. हे आत्ता आठवण्याचं कारण असं की इस्कॉन ही सुध्दा तसं पाहीलं तर मिशनरी संघटना आहे.  इस्कॉनच्या लोकांना सुध्दा मी रस्त्यावरून जाताना (भारतात) पुस्तकं विकताना पाहीलं आहे. जर कधी तुम्ही इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरात गेलात तर तिथले काही साधक सुध्दा तुम्हाला असंच कन्व्हीन्स करण्याचा प्रयत्न करतात की कृष्णभक्ती शिवाय पर्याय नाही. तसं पाहीलं तर हिंदू धर्मातील लोक अशाप्रकारे कुणाला हिंदू धर्मच कसा श्रेष्ट आहे हे कन्व्हीन्स करायला गेल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही. इस्कॉन ही संघटना जरी हिंदू धर्माशी आणि कृष्णभक्तीशी निगडीत असली तरी तिची स्थापना, वाढ हे सगळं पाश्चात्य देशांत झालेलं आहे. म्हणूनच तर इस्कॉन चे साधक आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे यांच्यात "आपल्या धर्माविषयी, पंथाविषयी इतरांना कन्व्हीन्स करणे" ह्यात साम्य नसेल? हा एक संशोधनाचा विषय होईल.