Saturday 16 October 2010

स्वातंत्र्याचे लेखक - फ्रीडम रायटर्स!!

(छायाचित्र महाजालावरून साभार)
१९९२ साली लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीयामधील विविध वांशिक गटांमधील दंगलींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शिक्षण मंडळ, कॅलीफोर्नीया हे लॉस एंजलीस मधील एका नामांकीत शाळेत एक धाडसी शैक्षणिक अभ्यासक्रम चालू करते. इंटीग्रेटेड स्कूल प्रोग्रॅम असे त्या अभ्यासक्रमाचे नाव. ह्या अभ्यासक्रमाचा उद्देश हा फारसे शाळेत न गेलेले, काही कारणामुळे याआधीच शाळांना रामराम ठोकलेले, विविध कारणांमुळे तुरूंगात गेलेले, रस्त्यवर राहणारे अशा विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून त्यांना पुढचे शिक्षण घेण्यास उद्युक्त करणे हा असतो. या वर्गात विविध एथनिसीटी असलेली म्हणजेच कृष्णवर्णीय, कंबोडीयन, मेक्सीकन, हिस्पॅनिक, व्हाईट अशा विविध वंशांची मुलं-मुली असतात. या मुलांना शिकवण्यासाठी एक नवी अतिशय तरूण इंग्लीश शिक्षिका येते. हे काम तिने स्वेच्छेने स्विकारलेलं असतं कारण तिला या मुलांना शिकवण्यात रस असतो. पहिल्याच दिवशी शाळेची उपमुख्याध्यापिका तिला त्या मुलांची वर्गातील परिस्थिती आणि त्यांचे गुण याविषयी सूचना देऊन सावध करते. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा सोडून जाणे आणि शाळेची पत कमी होणे यासाठी या अभ्यासक्रमाच्या मुलांना जबाबदार धरलेले असते. त्यांना शिकण्याची इच्छाच नाहीये, त्यांना शिस्त नाहीये वर्गात कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते यासारख्या कानपिचक्या देऊनच उपमुख्याध्यापिका तिला तिचे शिकवण्याचे नियोजन बदलायला सांगतात. सुरूवातीचे काही दिवस वर्गात आणि वर्गाबाहेर अक्षरश: राडा म्हणजे प्रचंड मारामारी म्हणजे अगदी गोळीबाराच्या तयारीने मुलं येणं  इत्यादी होते. तिला त्यामुळे या मुलांना शिकायला प्रवृत्त कसं करायचं हेच लक्षात येत नसतं. त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यात अधिक रस निर्माण व्हावा म्हणून ती पुष्कळ प्रयत्न करते आणि शेवटी तिच्या लक्षात येतं की जोपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्याशी निगडीत, त्यांना समजून घेईल असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षणात रस वाटणार नाही. ती त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करते. त्यांना खेळांच्या माध्यमांतून, वेगवेगळी चांगली पुस्तकं वाचायला देणं, बाहेर ट्रीपला घेवून जाणं, मुझीयम्स ना भेटी देणं, बाहेर एकत्र जेवायला घेऊन जाणं असे अनेक नवनविन उपक्रम करते. यात शाळेकडून तिला कोणतीच मदत मिळत नाही कारण त्यांचं सगळ्यांचं मत असतं की ह्या मुलांना शिकवणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे.
    या सिनेमात एखादा चांगला शिक्षक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना शिक्षणात रस वाटावा यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवलं आहे. या चित्रपटातून अमेरिकेसारख्या सांस्कृतिक आणि  वांशिक विविधता असलेल्या राष्ट्रात या विविध गटांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र, नविन शैक्षणिक प्रयोग, शिक्षकांचं मानसशास्त्र, समूहाचं मानसशास्त्र यासगळ्याचं उत्तम दर्शन घडवलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्या मुलांसाठी ती इंग्लीश शिक्षिका काय काय करते, त्या प्रयोगांचा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर तसेच त्या शिक्षिकेच्या वैयक्तीक आयुष्यावर काय परिणाम होतो? त्यातील किती विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमांना जातात हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. चित्रपट १९९९ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असून त्याचे दिग्दर्शक आणि लेखक रीचर्ड लाग्राव्हेन्सी हे आहेत.
    योगायोगाची गोष्ट अशी की अशाच प्रकारची घटना १९९९ च्या सुमारास मी एका शाळेत शिकवत असताना माझ्या आयुष्यात घडून गेली. त्यासगळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या.  मी त्यावेळी आसाम मधील एका शाळेत गणित शिकवत होते. मलाही त्यावेळी एक आव्हान म्हणून आणि मुद्दाम अभ्यासात कच्च्या, आत्मविश्वास नसलेल्या, सर्व शाळेत डफर याच संबोधनाने परिचित असलेला वर्ग दिला होता. गंमत म्हणजे त्यांची तुलना कायम त्यांच्या पुढे एक वर्ष असलेल्या वर्गाशी केली जात असे. यासगळ्याचा परिणाम त्या वर्गाच्या मानसिकतेवर, आत्मविश्वासावर, अभ्यासावर, गुणांवर न झाला असता तरच नवल. मला त्यांना यासगळ्यातून बाहेर काढून जमेल तसं गणित शिकवायचं होतं. बरं तो वर्ग इयत्ता नववीचा वर्ग होता. म्हणजे मला त्यांच्यावर काम करायला जेमतेम एक वर्षाचा कालावधी होता. मला वर्गातील मुलांनी सांगीतलं की गेल्या दोन वर्षांत एकूण ८ गणिताचे शिक्षक बदलले आणि मी आठवी. अशाप्रकारे शिक्षक सोडून जाण्याने किंवा बदलल्याने त्याचा मुलांच्या मूलभूत संकल्पना निर्मितीवर प्रचंड वाईट परिणाम होतो. त्याचा प्रत्यय तर मला येतच होता. मी त्या वर्गाची क्लास टिचर होते. त्यासगळ्या प्रकारात अजुन एक मेख होती की एका स्थानिक टिचरला (की जो दोन वर्षांपूर्वी त्याच शाळेत शिकवत होता पण त्याच्या गैरवर्तनामुळे त्याला शाळेतून कमी केले होते) त्या शाळेत इंटरेस्ट होता. त्याला शाळेतल्याच काही शिक्षकांचीही साथ होती. म्हणूनच दोन वर्षांत त्याने ७ शिक्षकांना पळवुन लावलं होतं. मला मुद्दामच त्या ठीकाणी टाकलं होतं. हळूहळू विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करून, त्याचवेळी त्या स्थानिक शिक्षकाने केलेल्या काड्यांना तोंड देत मी माझं काम चालू ठेवलं. काही वेळा मुख्याध्यापिकांची साथ होती काहीवेळा नव्हती. एक-दोन वेळा मला धमक्या मिळाल्या की स्थानिक वर्तमानपत्रात तुमच्या बद्धल बदनामीकारक मजकूर छापू वगैरे पण मीही यासगळ्याला धैर्याने तोंड दिलं. आता मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं की तेवढं बळ मला माझ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जुळलेल्या बंधांमधुन मिळालं होतं. केवळ त्यांचं नुकसान होवू द्यायचं नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा येवढंच एक ध्येय डोळ्यांसमोर होतं. त्यावेळी केवळ अभ्यास आणि गणितच नाही तर मी अगदी त्यामुलांना राष्ट्रभक्तीपर गीतं सुद्धा शिकवुन गायला लावली होती. आमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळाच बंध निर्माण झाला होता. त्याचा शेवट फक्त एकाच प्रसंगात सांगते म्हणजे कल्पना येईल, मी ज्यावेळी पुण्याला परत यायला निघाले त्यावेळी पूर्ण वर्ग त्यांच्या गणवेषात मला सोडायला बस स्थानकावर आला होता. हे असलं दृष्य मी माझ्या आयुष्यात आणि त्या गावाने सुद्धा पहिल्यांदाच अनुभवलं होतं. अजुनही मी त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यातील अपेक्षित सुधारणा होण्यास मी एक निमित्तमात्र झाले ह्यातच मला आनंद वाटतो. नाहीतर आपण इतके सामान्य असतो की फारसं काहीच करू शकत नाही. असो.
"फ्रीडम रायटर्स" हा चित्रपट पाहीला नसेल तर जरूर पहा. एक उत्तम प्रतिचा उद्बोधक असा चित्रपट अशी मी त्याची गणती करते. चित्रपटाचं आणि त्या सत्य घटनेवर आधारित कादंबरीचं नाव फ्रीडम रायटर्स का आहे हे चित्रपट पाहील्यावरच समजेल.

3 comments:

  1. ताई,
    तुझा अनुभव एकदम विलक्षण आहे गं! मला तुझा अभिमान वाटला वाचून!
    आणि हा फ्रीडम रायटर्स हा सिनेमा, मुंबईला माझ्या पीसीवर पडून आहे. का कुणास ठाऊक मी नंतर नंतर करत ठेवून दिला होता. आता फारच उत्सुकता लागलीय बघायची!

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रोफेटा. अरे जर विद्यार्थ्यांपर्यंत खर्‍या अर्थाने पोहोचणारे शिक्षक मिळाले तर आपला देश कुठल्या कुठे जाईल. आपल्या अतिदुर्गम भागात आणि खेडोपाडी अशा शिक्षकांची नितांत गरज आहे. फ्रिडम रायटर्स हा चित्रपट मी २ वेळा बघीतला. शिक्ष आणि विद्यार्थी यांच्यात जर बंध निर्माण झाले तर ते खरंच खूप अतूट आणि वेगळे असतात रे. मी सहा वर्षं शाळांमध्ये शिकवलं आहे. मी अजुनही माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिस करते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. अरे आसाम मधले दिवस तर माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते म्हणजे आपल्या क्षमता तपासणे आणि त्यांची प्रचिती घेण्याचे. मी ते कधीच विसरू शकणार नाही. :-)

    ReplyDelete
  3. ताई, फ्रिडम रायटर्स सिनेमा पाहीला आणि हिलरी श्वांकचा पंखा झालो त्यावेळी.. आणि विभि म्हणतो तसा आता तुझा अभिमान वाटतो आहे.. ब्राव्हो!

    ReplyDelete