मी मुख्यत: ज्या कामासाठी कॅनडा मध्ये गेले होते त्यातील एक काम म्हणजे एड-मिडीया कॉन्फरन्स मध्ये पेपर प्रेझेंट करणे. कॉन्फरन्स टोरंटो मधील प्रसिध्द फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये (वेन्स्टीन हार्बर कॅसल) येथे भरली होती. त्या स्थानाचं महत्त्व म्हणजे आमची कॉन्फरन्स सुरू होण्याआधी तिथे जी-२० कॉन्फरन्स भरली होती आणि सगळ्या जी-२० देशांतील महत्त्वाच्या व्यक्ती त्याच हॉटेल मध्ये राहील्या होत्या.
मी असं ऐकलं की टोरंटो मधील नागरीकांना जी-२० कॉन्फरन्स टोरंटो मध्ये नको होती कारण त्यात सगळ्या वादग्रस्त मुद्यांवर मानवी मुल्ये बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. त्याचाच निषेध म्हणून जी-२० दरम्यान तिथे खूप मोठी निदर्शने झाली. सुरक्षेचा भाग म्हणून टोरंटो डाऊन टाऊन भागात हवाई दलाची हेलीकॉप्टर्स फिरत होती. टोरंटो मधील नागरीकांनी कधीच न पाहीली इतकी सुरक्षाव्यवस्था तैनात होती. त्यामुळे त्याभागाला एका युध्दभूमीचंच स्वरूप आलेलं होतं. आमची कॉन्फरन्स चालू झाली तेव्हा मात्रं आदल्याच दिवशी दुपारी ह्या सगळ्या गोष्टी संपल्या होत्या.
अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये जाण्याचा माझा पहीलाच प्रसंग. बर्याच देशांतून डेलीगेट्स आले होते. विषेषत: युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा, चीन, जपान, कोरीया, तैवान आणि काही मध्य पूर्वेतील देशांतून आले होते. भारतातून बहुधा मी एकटीच होते. अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये एकाच वेळी समांतर असे १२ पेक्षा जास्ती सेशन्स चालू होते. त्यात की-नोट स्पीकर्स, इन्व्हायटेड स्पीकर्स, ग्रॅड्युएट स्टुडंट्स साठीची लेक्चर्स असं सगळं एकाच वेळी ठेवलं होतं. त्यामुळे एकूण सहभागी सदस्य खूप असले तरी प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये ते विभागले जात. त्यामागील हेतू असा की प्रत्येक सदस्याला त्याला/तिला महत्त्वाचा वाटत असेल अशाच विषयाचं प्रेझेंटेशन बघता येईल. मला धास्तीच वाटत होती की माझ्या प्रेझेंटेशनला कोणी येतंय की नाही कारण माझं नाव कुणाला माहीती नाही, माझी इन्स्टीट्युशन कुणाला माहीती नाही. त्यामुळे आले तर फक्त विषय बघुनच येतील. त्यात मी पी एच डी स्टुडंट त्यामुळे स्टुडंट्च चं ऐकायला किती लोक उत्सुक असतील असं मला वाटलं. पण जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ आली त्यावेळी त्या ठिकाणी १०-१५ लोक बघुन जरा हायसं वाटलं. काही काही प्रेझेंटेशन्स मध्ये फक्त २-३ लोकच होते, काही ठेकाणी फक्त प्रेझेंटर्सच होते. त्या तूलनेत मी मला भाग्यवान समजते. हे सगळे लोक विषयाचं नाव बघुन आले होते हे विशेष. प्रेझेंटेशन झालं आणि नंतर लोकांनी प्रश्न सुध्दा विचारले. जेव्हा एखाद्या प्रेझेंटेशन नंतर लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्याचा अर्थ असा की लोकांना प्रेझेंटेशन समजलं आणि इंटरेस्टींग वाटलं. जर काही समजलंच नाही आणि इंटरेस्टींग वाटलं नाही तर प्रश्नच विचारले जात नाहीत. माझ्या आधी ज्या जपानी माणसाचं प्रेझेंटेशन होतं त्याचा विषय बहुधा कोणाला नीट कळला नाही किंवा इंटरेस्टींग वाटला नाही. म्हणून त्याला कोणीच प्रश्न विचारले नाहीत.
आता अनेक जणांच्या मनात हा प्रश्न उभा राहीला असेल की या सगळ्या कॉन्फरन्स आयोजन करणे आणि त्या अॅटेंड करणे याला इतकं महत्त्व का? मुख्यं म्हणजे त्या कॉन्फरन्स मध्ये आपला पेपर प्रेझेंट करणं याला इतकं महत्त्व का? याला अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे आपल्याच विषयात जगभरात कुठे कुठे काय काम चालू आहे याची अद्ययावत माहीती मिळते. त्यावर काम करणार्या लोकांशी भेटीगाठी होवून माहीतीचे आदानप्रदान होत असते. आपल्याला जर एखादी उपटुडेट गोष्ट माहीती नसेल तर त्याची माहीती आपल्याला मिळू शकते. जगभरातील इतर युनीव्हर्सीटीज मध्ये काम करणार्या लोकांशी आपला संपर्क होतो. मुख्य म्हणजे अशा कॉन्फरन्स मध्ये एखादा पेपर प्रसिध्द झाला म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाला मान्यता मिळते. ते सुध्दा सध्याच्या जागतिक पातळीच्या रीसर्च आणि अॅकॅडमीक कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर काही लोक कुठल्याही कॉन्फरन्स किंवा जर्नल मध्ये आपलं झालेलं काम प्रसिध्द न करता तसंच चालू ठेवतात त्याला जागतिक पातळीवर फारसं महत्त्व नसतं. पण अशा कॉन्फरन्सला जाण्यासाठी पैसा सुध्दा खूप लागतो. ज्यांचं काम चांगलं असेल अशांना काही संस्था कॉन्फरन्स अटेंड करण्या करता ग्रॅन्टस देतात. माझा कॉन्फरन्सचा खर्च माझ्या एच पी लॅब्स इंडीयाच्या फेलोशिप मधून झाला. खरंतर पी एच डी करणे याविषयी अनेक लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. अनेकांचं मत असं आहे की पी एच डी करण्याचा काही उपयोग नसतो. या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. यावर आधारित एक लेख मी लवकरच शतपावलीवर टाकेन आणि अनेकांचे गैरसमज ज्यामुळे झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. असो.
यासगळ्या दौर्या मध्ये तसेच माझ्या केंब्रीजमधील वास्तव्या मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषा आपल्याला वाटते तितकी प्रचंड वापरली जात नाही. कॅनडामध्ये फिरताना तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तर हे खूपच जाणवले की इथे इंग्रजी पेक्षा इतर भाषिकच लोक जास्त आढळले. इतर भाषाच जास्त कानावर पडल्या. गंमत म्हणजे इतर भाषिक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांत बोलतात पण भारतीय लोक एकमेकांशी इंग्रजीतूनच बोलतात. आपली अशी एक राष्ट्रभाषा असायला हवी. भाषिक प्रांतवादाचं राजकारण करून हिंदीला जी बगल दिली जात आहे ती योग्य नव्हे. याचा अर्थ मुंबईत सगळे व्यवहार हिंदीतून व्हावेत असं नाही. पण आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावर आपल्या देशातील लोक एका सामायिक भाषेत बोलू शकले तर किती बरं होईल. मला आठवतंय, मागे एकदा बंगलोर मध्ये आम्ही आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्स मध्ये आम्ही सगळे भारतीय एकमेकांशी इंग्रजीत बोलत होतो आणि एका चिली हून आलेल्या प्राध्यापकांनी मला हा प्रश्न विचारला की भारताची राष्ट्रभाषा इंग्रजी कशी काय? मला जरा ओशाळल्यासारखंच झालं. मग मी त्यांना आपल्याकडील दक्षिण आणि उत्तरेकडील भाषांचा वाद याविषयी थोडं सांगीतलं आणि हिंदी ही तशी राष्ट्रभाषा समजली जाते कारण जास्तीत जास्त लोकांना हिंदी समजतं आणि बोलता येतं. आपण युरोपीय देशांसारखं का नाही करत? कोणत्याही युरोपीय देशातील शिकलेल्या व्यक्तीला इंग्रजी शिवाय आणि त्यांच्या मातृभाषे शिवाय फ्रेंच, इटालियन, जर्मन इ. भाषा येत असतात. मग आपल्यालाच का आपल्या देशांतील भाषा शिकण्याचं वावडं असावं? असो.
म्हणजे अगदी अॅकॅडमीक रीसर्च जगतात सुध्दा चांगलं काम हे त्या त्या देशांच्या मातृभाषांतूनच होतं. मला कौतुक वाटतं ते चीन, जपान, कोरीया, तैवान, युरोपीय देश यांमध्ये काम करणार्या लोकांचं. त्यांचं सगळं काम हे मुख्यत: त्यांच्या देशाशी नाळ जोडणारं आणि त्यांच्या भाषां मध्ये असतं. याचा अर्थ क्वालीटी मध्ये कुठेही कॉम्प्रमाईझ नाही. त्यांच्या कामाची क्वालीटी ही इंग्लीश स्पीकिंग देशांसारखीच आहे. किंबहुना बर्याचवेळा क्वालीटी जास्त चांगली असते. त्यांची सगळी सॉफ्टवेअर्स सुध्दा त्यांच्या भाषां मधुनच असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या भाषांबध्दल, त्यांत बोलण्याबध्दल, त्यांचा वापर करण्यबध्दल कमीपणा वाटत नाही. मला असं वाटतं की आपण हे सगळं यालोकां कडून शिकण्यासारखं आहे. आपल्या कडे टॅलंट आहे, बुध्दीमत्ता आहे. मग आपणच का आपल्या मातृभाषेतून क्वालीटीचं काम करायला कमीपणा मानतो. मातृभाषेतून शिक्षण घेण्यात कमीपणा मानतो?....हे अजुनही न उलगडणारं कोडं आहे. का अजुनही आपण गुलामगीरीच्या मानसिकतेतून बाहेरच पडलेलो नाही. आपल्याकडे मराठी माध्यमातून होणार्या कामाची क्वालीटी वाईट का असते? ह्या प्रश्नांची उत्तरं गांभीर्याने शोधायला हवीत. मला असं वाटतं की नुसताच मातृभाषेचा वृथा अभिमान धरूनही उपयोग नाही. आपण सध्या तरी इंग्रजीचा वापर अद्ययावत ज्ञान शिकण्यासाठी करावा आणि शिकलेलं ज्ञान स्वत:पुरतंच मर्यादीत न ठेवता त्याचा मातृभाषेत वापर कसा करता येईल, ते ज्ञान मातृभाषेत कसं आणता येईल याचा प्रयत्न झाला पाहीजे. हे सगळं काम आजीबात सोपं नाही. काही दशकं जर हे काम केलं तर आपल्या पुढच्या ३ पीढ्यांनंतर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. मला तर असलं काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आपल्याकडे लोकांनी गटबाजी, एकमेकांचे पाय ओढणे, स्वार्थीपणा, तुम्ही आम्हाला काय शिकवणार, आम्हाला सांगणारे तुम्ही कोण हे असले प्रकार बाजूला ठेवले तर असं काम करणं खरंच शक्य आहे. आणि मग तीन पीढ्यांनंतर आपल्याला पण अशा जागतिक दर्जाच्या कॉन्फरन्स मध्ये भारतीयांची संख्या अधिक दिसायला सुरूवात होईल. हा सगळा पोकळ आशावाद नाहीये. असं खरंच होवू शकतं. आपली इच्छा शक्ती पाहीजे.