Friday 16 April 2010

आमची पहीली ट्रीप!

आमचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी आम्हि दोघेही खूप बिझी होतो. लग्न सुध्दा अगदी दोन तासाच्या वैदिक विधींमध्ये संपन्न झालं. नवर्‍याचं पी. एच. डी. चालू होतं आणि मला नुकतीच एका कॉलेज मध्ये लेक्चररशीप मिळाली होती. त्यामुळे सुट्टी मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे लग्नानंतरचे फिरायला जाणे वगैरे झालेच नाही. साधारण ७-८ महिन्यांनी मला जून मध्ये उन्हाळ्याची सुट्टी (पावसाळ्याच्या सुरूवातीला) मिळाली. आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्याचं ठरवलं. त्याला दोन कारणं होती. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर आणि परिसर अतिशय सुंदर असतो. माझ्या नवर्‍याला ज्योतीर्लिंग म्हणजे काय हे नीट दाखवायचं होतं. अरे सांगायचंच राहीलं माझा नवरा एक परदेशी आहे. पण त्याला हिंदू धर्म- भारतीय संस्कृती याचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे त्याला इतर टुरिस्ट जिथे जातात (उदा. गोवा) तिथे जायला आजीबात आवडत नाही. त्यामुळे हळूहळू त्याला आपल्या संस्कृतीची खरी ओळख करून देणे चालूच असते.

तर आम्ही भर दुपारी एक वाजतची एशीयाड पकडून नासिक मार्गे रात्री अकराच्या पंधरा मिनिटे आधी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे भक्तनिवास आहे तिथेच सामान घेऊन गेलो. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या स्वागत कक्षामध्ये एक तरूण स्त्री एका परदेशी माणसा बरोबर बघुन तिथल्या व्यवस्थापकांचे तसेच आजूबाजूच्या भक्तांचे (जे कक्ष मिळवण्यासाठीच्या प्रतिक्षेत होते, निवांतपणे रात्रीची हवा खायला बसलेले) डोळे आश्चर्याने मोठे झाले. मी अगदी सहजपणे काऊंटरपाशी जाऊन एक डबल रूम मिळेल कां असे विचारले? मला लग्नानंतर एका परदेशी- गोर्‍या माणसा बरोबर वावरायची इतकी सवय झाली होती की त्या लोकांच्या मनात काय चालू असेल ही कल्पना सुध्दा मनाला शिवली नाही. त्या काऊंटर वरील माणसाने मला पुन्हा विचारले की कोणासाठी डबल रूम? मी सहजपणे म्हणाले मी आणि माझ्या मिस्टरांसाठी. त्याने मला लगेच मॅरेज सर्टीफीकेट मागीतले. मला क्षणभर कळेच ना की तो माझ्याकडे मॅरेज सर्टीफीकेट का मागतोय ते. मी त्याला लगेचच कारण विचारलं. तो जेव्हा हे म्हणाला की तुमचं दोघांचं लग्न झालं आहे याला पुरावा काय? तेव्हा कुठे सगळा प्रकार लक्षात आला. नेमकी निघताना खूपच घाई झाल्याने (नेहमीप्रमाणे) बाबांनी आधीच आठवण करून देऊन सुध्दा आम्ही दोघेही मॅरेज सर्टीफीकेट बरोबर घ्यायला विसरलो. मी त्याला पुष्कळ सांगायचा प्रयत्न केला, लग्नाचे फोटो (डिजीटल कॉपीज) दाखवते, वडिलांशी फोन वर बोलून खात्री करून घ्या वगैरे सगळे प्रकार सुचवुन झाले. पण हा मॅरेज सर्टीफीकेट वरच अडून राहिलेला. शेवटी त्याला सांगीतलं की आम्ही ते आणायला विसरलो आहोत. आता काय करायचं? तो पर्यंत रात्रीचे ११.१५ झालेले. गावात इतर कुठे जायचे तर खूपच उशीर झालेला. शेवटी त्याच्या कडे पुण्याला घरी फोन करायची परवानगी मागीतली. बाबांशी बोलल्यावर त्याला विचारले इथे फॅक्स मशीन आहे का? ते नाही म्हंटल्यावर बाबांनी घरून इ-मेल ने स्कॅन केलेली कॉपी पाठवण्याचा पर्यायपण बंद झाला. तो पर्यंत ११.३० होत आलेले. मी त्यांना इतक्या रात्रीचे आम्ही कुठे जाणार म्हंटल्यावर तुम्हाला आजच्या पुरती सार्वजनिक खोलीत (एका खोलीत १५-२० जण) जागा देतो असे म्हणाले. आमची तोंडं अगदी इवलीशी झाली होती. माझाही हा पहिलाच अनुभव त्यामुळे आता काय करावे याचा एकमेकांत विचार विनीमय करत असताना (कारण नक्की काय चालू आहे हे माझ्या नवर्‍याला मराठी त्यावेळेस येत नसल्याने समजलं नव्हतं, तसेच जर सार्वजनिक खोलीत रहायची वेळ आलीच तर त्याची मानसिक तयारी करण्यासाठी..........मी एकटीच खिंड लढवत होते.....अजुनही ९९% मलाच खिंड लढवावी लागते...असो) एकदम त्यांच्यातील एक माणूस म्हणाला की त्यांच्या कडे अजुन एक उपाय आहे. मग त्याने मला तो उपाय सांगीतला.


उपाय भन्नाटच होता. म्हणजे त्यावेळी तरी मला तसच वाटलं. त्यांनी आम्हाला दोघांना दोन वेगवेगळे फॉर्म्स दिले. एक नवर्‍याने भरायचा (त्याची स्वत:ची तसेच बायकोची पूर्ण माहीती म्हणजे अगदी बहीण-भावंडे, घरातील इतर सगळे यांची नावे, व्यवसाय, त्यांची असलेली नाती इ. ) आणि तसाच फॉर्म बायकोने भरायचा. फॉर्म भरताना दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत नेले म्हणजे आम्ही कॉपी करणार नाही. मला जरा हा प्रकार धोकादायकच वाटला. कारण बर्‍याच वेळा नवरे लोकांच्या बायकोच्या माहेरच्यांची नावे लक्षातच नसतात. आणि त्यातून माझा नवरा तर परदेशी. जरी तो संस्कॄत पंडित असला तरी माझ्या तीन बहीणी त्यांचे नवरे आणि मुले या सगळ्यांची नावे, त्यांचे व्यवसाय कसे लक्षात राहतील, तसेच माझी आई माझ्या लग्ना आधीच निवर्तल्याने तिचे नाव तर याच्या लक्षात रहाणे शक्यच नाही. मी तसे लगेच त्यांना सांगून टाकले. आमच्या दोघांचेही प्रश्नपत्रिका सोडवुन झाल्यावर त्यांनी आमच्या उत्तरपत्रिका मॅच करून पाहील्या. जस जशी सगळी उत्तरं मॅच व्हायला लागली तसतसे त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला लागले. मला एक महत्दाश्चर्याचा धक्का म्हणजे माझ्या नवर्‍याने सगळी माहीती (सगळ्यांच्या नावांसकट अगदी माझ्या आईच्या नावासहित) व्यवस्थित लिहीली होती. मला जास्त काळजी कारण माझ्या कडची नावं आणि माणसं यांची संख्या त्याच्याकडच्या तुलनेत खूपच जास्त होती. जेव्हा सगळीच माहीती बरोबर आणि अचूक निघाली तेव्हा मात्र त्यांनी आमची माफी मागीतली आणि हे सुध्द्दा सांगीतलं की आम्हाला इतकं कठोर व्हावच लागतं नाहीतर आम्ही क्षेत्राचं पावित्र्यं कसं राखणार? आणि तुमच्या कडे पाहून वाटलं की जर तुम्ही खरंच लग्न झालेले असाल तर तुम्हाला एकमेकांची पूर्ण माहीती असेलच. तेव्हा आम्ही तुम्हाला ते फॉर्म्स भरून देण्यास सांगण्याचं ठरवलं. पुढे आमचा तिथला निवास अतिशय छान झाला हे वेगळं सांगायलाच नको. अगदी आम्ही आमचा निवास एक दिवसाने वाढवण्या इतपत आम्हाला त्या सगळ्या परिसरात छान वाटलं. गंमत म्हणजे, भक्तनिवास मधील व्यवस्थापक स्वयंसेवकांना एक परदेशी गोरा माणूस आपल्या सारखाच, भोजनगृहात सगळ्यांबरोबर हाताने जेवतो (चमचा न वापरता) याचं अपरूप वाटत होतं.  अगदी नाही म्हणायला पहिल्या दिवशी मंदिराच्या बाहेर असलेल्या पाटीने "फक्त हिंदू धर्मियांनाच परवानगी" या फलकाने थोडं नाराज व्हायला झालं. पण नंतर काही जणांनी सांगीतलं की आत जायला काहीच हरकत नाही फक्त गाभर्‍यात सोवळे नेसलेल्यांनाच किंवा ओलेत्यानेच प्रवेश आहे. आमच्या गाभार्‍यात जाणे महत्वाचे नसून देवाचे लांबून दर्शन घेणे व मंदिराचे प्राचीन हेमाडपंथीय कोरीवकाम पहाणे यालाच अधिक प्राधान्य होते.

लग्नानंतरच्या या पहिल्याच ट्रीपने आम्हाला बरेच धडे दिले की जे आम्हाला आमच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यात खूपच उपयोगी पडले आहेत.

25 comments:

  1. खूप छान झालीये पोस्ट. एकदम वेगळा अनुभव.. अर्थात तुम्हाला अशा अनुभवांची सवय झाली असेल आता. :-)

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब! हो ना.....मला आता असल्या वेगळ्याच अनुभवांची खूप सवय झाली आहे. आंतरराष्ट्रीय लग्न करणारे जास्तीत जास्त लोक परदेशातच वास्तव्य करतात आणि कामा निमित्तच भारतात येतात. पण आमची केस वेगळी असल्याने आम्हाला येणारे अनुभव (विशेषत: माझ्या नवर्‍याला येणारे स्थानिकांचे अनुभव, शासकिय यंत्रणेचे अनुभव) फारच वेगळे आहेत. शांतता, रांगेचा वापर, स्पेस अश्या संकल्पनाच भारतात नाहीत असे त्याचे मत आहे :-) पण त्यामुळे त्याचा इथे राहण्याचा उत्साह कमी झालेला नाही. :):)

    ReplyDelete
  3. मस्त कथन केलाय अनुभव. :)

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर अनुभव. मी सकाळी एकदा वाचला, आता पुन्हा दुसऱ्यांदा वाचायला आलो, कारण सकाळी परीकथेमधल्या गोष्टीसारखं वाटत होतं वाचतांना :)

    पण खरं सांगतो, मजा आली वाचायला. :)अजून पुढल्या पोस्टची वाट पहातोय..

    ReplyDelete
  5. धन्यवाद कुलकर्णी काका!

    खरंतर माझ्याकडे वेगवेगळ्या अनुभवांचा खजीनाच आहे. पण आपल्या देव काकांनी "माझे पूर्वानुभव" आधीच कॉपी राईट करून ठेवले (म्हणजे ब्लॉगचे नाव) त्यामुळे मी शतपावलीच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करेन. :):)

    ReplyDelete
  6. Baap re....!!! Kase handle karata he sagale tumhi....Strange....!!!
    Anubhav kathan kharech sahiye pan....!!!
    Aani tumache baaki sagale anubhav aikayala khoop aavadel aamhala...

    ReplyDelete
  7. tumi 1 tine handle karne farch vegla experience hota genrally aplya kade kute baher gelyavar sarv kahi navrach handle karto na . nice i like it

    ReplyDelete
  8. @Maithili: धन्यवाद ब्लॉगला भेट दिल्याबध्दल. पाण्यात पडलं की पोहोता येतं म्हणतात तसंच काहीसं आहे. थोडं आपल्या संस्कृतीला सोडून वाटतं ....पण वेळ आली की सगळं करायची ताकद देवच देतो. :-) नवीन पोस्ट नक्की वाचा.

    @ Kiran: आपण जेव्हा स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा करतो तेव्हा सगळं समान वाटलं गेलं पाहिजे नं! अगदी जबाबदारी सुध्दा. खरयं नं?

    ReplyDelete
  9. सर्वात पहिले मला ही गोष्ट खूप आवडली कि परदेशी माणसाला आपल्या संस्कुतीत आवड आहे आणि तुम्ही त्याचा बरोबर आहात....
    दुसरी गोष्ट ती होटेल वाल्यांची....कि त्यांनी प्रमाणपत्र मागितलं (पावित्र्य राखण्याकरिता)....आणि तुम्हला दिलेल्या परीक्षे बद्दल...पण ते सगळ्याच जोडप्यांना विचारतात का???
    आणि ३ गोष्ट कि तुम्ही ती परीक्षा पास झालात....
    वेगळाच अनुभव होतं....आणि आम्हला वाचायला ही चं वाटलं....
    धन्यवाद.....

    ReplyDelete
  10. नाही, तसे ते सगळ्याच जोडप्यांना नाही विचारत. पण माझा नवरा परदेशी होता नं. आणि बहुधा त्यांना जर असं वाटलं (इतर भारतीय जोडप्यांच्या बाबतीत ) तर ते त्यांना पण विचारू शकतात.

    एक गंमत आठवली: माझा एक सहकारी (तेलगु आहे तो) त्याच्या एका स्विस मैत्रीणीला घेऊन भारतातच फिरायला गेला. तसा वयाने तो २४-२५ वर्षांचाच. तरी त्याला तिथल्या हॉटेल वाल्यांनी मॅरेज सर्टीफीकेट विचारलं नाही. तो तिथे ३ दिवस मुक्कामाला होता. कदाचित हे शेगावच्या गजानन महाराज सेवा प्रतिष्ठानचं असेल आणि त्र्यंबकेश्वर सारखं क्षेत्राचं ठिकाण असेल म्हणून विचारलं असेल.

    ReplyDelete
  11. TUMHI AJUN TUMCHE BHARPUR ANUBHAV LIHA.

    ReplyDelete
  12. हा ब्लॉग वाचत रहा. हळूहळू अनुभवांचा खजीना उघडणार आहे..........फक्त वैवाहिक आयुष्यातीलच नाही तर इतरही बरेच काही.....तेव्हा वाचत रहा!

    ReplyDelete
  13. hey ekdam mast mast mast............

    ReplyDelete
  14. tumacha haa anubhav khoopach saangoon gela. aataa mee tumache post niyamaane vaacheen. Regards.
    Mangesh Nabar

    ReplyDelete
  15. धनश्री, मनाब, धन्यवाद ब्लॉगला भेट दिल्या बध्दल!

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. tai,shalet astana amhi khup hatta kelyavar goshta sangaychat na tyachi athwan zali..

    ReplyDelete
  18. हं स्नेहा......खरं तर मला पण गोष्ट सांगायला खूप आवडतं. मी आसाम मध्ये असताना माझ्या दहावीच्या वर्गातील मुलं मला वर्षाच्या शेवटी म्हणाली की दिदि तुम्ही आम्हाला अब्दुल कलामांचे विंग्स ऑफ फायर जास्त शिकवलत....त्यातील फिजीक्स सकट :-):-) म्हणजे मॅथ्स तर शिकवलच होतं पण .....:):)

    मला पण तुमच्या सगळ्यांची आपण वर्गात केलेल्या गमंतींची आठवण येते नेहमी.

    ReplyDelete
  19. स्न्हेहा, अगं ते फिबोनासी चं पोस्ट पाहीलंस का? तो व्हिडीओ छान आहे. तुला फक्त व्हिडीओ पहाण्यास सांगेन त्या पोस्ट मधील मॅटरची तुला गरज नाही :-):-)

    ReplyDelete
  20. भन्नाट अनुभव... सुंदर लिखान...

    ReplyDelete
  21. Replies
    1. Humm, acted by Dr Kashinath Ghanekar. I have seen that movie in my childhood and now remember only the song "Madhu Ithe An Chandra Tithe"...........:-)

      Delete