Sunday 9 May 2010

माझे गरूडपुराण


बर्‍याच जणांना गरूडपुराण म्हणजे नक्की काय हे माहीती असण्याची शक्यताच आहे म्हणून ही प्रस्तावना: आपल्या पूर्वजांनी हिंदूधर्मात सर्व विषयांवर आधारित साहित्य (अगदी कामसूत्रा पासून ते गरूडपुराणा पर्यंत) लिहून ठेवलंय. गरूडपुराण हे माणूस मेल्यानंतर पुढे त्याचं म्हणजे आत्म्याचं काय होतं या विषयावर आधारित आहे. म्हणूनच गरूडपुराण हे अशुभ किंवा निषिध्द पण मानतात. त्यामुळेच ते पुराण कोणाला माहीती नसतं. आपल्याकडे सगळं गोड-गोड म्हणजेच गुडी-गुडी लागतं. अगदी एखाद्या चांगल्या बॉलीवूड पटाचा शेवट जरी दु:खी असेल तर तो पडतो किंवा दिग्दर्शकांना तो बदलून आनंदी-आनंद गडे करावा लागतो. पण मला हे पटत नाही. या लेखात आयुष्यातील जे अंतीम सत्य आहे तेच समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू पासून पळून जाण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्याला आपण जेवढ्या प्रगल्भतेने सामोरे जाऊ तेवढे आपले जगणे सुखाचे होते.  मोठ मोठ्या लोकांना याची महती पटली आहे. अगदी आचार्य अत्रे, व पु काळे यांनी सुद्धा त्यावर त्यांच्या त्यांच्या स्टाईल ने विनोद केले आहेत. कोणाचा शेवट कसा होईल कोणीच सांगू शकत नाही. मी दहावीत असताना वर्गातील एका मैत्रीणीचे वडील अपघातात गेले. तिला त्या दिवशी आम्ही सगळे (मित्रं) भेटायला गेलो तो माझा अशा घटनेशी झालेला प्रत्यक्ष असा पहिला सामना. तोपर्यंत सगळं फक्त ऐकूनच. अगदी लहान असताना तर रस्त्यावरून कोणाची प्रेतयात्रा जरी दिसली तरी मला घरात बसून रडायला यायचे. हे सांगण्या मागचा हेतू हाच की माझा वयाच्या तिशीच्या अगदी उंबरठ्या पर्यंत (अगदी तिशीच्या आतच म्हणाकी) कुठुन कुठे प्रवास झाला ते लक्षात येईल.  तो प्रवास कसा आणि का झाला ह्यावरून इतरंना थोडं धैर्य मिळालं तर मिळेल म्हणून हा लेख. माझं गरूडपुराण हे माणूस मरताना काय होतं या अनुभवावर आधारित आहे.

परवाच आमचे एक लांबच्या नात्यातील पण जवळच्या संपर्कातील मामा कर्करोगाने निवर्तले. मी आपला काल सांत्वनासाठी मामींना फोन लावला. बोलता बोलता लक्षात आलं की सगळे डायलॉग तेच फक्त व्यक्ती बदलतात. एकदम २००३ साल आठवलं. आमची आई संधीवाताने आंथरूणाला खिळून होती. तब्बल साडे आठ वर्षे! बाबा आणि मी तिचे सगळं करायचो. कधी अडचण असेलच तर बहीणी येऊन-जाऊन असायच्याच. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं ते अगदी जवळुन आणि स्लोमोशन मध्ये अनुभवलं. त्याच परिस्थितीत कोण खरंच आपले आणि कोण खरे परके हे सुद्धा कळून आलं. परमेश्वरसुद्धा सगळं व्यवस्थित दाखवत असतो. आपली समजायची आणि बघायची कुवत लागते.

आईला फेब्रुवारी २००३ मध्येच एक बेड सोर्स झाला होता. असं म्हणतात की अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तीला बेडसोर्स झाले म्हणजे समजावे की त्या व्यक्तीचा शेवट जवळ आला. हे मला घरात झालेल्या घटनेमुळेच समजले. आई स्वत: आयुर्वेदाचार्य असल्याने (फारशी प्रॅक्टीस न केलेली) तिला तर हे सगळं उघडपणे समजत होतंच.म्हणूनच ती कदाचित माझं लग्नं पटापट कोणाशीतरी (म्हणजे सुयोग्य व्यक्तीशीच.......त्याचीच तर मारामार ना! त्यावर एक वेगळं "विवाह पुराण" लिहीता येईल. सध्या आपण माझ्या गरूडपुराणावरच कॉन्सनट्रेट करूयात. ) लावून द्यावं (स्वत:च्या डोळ्यासमोर) असा विचार करत असावी. असो.
बेडसोर्स मुळे हळूहळू ते इन्फेक्शन सगळ्या शरीरभर पसरत चाललेलं होतं. आम्ही रोज ती बेडसोर्स ची जखम धुवुन आणि जखम भरून येण्यासाठी असलेली पावडर त्यात भरून मलमपट्टीकरायचो. तरी ती जखम जास्तच खोल होत चालली होती. आईचा चेहरा तर कधी प्रचंड थकलेला तर कधी अतिशय उजळलेला दिसायचा. खाणं तर जवळ जवळ बंदच झाल्या सारखं होतं. कुठे २-३ चमचे पेज खाल्ली तर खायची. छातीत कफ वाढत होता. ही सगळी जाणार्‍या माणसाची लक्षणं आहेत हे मला नंतर समजलं. तिचं बोलणं पण खूप कमी झालं होतं. अगदी आवश्यक तेवढंच बोलायची नाहीतर सगळा संवाद हातवारे करून चालायचा. त्यादिवशी सुध्दा मी शाळेत निघाल्यावर तिने मला हात केला आणि मान डोलावून अच्छा केला.

दुसरा तास चालूच झाला होता आणि मी वर्गात पोहोचल्यावर मला घरून फोन आलाय आणि घरी ताबडतोब बोलावलंय असा निरोप मिळाला. माझ्या छातीत धस्स झालं. पण मी तशीच घरी पोहोचले. नाचणीची पेज पितांना तिला खोकल्याची उबळ येवून ती पेज तिच्या छातीत गेली असंच आम्हाला वाटलं. तिला बोलता येत नव्हतं, चेहरा आणि मान सारखी वळवुन ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतेय असं आम्हाला वाटत होतं. त्यावेळी आमच्या आईची आई जिवंत होती. आम्ही तिला निरोप दिला. पण मुंबईहून तिला यायला किमान ४ तास तरी लागणारच होते. आईच्या तोंडातून खूप विचित्रं आवाज येत होता. तिचा चेहरा पहावत नव्हता. मला तर सुरूवातीला उलटीच झाली ते सगळं पाहून पण मग मी स्वत:ला सावरलं. तोपर्यंत बहीणी पण घरी पोचल्या.
हळू्हळू ती थोडी नॉर्मल होते आहे असं वाटायला लागलं. त्यादिवशी रात्री मी तिच्या उशाशी बसून होते. ती फक्त एकच म्हणाली करूणाष्टकं वाच. मी रामरक्षा, करूणाष्टकं सगळं पुन्हा पुन्हा तिला झोप लागे पर्यंत म्हणत तिच्या उशाशी बसले होते. तिला झोप लागल्यावर मी पण पडले. पहाटे पहाटे मला अचानक एका विचित्रं अशा आवाजाने जाग आली. उठुन पहाते तो आईला पुन्हा त्रास चालू झाला होता. त्यानंतर ती जी कोमात गेली ती कधीच बाहेर आली नाही. पण तिच्या घशातून अतिशय विचित्रं आवाज येत होता आणि तिचे डोळे पण उघडे होते. त्यात काही ओळख नव्हती. हे असं अखंडपणे रात्रं दिवस चालू होतं.

दिवसा लोकं भेटायला यायचे म्हणून बाबांना आम्ही रात्री झोपवायचो. रात्रीची वेळ मी, माझी मधली बहिण आणि धाकटा मामा अशी तिघांनी वाटून घेतलेली असायची. मोठ्या बहिणीकडे सगळी मुलं राहीली होती आणि दुसरी मधली बहीण तिला ४ महिन्यांचा मुलगा असल्याने त्याच्यात गुंतेली होती. रात्रीच्या वेळी त्या सगळ्या वातावरणात एकटं जागं रहाणं पण कठीण त्यामुळे आम्ही दोन दोन आलटून पालटून जागायचो. पण माझी तर झोपच उडाली होती. शरीराला विश्रांती हवी म्हणून मी पडायची कारण दिवसा मला स्वयंपाक घरात उभं रहायला लागायचं. अशावेळी लोकांना पण समजत नाही की कोणत्यावेळी भेटायला जावं, किती वेळ बसावं ते. माणसांचे वेगवेगळे नमुनेच बघायला मिळतात.
डॉक्टरांनी सांगीतलं होतं की हॉस्पीटल मध्ये ठेवून उपयोग नाही. त्यांना सगळी कडून नळ्या लावून आय सी यू त ठेवतील. कोमा मधला पेशंट अशाच अवस्थेत कितीही काळ राहू शकतो. तीन दिवसापासून ते तीस वर्षं कितीही काळ. याला फक्त वाट पहाणे येवढंच आपण करू शकतो. सकाळ संध्याकाळ येऊन डॉक्टर तिला झोपेचं इंजक्शन देत होते पण तिचं शरीर ते इंजक्शन सुद्धा स्विकारत नव्हतं. इंजक्शनची टोचलेली सुई जशी बाहेर काढली जाईल तसंच ते इंजक्शनचं द्रव कारंज्यासारखं बाहेर यायचं. कशाचाच उपयोग होत नव्हता.

मला एका ओळखीच्यांनी सांगीतलं तिला काहीतरी काळजी असणार म्हणून तिचा जीव अडकलाय. मला लक्षात आलं काय काळजी असेल ते. त्यांनी मला हे सुध्दा सांगीतलं की जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी जर तिच्या कानात "मुलीच्या लग्नाची काळजी करू नकोस ते आम्ही बघु", तर कदाचित ती जाईल. उपस्थित सगळ्यांमध्ये ही बातमी पसरली. कोणीच पुढे येऊन बोलायला तयार नाही. मग मीच ठरवलं आणि मनाचा हिय्या करून तिच्या जवळ गेले आणि कानात बोलले, "माझी आणि बाबांची काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू. माझं लग्नं पण मी व्यवस्थित करेन". तरी तिच्या स्थितीत फरक नव्हता. मग वाटलं की बरीच वर्ष आंथरूणाला खिळल्याने तिला कुलदैवतांना जाता आलं नाही. मग मी तेसुद्धा तिला सांगीतलं की तुझ्या वतीनं मी सगळीकडे जाऊन येईन. पण तू आता नि:शंक मनाने पुढच्या प्रवासाला लाग.

तसं मी आमच्या कुलदैवतांच्या पुण्यातील मंदिरांत जाऊन पण देवांना सांगीतलं. माझ्या मैत्रीणीच्या सासर्‍यांनी दिलेलं गंगाजल तिच्या तोंडात घातलं आणि अर्ध्यातासात तिची घर घर थांबली. तिचा चेहरा शांत दिसत होता. तशातच पुढे तीन दिवस तिने काढले आणि चौथ्या दिवशी तिचा प्राण गेला. "मरावे परी नेत्ररूपी उरावे" यासाठी म्हणून आम्ही पुण्यातील एका नेत्रंपेढीला आधीच संपर्क करून चौकशी करून ठेवली होती. पण तेथिल डॉकटरांनी दाखवलेल्या निश्काळजीपणा मुळे ते सुद्धा साध्य होवू शकलं नाही.
माणूस जातो म्हणजे नक्की काय होतं, त्या व्यक्तीचा आत्मा कुठे जातो हे सगळे प्रश्नं माझ्या मनात घर करून होते. कदाचित मी ते सगळं बोलायला आणि गंगाजळ टाकल्यावर आईची घरघर थांबायला - अगदी कावळा बसून फांदी तुटणे इतकाच जरी योगायोग धरला तरी मला कुठेतरी या सगळ्यावर विश्वास ठेवावा असंच वाटलं. कारण मी ते सगळं अनुभवलं आहे. आई गेल्याने आमच्या घरात आणि आयुष्यांत एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. सगळीच कामं संपल्या सारखं रिकामं रिकामं वाटत होतं. दरम्यान आप-पर ओळखीने आपणच आपले सावरलेले बरे हे समजल्याने दुसर्‍यावर विसंबुन न राहता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. यथावकाश मी आणि बाबा कुलदैवतांना बोलल्या प्रमाणे जावून आलो. मला एकच समाधान की आई पुढच्या प्रवासास जाताना नि:शंक आणि समाधानी होती.
कोण म्हणतं ......"सगळ्यांचं आयुष्यं सेम असतं?" प्रत्येकाचं आयुष्यं हा एक ग्रंथ असतो. आपण वाचायला शिकायची खोटी आहे तुलना न करता.

27 comments:

  1. आपल्या समोर आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू पाहणे किती कष्टप्रद असतं ह्याचा मी देखिल अनुभव घेतलाय.
    http://purvaanubhava.blogspot.com/2006/12/blog-post_28.html इथे वाचू शकतेस.
    पत्नी नंतर लगेच वर्षभरातच वडील आनि आणखी चार वर्षांनी आई..हे तीनही मृत्त्यू खूप जवळून पाहिलेत. मात्र वडील आणि आई दोघेही शांतपणाने झोपेतच गेलेले होते....जाईपर्यंतही तसे चांगल्या स्थितीत होते.
    तू बाकी खरंच धीराची आहेस..मानलं तुला.

    ReplyDelete
  2. तुमचा लेख वाचताना माझ्या डोळ्यात पाणी कधी चालू झाले समजलेच नाही. सगळे योगायोग असतात. डायलॉग तेच, रंगभूमी तीच फक्त तिची सजावट आणि पात्रं बदलत असतात. त्यामुळे ओघानेच पात्रांमधील नाती सुध्दा.

    ReplyDelete
  3. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
    मातृवियोगाचे दुख्ख व्यक्त
    करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.
    त्यावेळी आपण पूर्ण भिजलेले असतो आणि
    भावना लिहिण्यासाठी कोरडे व्हावे लागते.
    - जयंत.

    ReplyDelete
  4. धन्यवाद जयंत. अजुनही ते दिवस माझी पाठ सोडत नाहीत. स्वप्नात आई अजुनही येते. बोलत काहीच नाही फक्त मूक पणे काही प्रसंगांत सहभागी होते. मुख्य म्हणजे चालताना दिसते. अगदि सुरूवातीच्या स्वप्नांमध्ये ती बेडवर झोपलेली काहीतरी त्रास होत असलेली यायची. अगदी खरंय......
    "त्यावेळी आपण पूर्ण भिजलेले असतो आणि
    भावना लिहिण्यासाठी कोरडे व्हावे लागते."

    ReplyDelete
  5. लेख अगदी काळजाला स्पर्शून गेला. माझा खूप जवळचा मित्र दीड वर्षांपूर्वी गेला, तेव्हा मी मुंबईतही नव्हतो, त्यावेळी काय भावना होत्या, त्या व्यक्तही करता येत नाहीत. भलतीच अवघड परिस्थिती असते.

    ReplyDelete
  6. धन्यवाद विद्याधर. माझी अवस्था अजुनही ते सगळं आठवलं की काय असते ते सांगू शकत नाही.

    ReplyDelete
  7. अपर्णा,
    तू‌ लिहलं आहेस तस 'ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह' असेल तर मृत्यू म्हणजे एक ट्रान्स्फार्मेशन हे उमजू शकतं, पण नसेल तर - माझ्याशीच असं का होतं, मोठा लॉस, जगण्यात अर्थ नाही पाशी येऊन मन थांबतं. अर्थात याच वेरी रूट कॉज - 'ती व्यक्ती आपल्याला पुऩा कधीच भेटणार नाही‌' हा विचार असतो, पण जर 'पुऩा आपण भेटू‌शकतो हा विचार जर पटला, तर मजबूत हिलिंग होऊ शकतं, या विशयावर एक अप्रतिम पुस्तक् आणि सेरिज आहे.'मेनी लाईव्हस मेनी मास्टर्स' या पुस्तकात व्यक्तिंचे ऋनानुबंध या विषयावर छान लिहलं आहे, लेखक अमेरिकन मानसतज्ञ आहेत आणि पूनर्जन्म हा मुखविशय आहे. सर्व काही 'अनुभवाचे बोल' असल्याने वाचायला गम्मत येते.

    ReplyDelete
  8. धन्यवाद सोमेश, इतकी सविस्तर आणि संदर्भासहित प्रतिक्रीया दिल्याबध्दल. तुझ्याकडे डिजीटल कॉपी असेल तर पाठवून दे.

    अमेरिकन लेखक आणि पुनर्जन्मा विषयी म्हणजे तो ख्रिश्चन तर नाहीच पण थोडा हिंदूधर्मा ला मानणारा असावा असे वाटते. कारण पुस्तक असलेले धर्म (रिलीजन्स ऑफ बुक्स) पुनर्जन्म मानतच नाहीत.

    अरे असं म्हणतात आपल्याकडे की विवाहीत स्त्रीचा आत्मा हा तिच्या सासू, आजेसासू यांच्या आत्म्यांना मिळतो. त्यांच्या मार्गाने जातो. अगदी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी च्या धर्तीवर लॉ ऑफ कॉन्जर्वेशन ऑफ आत्मा असं ही म्हणायला हरकत नाही (अद्वैत वेदान्ता प्रमाणे) श्रीमत भगवत गीतीत श्रीकृष्ण हेच सांगतो.

    गेलेली व्यक्ती प्रत्यक्षात भेटणे हे जरा अवघड आहे मानायला पण ती व्यक्ती वेगळ्या स्वरूपात येण्याची शक्यता असते किंवा आपल्या स्वप्नांत सुध्दा.

    ReplyDelete
  9. बापरे.. खूप भावस्पर्शी लेख, अपर्णा. खूप धीराने सोसलंस सगळं !!!

    पुनर्जन्म, अखेरची इच्छा, पिंडाला कावळा शिवणे.. खरंच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवाच्या तोकड्या ज्ञानाच्या पलीकडे असतात.. !!

    गेल्या वर्षी २ जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झाला अक्षरशः ३ महिन्यांच्या अंतराने. आणि दोन्ही वेळा आम्ही हे इथे एवढ्या दुरवर अडकलेलो. प्रचंड हेल्पलेस वाटत होतं :(

    ReplyDelete
  10. तीन वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई अश्याच कोमात होत्य बरेच दिवस जाण्याच्या आधी. कर्क रोगाने आजारी होत्या. आम्ही जाऊ शकत नव्हतो त्यामुळे आमची पण अशीच अवस्था झाली होती. पण आमच्या माझ्या आईच्या वेळच्या अनुभवाचा तो शेअर करण्याचा माझ्या सासर्‍यांना त्यातून बाहेर येण्यास उपयोग झाला.

    ReplyDelete
  11. जवळच्या व्यक्तीचा असा मृत्यू खूप चटका देऊन जातो. जातानाही त्यांची आबाळ होऊ नये हि एकच इच्छा असते.
    बाकी सेवा करायला काही वाटत नाही पण आपल्या समोर त्याचे झालेले हाल पाहवत नाहीत.

    दोनच दिवस आजोबांची सेवा करायला होतो. पण त्याचे हाल पाहून मला हि असाच वाटल कि एकदाचे मुक्त व्हावेत या त्रासातून.
    आपण फक्त मनोभावे सेवा करू शकतो त्रास तेच सोसत असतात.

    ReplyDelete
  12. अगदी खरंय सचिन. आपण काहीच करू शकत नसतो आणि त्यांचा त्रास पण पहावत नाही. पण शेवटी प्रत्येकाचे भोग असतात ते संपल्याशिवाय सुटका नसते. कोणाचीच.

    ReplyDelete
  13. आपलेच लोक आपल्या पासुन जेव्हा कायमचे दुरावतात तेव्हा होणारा त्रास हा फ़ार वाईट असतो...
    मॄत्यु हे अंतीम सत्य असले तरी ते सत्य पचवणे नेहमीच कठीण जाते...

    ReplyDelete
  14. हो रे अमेय. पण ते कधी ना कधी सगळ्यंनाच पचवावे लागते.

    ReplyDelete
  15. खुप त्रास सोसला आहेस..पोस्ट वाचतानाच गलबलुन येत होते.. प्रत्यक्ष त्या परिस्थीतीत असणे म्हणजे कल्पनाच करवत नाही... सुदैवाने समजायला लागल्यापासुन असे प्रसंग ओढवले नाहीत.. पण कोण जाणे आज काळजी वाटत्येय... :-(

    ReplyDelete
  16. अरे आनंद, अश्या संकटांना घाबरून उपयोगाचं नाही. तेच तर आपल्याला खर्‍या अर्थाने जगायला शिकवत असतात. माणसाची म्हणजे स्वत:ची स्वत:ला अशी ओळख अश्या अवघड परीक्षा घेणार्‍या प्रसंगांतूनच होत असते. इतर लोकांची खरी ओळख अतिशय आनंद आणि अतिशय दु:ख यात ते आपल्याशी कसे वागतात यातून होत असते. सगळे स्वानुभवाचेच बोल आहेत. :-):-)

    ReplyDelete
  17. अपर्णा, तुझं इमेल आयडी पाठव ना.

    ReplyDelete
  18. I feel so awful that i was not there to support at the time you were facing this. It's been a some time but still my eyes got wet while reading this. Have seen six deaths of near and dear family members in last 5 years, out of which three were of the people who haven't even crossed 40. Still feel sad about it, thinking how many dreams they might have had. Though we know that everyone dies one day, it's still difficult to accept for those who are left behind.

    ReplyDelete
  19. Everybody have to have his/her own share of karmas and misery. One can only support by being there. Death becomes more tragic when it is at early age and for daughters if the dead one is their mother.

    ReplyDelete
  20. मृत्यू.
    बघितलाय.
    लिहिणं हा तसा एक उपाय असतो. लिहिताना आपोआप विचार स्पष्ट होत जातात. आणि लिहून झाले की पान पालटता येते.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय अनघा, लिहून झाले की पान पालटता येते. पण काहीवेळा मन पान उलटून पुन्ह त्याच पानावर येते.

      Delete
  21. शाम मानवांच व्याख्यान ऐकलं त्यात शरीराशिवाय अस्तित्वं असू शकत नाहीं। आपले विचार जाणीव
    भावना या शरीरातील रासायनिक प्रक्रिया या शिवाय काहीही असू शकत नाही असें प्रतिपादन केले होते। माझ्यातल्या बुद्धिवाद्या ला हे पटले पण माझ्यातल्या अस्तिकाला पटले नाही।
    शंकराचार्यांचे आत्मष्टक वाचले। त्यात लिहिले होते

    मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम।

    मी मन बुद्धी चित्त किंवा अहंकार नाही

    म्हणजे आत्मा या सर्वांच्या पलीकडचा आहे।

    नेती नेती म्हणजे ज्याची व्याख्याच करता येत नाही

    ज्याची व्याख्या नाही त्याला सिद्ध कसं करणार

    ReplyDelete
  22. शाम मानव हे हिंदू परंपरा आणि रूढींना थोतांड तसेच अंधश्रद्धा मानणारे नास्तिक आहेत. पण ते ख्रिश्चन आणि मुस्लीम लोक मेल्यानंतर मृतदेह का पुरतात याबाबत त्या लोकांची जी समजुत आहे त्यावर किंवा या दोनही आणि हिंदू धर्मा व्यतिरीक्त इतर धर्मांतील रूढी, परंपरा आणि समजुतींना अंधश्रद्धा मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कोणत्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. असो. आपलं शरीर म्हणजे सगळा रासायनिक खेळ असता तर वैद्यकशास्र शिकविताना ते तसंच शिकवलं असतं. कोमात असलेल्या व्यक्तीचं शरीरात फारशा रासायनिक क्रिया घडतही नसतात, ह्रदय बंद पडलं तरीही मेंदूच्या नसांचे ठोके बंद झाल्यावरच माणूस मेला असं ठरवतात. या सगळ्या कालावधीत अशा अनेक गोष्टी घडतात की ज्यांचं स्पष्टीकरण आपण लॉजीकली देऊ शकत नाही....अगदी वैद्यकशास्र देखील त्यांचे उत्तर देऊ शकत नाही. शंकराचार्यांचे बोल हे स्वानुभवाचे आहेत. शाम मानवांचा कशावर विश्वासच नाही तर त्यांना अनुभूती येणं शक्यच नाही. असो.

    ReplyDelete
  23. शांतीसुधा वैद्यक शास्त्र आत्मा मानत नाही।
    कोणीही शरीरात बिघाड झआल्याशिवाय मरात नाही
    एखादा व्यक्ती शरीरात कोणताही बिघाड न येता मेला असं होईल तेव्हा आत्मा मानायला जागा असेल। मला शाम मानव या व्यक्तीशी काहीही घेणंदेण नाही। पण वैज्ञानिक जसे डंके कि चोट पर आपले सिद्धांत सिद्ध करतात आणी नाही करू शकले तर माघार घेतात। तसं कुणीही परलोकाचे
    अस्तित्व सिद्ध करून दाखवा वा आत्म्याचे अस्तित्व
    सिद्ध करा या लोकांचे तोंडं बंद होतील

    ReplyDelete
    Replies
    1. वैद्यकशास्र आत्मा मानत नसेल पण त्यांच्या शास्त्रालाही ज्याची उत्तरे सापडत नाहीत अशा गोष्टी जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर घडतात तेव्हा ते देखील कमीत कमी देवाचे अस्तित्व, नशि वगैरे गोष्टी अस्तित्वात असतात असे मान्य करतात. असो.

      वारा, हवा हे दिसतात का? तर उत्तर नाही असंच आहे. पण त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवते आणि म्हणून आपण झाडं हलली, कपडे हलले, आपल्या शरीराला वार्‍याच्या झुळुकेचा स्पर्श झाला की म्हणतो वारा आहे. अनेकांना परमेश्वराच्या अस्तित्वाचे अनुभव येतात...पण परमेश्वर एखाद्या भौतिक आणि रासायनिक पदार्थासारखा दाखवता येत नाही. पण म्हणून परमेश्वर अस्तित्वातच नाही हे म्हणणं चुकीचं आहे. असो. तसंच आत्म्याच्या बाबतीत म्हणता येईल. आत्म्याचे अस्तित्व असते हे आपण दाखवू शकतो पण त्यासाठी विश्वास असावा लागतो. त्याचा अनुभव घेतलेलेही अनेक जण सापडतील ...शोधले तर. असो.

      Delete
    2. आपल्या प्रत्येक तर्कासाठी या नास्तिकांजवळ उत्तरं आहेत। हवेचं अस्तित्व हे निसर्गाच्या कार्यकारण भावाला धरून आहे। एके काळी पाऊस कसा होतो हे मानवाला मअहित नव्हते
      पण जेव्हा माहित झाले तेव्हा त्यामध्ये निसर्गाचे निश्चित नियम ननिहित होते

      आता गोष्ट अनुभवाची तर अनुभव फसवे असू शकतात
      अनेक मनोरुग्ण काही गोष्टी अनुभवतात पण
      ते अनुभव त्यांचा दृष्टीने सत्य असले तरी प्रत्यक्ष अस्तित्वात नसतात।
      भांग खाल्ल्यावर आपण छतावर उलटे लटकलो आहोत असा अनुभव येतो पण तव खोटेच असतो



      आता बोला

      Delete