Sunday 27 March 2016

आयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-२: (मिमांसा)

अभ्यासक्रमाची मिमांसा करताना पाठ्यपुस्तकांची मिमांसा म्हणजेच पाठ्यपुस्तके कोणी लिहीली, लेखकांची शैक्षणिक आर्हता, त्यांची विश्वासार्हता, पाठ्यपुस्तकांतील मजकुर, तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवला आहे अशा सगळ्याचीच मिमांसा केली जाते. ह्यावेळी विचार केला की नुसती एका शाळेने सांगीतलेली पुस्तके पाहण्यापेक्षा नक्की किती प्रकाशक आहेत आणि त्यांच्या मजकुरात कितपत फरक पडतो हे पण तपासण्याचे ठरवले. या उद्देशाने पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील एका नामवंत पुस्तकांच्या दुकानात गेले की जिथे सीबीएसइ आणि आयसीएसइच्या अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तके मिळतात. पुस्तक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार साधारणत: ते प्रकाशक आयसीएसइच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके प्रकाशित करतात. कदाचित हे त्यांच्या दुकानात येणार्या पुस्तकांबद्धलचं त्यांचं अनुमान असेल. पुस्तक विक्रेत्यांच्या माहिती नुसार दर वर्षी आयसीएसइच्या पुस्तकांचे २००० ते ३००० पुस्तकसंच त्यांच्या दुकानातून विकले जातात. दर वर्षी ही संख्या वाढते आहे. त्यांच्याकडे विविध शाळांकडुन मागणी असते.. पुण्यातील तसेच बारामती वगैरे भागातील शाळाही ही पुस्तके मागवतात अशीही माहिती त्यांनी पुरविली. या आकडेवारीवरून हे नक्कीच लक्षात येते की आयसीएसइच्या अभ्यासक्रमात शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेच आहे आणि फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागांतही हे प्रमाण वाढते आहे. सीबीएसइच्या अभ्यासक्रमात शिकणार्या विद्यार्थ्यांचं प्रमाण याच्या दुप्पट तर नक्कीच आहे.
माझ्याकडे आधी त्या विद्यार्थ्याकडुन आणलेली चार पुस्तके आणि दुकानातली आठ पुस्तके अशा एकूण बारा पुस्तकांचा आढावा घेऊन मी ही मिमांसा लिहीलेली आहे. हे सगळं स्वयंप्रेरणेने आणि स्वखर्चाने केलेलं आहे आणि त्यात माझा कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू नाही. विद्यार्थ्यांची काळजी आणि विद्यार्थी नक्की काय शिकताहेत हे समजुन घेण्याची तळमळ हेच हेतू आहेत. री ते १० वी अशी प्रत्येकी एक-एक पुस्तक मागवलं आणि आढावा घेण्यास सुरूवात केली. फ्रॅंक एज्युकेशनल एड्स, मधुबन एज्युकेशनल बुक्स, रत्ना सागर प्रायव्हेट लिमीटेड, होली फेथ, एस चांद पब्लीकेशन्स, बीटा पब्लीकेशन्स, मॉर्नींग स्टार (युनीट ऑफ एमएसबी पब्लीशर्स लिमीटेड) अशी प्रकाशकांची नावे आढळली. सर्वच प्रकाशकांनी पुस्तकांच्या लेखकांची नावे टाकलेली नव्हती. काहींनी लेखकांची नावे दिली होती तर लेखकांची शैक्षणिक आर्हता दिलेली नव्हते. हे सगळं याचसाठी महत्वाचं आहे की अभ्यासक्रम नक्की कोण ठरवतं ते गुलदस्त्यात आहे, पुन्हा हे विविध प्रकाशक नक्की कोणाकडून पुस्तकं लिहून घेताहेत याची पण कल्पना नसेल तर पाठ्यपुस्तकातील मजकुरास जबाबदार प्रकाशकांना धरणार? मग हे प्रकाशक कोणत्या निकषांवर या लेखकांना ही पुस्तके लिहीण्यासाठी आमंत्रित करतात हे पहाणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तक लेखकांची शैक्षणिक आर्हता का महत्वाची ते देखील समजेलच. साधारणत: री ते वी ची पुस्तकं लिहीणार्या लेखाकांची शैक्षणिक आर्हता एम (इतिहास), बीएड आणि कोणत्या ना कोणत्या शाळेत मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक अशी होती. माझ्या हातात बीटा पब्लीकेशनचं जे वी चं पुस्तक होतं त्यातील एका लेखिकेचं एमए इतिहास आणि जर्नालिझम मास कम्युनिकेशन्स मधे पदव्युत्तर शिक्षण होतं. वी च्या पुस्तकातील दोनही लेखकांची शैक्षणिक आर्हता देता फक्त आयसीएसइच्या विविध शाळांमधे १५ ते २० वर्षे शिकविण्याचा अनुभव अशी ओळख दिलेली होती. पाठ्यपुस्तकातील मजकुराचा शैक्षणिक दर्जा पाहता या लेखकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. स्मृती इराणी यांनी संसदेत उल्लेख करताना थी च्या आयसीएसइच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या लेखिकेचं नाव तिस्ता सेतलवाड असं सांगीतलेलं होतं. त्या पुस्तकात काश्मीरातील तसेच भारताच्या इतर भागातील हिंदू, मुसलमान दंगली, केरळ मधील हिंदू, ख्रिश्चन दंगली असं सगळं दिलेलं होतं. आता तिस्ता सेटलवाड ह्या बाईंची विश्वासार्हता आणि किर्ती जगजाहीर आहे. मोठ्या राजकीय वरदहस्तामुळे बाई अजुनही तुरूंगाबाहेर आहे इतकंच काय ते म्हणायचं. वी चं इतिहासाचं पुस्तक एक जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन मधील व्यक्ती कसं काय लिहू शकते? हे क्रमिक अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक आहे ना की एखादी कादंबरी किंवा अन्य माहितीपर पुस्तक. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक आर्हता किमान त्या त्या विषयातील डॉक्टोरेट, संशोधक व्यक्ती पाहिजे आणि शालेय पातळीवर शिकविण्याचा अनुभव असला पाहिजे. मी व्यक्ती संशोधक असावी यावर जोर अशासाठी देते आहे कारण आपण वर्षानुवर्षे जो इतिहास शिकवत आहोत तो खरंच तसा आहे का हे तपासून पाहण्याची क्षमता त्या व्यक्तीत असावी अशी किमान अपेक्षा आपण बाळगु शकतो. एनसीईआरटी मधील अभ्यासक्रम तयार करणे आणि पाठ्यपुस्तक निर्मिती हे - व्यक्तींच्या हातात नसतं तर त्यामागे -१० जणांची कमिटी असते. त्या सगळ्यांची शैक्षणिक आर्हता त्या त्या विषयातील किमान डॉक्टोरेट अशीच आहेत. त्यामुळे निदान विश्वासार्ह तरी असतात. विश्वासार्हते प्रमाणे लोक काम करतात की नाही हा अजुन तिसराच मुद्दा आहे. असो

तर मला मुळात या अभ्यासक्रम तयार करणारे नक्की कोण आणि पाठ्यपुस्तके लिहीणारे यांच्या विश्वासार्हतेवरच शंका आहेत. त्याला कारणी तसेच आहे. या अभ्यासक्रमातील मुख्य मुद्दा म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृती ही (इंडस व्हॅली) सिंधू संस्कृती- हडप्पा, मोहंजोदडो आणि आर्यन इन्व्हॅजन थिअरीवर आधारित आहे. गेल्या काही वर्षांत (काही दशकांत म्हणूया) जे इतिहास पुरातत्व विभाग यांच्यात जे संशोधन झालं आहे त्यानुसार भारतीय संस्कृती जगातील सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. आर्यन इन्व्हॅजन थिअरी मधे काहीही तथ्य नाही. भारतात जगातील इतर संस्कृतींच्याही हजारो वर्षे आधी वैदीक संस्कृती संपन्न होती. कृपया यासाठी खालील दुव्यांवर दिलेले भारतीय संशोधकाचे
तसेच पाश्चात्य संशोधकांचे (दुवा एक आणि दुवा दोन) संशोधन वाचावे. जर अभ्यासक्रम तयार करणारे किंवा पाठ्यपुस्तकांचे लेखक त्या विषयातील संशोधनाला महत्व देता चुकीचीच माहिती इतिहास म्हणून शिकवत असतील तर ते विश्वासार्ह कसं 

दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या देशातील मुलांना तिसरी पासून जागतिक इतिहास कशाला सांगायला पाहिजे? साधारणपणे लहान वर्गांत ज्या भागात विद्यार्थी राहतात त्या भागाचा इतिहास, मग त्या राज्याचा इतिहास आणि देशातील इतर राज्यांच्या इतिहासाची ओळख, यातूनच देशाच्या इतिहासाची ओळख करून द्यावी. आधी स्वत:च्या देशाची, त्या देशाच्या संस्कृतीची, देशातील ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची व्यवस्थीत ओळख होऊ देत मग जागतिक इतिहास माहिती करून घेण्यास हरकत नसावी. आता आयसीएसइच्या अभ्यासक्रमाच्या शाळा वेगवेगळ्या राज्यांत असल्याने आपण असं म्हणू की लहान वर्गापासून आपल्या देशातील प्राचीन संस्कृती, इतिहास, विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, त्यातील ऐतिहासिक व्यक्तींच्या गोष्टी अशी सुरूवात असेल तर लहान मुलांना आपल्या देशा विषयी, देशाच्या उज्ज्वल परंपरेविषयी, विविधतेत एकता याविषयी अधिक माहिती मिळेल. त्याच प्रमाणे व्यक्तीचरित्रे गोष्टी रूपात सांगता येतील. पण प्रत्यक्षातील चित्रं वेगळेच आहे. इयत्ता तिसरीच्या पुस्तकाची सुरूवात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ने होते. पुढे इजिप्शीअन, चायनीज, मेसोपोटॅमीया, ग्रीक, रोमन या सिव्हीलायझेशन्स पर्यंत आहे. पुढे ज्युलीयस सिझर, अलेक्झांडर, गौतम बुद्ध, बुद्धीझम आणि राजा अशोक अशी मांदियाळी लागलेली आहे. म्हणजे तिसरीच्या वर्गात ज्या माहिती पासून सुरूवात करताहेत तीच मूळात चुकीची. पुन्हा त्या लहानग्यांना इजिप्त, रोम, ग्रीस, चायना इथे नक्की कोणती संस्कृती होती हे तिसरीत समजायचं कारण नाही. त्या ऐवजी आपल्या देशातील प्राचीन संस्कृतीची ओळख (अतिशय थोडक्यात), ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्ररूप गोष्टी (त्यातूनच धर्म वगैरे बाबत माहिती देणे). यामुळे ते जे काही शिकत आहेत त्याच्याशी ते जोडले जाऊ शकतील. त्याच बरोबर त्यांच्यात देशप्रेमाची भावना, देशाभिमान, विविधतेत एकता ही मूल्ये जोपासली जातील. त्यावर आधारित कृती, कार्यक्रम असे शैक्षणिक उपक्रमही राबविता येतील. असो

तिसरा मुद्दा म्हणजे एकूण अभ्यासक्रमात जागतिक इतिहास अधिक आणि भारतीय इतिहास जो दिला आहे तो म्हणजे भारतात इंडस व्हॅली सिव्हीलायझेशनच्या आधी लोक रानटी पद्धतीने रहात असत. इंडस व्हॅली संस्कृती नंतर आर्य लोक युरोपातून आले आणि त्यांनी स्थानिक द्रविडी लोकांवर हल्ले केले. तिथेच स्थायिक झाले. मग वेदिक काळ चालू झाला. भारतीय संस्कृतीची जी काय अतिशय तुटक आणि तुटपुंजी माहिती दिलेली आहे त्यातून काहीही समजत नाही. परदेशी आक्रमक येतच होते मग मुसलमान आक्रमक आले. त्यानंतर मुख्य मुघलांचा इतिहास आणि मुघलांचा अस्त झाल्यावर ब्रिटीशांचं राज्य मग स्वातंत्र्य चळवळ (मुख्यत: गांधीं आणि त्यांच्या चेल्यांनी केलेले सत्याग्रह इ.) मग गांधींनी कसं स्वातंत्र्य मिळवुन दिलं. मुघलांच्या इतिहासात सगळ्या मुघल राजांची सविस्तर माहिती आणि मधे मधे राजपूत कसे हरले, मराठे कसे हरले, ब्रिटीशांनी भारतात कशा सुधारणा केल्या. थोडक्यात ज्या व्यक्तीची पाटी कोरी आहे त्या व्यक्तीला भारत म्हणजे अतिशय मागासलेला देश होता. इथले राजे अतिशय भ्याड होते आणि त्यामुळे इथल्या लोकांवर मुघलांनी कसं राज्य करून संगीत, कला, नृत्य संस्कृतीची ओळख करून दिली. तरी त्यांना या स्थानिक राजांनी कसा त्रास दिला, त्यांच्या विरूद्ध अकारण लढाया केल्या. मग ब्रिटीश लोक आले. त्यांनी भारतात अधुनिक सुधारणा केल्या. म्हणजे मुघल आणि ब्रिटीश लोक आले नसते तर भारत रानटीच राहीला असता अशी भावना निर्माण होईल. ब्रिटीशांना घालवून दिलं ते गांधी, नेहरू आणि कॉंग्रेसने. थोडक्यात हा इतिहास वाचून दोन गोष्टी नक्की होतात. आपल्या देशाविषयी प्रेम आजीबात निर्माण होत नाही. मुघल आणि ब्रिटीश यांच्यामुळेच हा देश सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि आधुनिक बनु शकला. गांधी आणि कॉंग्रेसमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारतातील विविध राज्यांतील राज घराणी, त्यांची उज्वल परंपरा, स्वातंत्र्य चळवळीतील गांधी, नेहरू आणि कॉंग्रेस सोडले तर बाकीच्यांच्या योगदानाचे काय? यातून देशाविषयी प्रेम निर्माण होऊ शकेल काय?  


चौथा मुद्दा म्हणजे आतील मजकुराचे स्वरूप. म्हणजे जेव्हा आपण एखादा शालेय पातळीवरचा क्रमिक अभ्यासक्रम तयार करतो तर आधीची इयत्ता आणि पुढची इयत्ता यात आपण जे काही अभ्यासास ठेवू त्यात तार्किक मांडणी आणि सुसुत्रता असते. यामुळे विषय अधिक परिणामकारकरित्या पोहोचवण्यास मदत होते. पण आयसीएसइच्या पुस्तकांमधे ही सुसुत्रता आढळत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशीच काहीशी गत या मजकुराची झालेली आहे. पुन्हा तिसरी  ते पाचवी मुलांच्या जे काही इतिहास म्हणून विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न होतो (स्टोन एज, इंडस व्हॅली, वेदीक काळ, युरोपीयन संस्कृती, अमेरिकन संस्कृती, चायनीज संस्कृती, आधुनिक युरोप, अमेरिकन सिव्हील वॉर, तुर्कांचे आक्रमण, मुघलांचे आक्रमण, ब्रिटीशांचे राज्य, स्वातंत्र्य चळवळ, अधुनिक भारत, जग एक ग्लोबल व्हिलेज) तेच पुन्हा कमी अधिक माहिती टाकून सहावी ते आठवी  बिंबवले जाते. त्याचाच पुन्हा नववी आणि दहावी मधे सारांश घेतला जातो. बरं प्रकाशक वेगवेगळे असतात आणि विविध शाळांतील शिक्षक त्यांना सोयीचे वाटेल त्या प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासायला सांगतात. त्यामुळे एकाच प्रकाशनाची पुस्तके वेगवेगळ्या इयत्तांमधे नसतात. त्याचा तोटा असा होतो की एका प्रकाशनाच्या पुस्तकात जो मजकुर असतो त्याच मजकुराची पुनरावृत्ती दुसर्या प्रकाशनात पहायला मिळते किंवा काही मजकुर गायबच झालेला असतो, काही मजकुर पूर्णपणे नव्यानेच टाकलेला आढळतो.

चौथीच्या पुस्तकात विविध धर्मांचे संस्थापक असा एक विभागच आहे. त्यात फक्त ख्रिश्चन (येशू ख्रिस्त), मुसलमान (महंमद) आणि शीख (गुरू नानक) याच तीन धर्मांबद्धल दिलेलं आहे. का? आपल्या देशात इतर धर्म नाहीत? भारतात यहुदी म्हणजेच ज्यु, पारसी आहेतच मग त्यांच्या धर्म संस्थापकांची माहिती का नाही? बरं हिंदू धर्माला संस्थापक असा नाही कारण तो एका कुणा व्यक्तीने स्थापन केलेला नाही. मग हिंदू धर्मा संदर्भात तीच माहिती देण्यास काय अडचण आहे? भारतातील महत्वाच्या राजांमधे मुघल आक्रमक बाबर कसा काय येऊ शकतो? चौथीच्या मुलांना रेनेसन्स काळातील कलांची सविस्तर माहिती देण्यासाठी स्वतंत्र धडेच आहेत. रेनेसन्स काळातील कलांची माहिती सांगण्याआधी विद्यार्थ्यांना भारतातील राजा रवि वर्मा आणि अजंठा, वेरूळ येथील शिल्पकलेची सविस्तर माहिती दिलेली काय वाईट? त्यांना निदान सहलीला जाऊन ती शिल्पकला प्रत्यक्षात पाहता येईल आणि राजा रवि वर्मा यांची चित्रे संबंधित कलादालनांत जाऊन पाहता तरी येतील. 

मधुबन प्रकाशनच्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकात इतिहास म्हणजे काय पासून भारताच्या इतिहासाचा आढावाच घेतलाय इंडस व्हॅली पासून चालू करून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. एका वेळेला भरपूर माहिती पण गाळलेल्या जागा भरा आणि एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा अशा पद्धतीच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून हे सगळं अतिशय त्रोटक आणि अनेक ठिकाणी चुकीचं पण सांगीतलेलं आहे. फ्रॅंक एज्युकेशनल एड्सने प्रकाशीत केलेल्या पाचवीच्या पुस्तकाचे स्वरूप जरा बरे पण इतर अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. उदा: पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग जगातील महान नेते याने चालू होतो. त्यात जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, नेपोलियन, माओ-चे-त्सुंग, लेनीन, महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांची थोडक्यात माहिती आहे. पाचवीच्या मुलांना आपल्या देशातील महान नेत्यांची, इतिहासातील महान व्यक्तींची माहिती द्यायची सोडून अमेरिकेतील दोन राष्ट्राध्यक्ष, चीन मधील आणि रशियातील कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष, फ्रांस मधील राष्ट्राध्यक्ष नेपोलियन यांची माहिती का दिली जाते हे मला न उलगडलेलं कोडं आहे? आपल्याकडे महान नेते आणि प्रेरणादायी व्यक्ती नाहीत? गांधी आणि नेहरू सोडून असे बरेच महान नेते आणि महान व्यक्ती आपल्या देशात होऊन गेल्या....पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य वीर सावरकर, गोपाळ आगरकर.....बरं यांच्या चरित्रांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना प्रेरणा देण्याची चांगली संधी मिळाली असती. पुस्तकाच्या दुसर्या भागात थोर भारतीय समाज सुधारक मधे फक्त राजा राम मोहन रॉय आणि स्वामी विवेकानंद. महात्मा फुले, दयानंद सरस्वती, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची नाहिती सुद्धा घातली असती तर बरं झालं असतं. तिसर्या भागात तर सिक्सरच मारली आहे. "पिपल हु केअर्ड फॉर अदर्स" मधे फ्लॉरेन्स नाईटींगल, मदर टेरेसा आणि रविंद्रनाथ टागोर यांची माहिती दिली आहे. मदर टेरेसांनी नक्की काय केलंय हे १५ दिवसांपूर्वीच्या कुबेरांच्या अग्रलेख लेखन आणि मग दुसर्या दिवशी तो माफी मागत मागे घेणे यावरून दिसतेच. तसंही त्यांचं सत्य जगजाहीर आहे. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई अशी कितीतरी भारतीय नावे समोर येतील. मग मदर टेरेसाच का पाहिजेत? थोडक्यात तिसरी ते पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकांत तार्किक सुसुत्रता नाहीये. सगळंच तुटक आणि एक ना धड भाराभर चिंध्या असं आहे.

सहावीच्या पुस्तकात पुन्हा तेच. प्राचीन इतिहास सिंधु संस्कृतीपासून चालू होतो, ग्रीक व रोमन संस्कृती, वेदिक काळाच्या आधीचा आणि नंतरचा काळ, बौद्ध व जैन धर्माची स्थापना, मौर्य राजघराणं, गुप्ता राजघराणे व दक्षिण भारतात चोला घराणे इथे इतिहास संपतो. आसाम भागात ऑहोम राजे होते त्यांचं काय? बरं भारतातील सांस्कृतिक ठेवा म्हणजे संस्कृत साहित्य....त्यातील अनमोल माहिती....त्याविषयी फारसं काहीच सांगीतलेलं नाही. इतर देशातील सांस्कृतिक वारसा सांगताना व्यवस्थीत माहिती दिली आहे मग भारतीय माहिती सांगतानाच का त्रोटक, अपूरी दिली जाते आहे?

नववीच्या मॉर्निंग स्टार प्रकाशनाच्या पुस्तकात जागतिक पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, युनायटेड नेशन्सची स्थापना इ. ची तपशीलात माहिती आहे. तर रत्न सागर प्रकाशनांच्या पुस्तकातून हा सगळा मजकुर गायब आहे. आधीच्याच इयत्तांमधे जे शिकवलं गेलं त्याचीच उजळणी नववी आणि दहावीच्या पुस्तकांत आहे. रत्न सागर प्रकाशनांच्या पुस्तकांत जास्त भर नागरिक शास्त्रावर दिलेला आहे. आता अभ्यासक्रम हा समतोल राखणारा हवा. इतिहास आणि नागरिकशास्त्र या दोनही विषयांना विशिष्ट गुण दिलेले असतात. मग हा असा असमतोल असलेली पुस्तके अभ्यासक्रमाची म्हणून स्विकारली कशी जातात हा प्रश्न आहे?

होली फेथ प्रकाशनाच्या सातवी, आठवी च्या पुस्तकांत लेखकांची नावंच नाहीयेत पण त्यातल्या त्यात बर्यापैकी भारतीय इतिहास घातलेला आहे. म्हणजे अगदी राष्ट्रकूट, चोला, गुप्ता, राजपूत, मग मराठा असा इतिहास एका संपूर्ण धड्यात दिलेला आहे. पण बाकीच्या प्रकाशनांच्या पुस्तकांत तो धडाच गाळलेला आहे. तसंच भारतीय भक्ती परंपरा आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत केलेलं आहे. मुघलांनी हिंदूं, बौद्ध, जैन आणि शीखांवर केलेले अनन्वित अत्याचार, तलवारीच्या जोरावर केलेले धर्मपरिवर्तन, नालंदा-तक्षशीला यांसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमधे येणारे परदेशी विद्वान आणि याच विद्यापीठांना मुस्लीम आक्रमकांनी जाळून टाकणे, यासगळ्याला प्रतिकार करणार्यांना हालहाल करून मारणे हा भारताचा कितीही कटु असला तरी सत्य इतिहास आहे. मग तो का दाबून ठेवायचा? ब्रिटीशांनी सुधारणा आणल्या पण जनतेवर अत्याचार केले, देशातील साधन संपत्तीची लूट केली हा सत्य इतिहास कुठेच दिसत नाही. ब्रिटीश सत्ते विरूद्ध सशस्त्र क्रांति आणि क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचे विविध प्रयत्न हे फारसे कुठेच दिलेले नाहीत. आम्ही भाग्यवान होतो की शाळेत असताना अतिशय गौरवशाली इतिहास शिकलो. काकोरी कट, चितगांव कट, जलियनवाला बाग, १८५७ चे स्वातंत्र्य समर याची माहिती तपशीलात असे. महा राणाप्रताप, पृथ्वीराज चौहान, शिवाजी महाराज, झाशीची राणी यांसारख्या शूरवीर योद्ध्यांच्या कथा वाचून देशाच्या परंपरेविषयी अभिमान वाटत असे. आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले प्राण, तारूण्य खर्ची घातलेय याची जाणीव असायची.

ब्रिटीशांना स्वत:च्या वसाहतवादी इतिहासाची लाज वाटते आणि म्हणून ते तो इतिहास दाबून टाकतात. त्यांच्या देशात त्यांना सोयीचा तेवढाच इतिहास शिकवला जातो कारण त्यांना विद्यार्थ्यांच्या नजरांमधे देशाविषयी, ब्रिटीशांविषयी प्रश्नचिन्ह पहायची नाहीयेत. हे मी केंब्रीज विद्यापीठात शिकत असताना तिथल्याच इतिहास तज्ज्ञ विद्यार्थ्यांनी सांगीतलं होतं. मग ब्रिटीशांनी वसाहतवादाच्या नावाखाली केलेले अत्याचार लपविण्यासाठी, मुसलमान राजांनी केलेले अत्याचार, धर्मांतरे यांच्या कथा वाचून मुसलमान विद्यार्थ्यांना आपल्या धर्माचे प्रसारक कसे चुकीचे होते हे वाटू नये म्हणून सत्य लपवुन अर्धवट काहीतरी सांगायचं. पण मग बहुसंख्य हिंदूंचं काय? मग जातीव्यवस्थेच्या सुरस कथा सांगताना ब्राह्मण आणि इतर जाती यांविषयी वाचताना हल्लीच्या ब्राह्मण मुलांना की जे असलं काहीच पाळत नाहीत त्यांना कसं वाटेल याचा विचार कोणी करत नाही. माझं मत असं आहे की जे सत्य (सर्वच बाबतीत) आहे ते व्यवस्थीत मांडावं. मुलांना ही पूर्वीची परिस्थीती होती आणि आता तशी परिस्थीती नाही हे देखील सांगावं. विद्वेष न पसरवताही सत्य इतिहास सांगता येतो. त्यासाठी इतिहासच अर्धवट, तुटक सांगायचा आणि पुस्तकांची पाने भरून आणण्यासाठी जागतिक इतिहास आणि संस्कृती सांगत बसायचं. याला काय अर्थ आहे? त्यामुळे ऐतिहासिक मजकुर हा अतिशय तुकड्यांत आणि तर्कसंगती नसलेला वाटतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांना इतिहास याविषयाबद्धल रूची निर्माण न होता कधी एकदा ह्या गोंधळातून सुटतोय असं वाटत असणार. किंबहुना असा तर्कसंगती आणि प्रेरणादायी नसलेला, तूटक इतिहास वाचून विद्यार्थ्यांच्या गोंधळात भर पडून डोकं जड होत असेल असंच वाटतंय.. मग विद्यार्थी त्याकडे फक्त गुण मिळविण्यासाठी म्हणून पाहत असतील तर नवल नाही. असा अरधबोबडा, ब्रिटीश गुलामगिरी धार्जीणा, मुस्लीम धार्जीणा इतिहास वाचून कन्हैय्याकुमार आणि त्याच्या मागे उभे राहणारे विद्यार्थी की ज्यांना नक्षलवाद, अलगाववाद जवळचा वाटतो. मग ते महाविद्यालयीन, विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांमधे बुद्धीभेद निर्माण करून देशात गोंधळाचं वातावरण निर्माण करतात. ज्या गोष्टींपासून आझादी मागतात त्यासाठी आपण स्वत: नक्की काय प्रयत्न करतो आहोत हे न सांगता सगळा दोष तत्कालिन शासनावर टाकून आपण फक्त नारे बाजी करायला मोकळे....ही असली निष्क्रीयता देशहितासाठी काय कामाची?

मनात खूप प्रश्न आहेत: या आयसीएसइ अभ्यासक्रमातून पुढे गेलेले विद्यार्थी नक्की काय करत आहेत? देशाच्या कोणत्या कार्यात योगदान देत आहेत का परदेशातच स्थायीक झालेले आहेत? या अभ्यासक्रमात शिकवत असलेले शिक्षक नक्की कोणत्या अभ्यासक्रमात शिकलेले असतात? त्यांना या इतिहासात काही गैर वाटत नाही का? या अभ्यासक्रमात शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या सगळ्याची कल्पना आहे का? असेल तर ते यावर काही उपाय करतात का? की हे असं चालायचंच म्हणून गप्प बसतात? की इतिहास फारसा महत्वाचा नाही तो शिकून पैसे फार मिळणार नाहीत, एमएनसी मधे लठ्ठ पगारची नोकरी मिळणार नाही मग कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा? असा विचार केला जातो का? हे वाटतं तितकं सोप्पं आणि दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये. मधे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील इतिहासाच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांत हिंदू धर्म आणि भारत याविषयी चुकीची आणि अयोग्य माहिती छापून आलेली होती. त्याविषयी तेथील भारतीय मूळ असलेल्या, हिंदू विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कॅलिफोर्नीया शिक्षण मंडळाकडे दाद मागीतली त्या मिटींगचे व्हिडीओ मी पाहिले. त्याचप्रमाणे याविषयीच्या बातमीचा दुवा देखील देत आहे. त्या वेबसाईटवरची माहिती जरूर वाचा आणि ते व्हिडीओ पहा. मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की तिथले भारतीय मूळ असलेले सगळे पालक, विद्यार्थी यांना आपली मुलं नक्की काय शिकताहेत याविषयी चिंता आहे ना की त्यांना किती गुण मिळणार आहेत आणि पुढे इतिहास या विषयाचा उपयोग किती होणार याची. आपल्याकडील अभ्यासक्रमातील अशा घोळांविरूद्ध आवाज उठविण्यासाठी नक्की काय सोय आहे? आयसीएसइ सारख्या स्वायत्त संस्थांची अयोग्य मनमानी आणि त्यांच्या गोलमाल कारभारावर कोण अंकुश ठेवणार?

 भारतातील हिंदू संस्कृती सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे आणि हजारो वर्षे इतकी आक्रमणे होऊन देखील ती टीकून आहे. एखादी नदी कशी समुद्राकडे वहात असताना वाटेत येणारे सर्व काही आपल्या पोटात घेते आणि पुढे पुढे जात रहाते तशीच आपली हिंदू संस्कृती इतर धर्मियांमधील, संस्कृतींमधील गोष्टीपण आपल्यात सामावून घेऊन पुढे पुढे जात राहिली आहे. साचलेल्या पाण्याचं डबकं होतं म्हणतात आणि नदी ही कायम वहाती असल्याने जीवंत असते. तसंच काहीसं इतर असहिष्णु धर्मांच्या तुलनेत सहिष्णु अशा हिंदू धर्मा विषयी मला वाटतं....तो नदी सारखा वाहता असल्याने कायम जीवंत राहणार. पण हे गृहीत धरून आपण काहीच करायचं नाही हे बरोबर नाही. त्यामुळे योग्य तो विचार करून सुयोग्य कृती करायलाच हवी. इतर देशातील, संस्कृती, धर्मां मधील चांगल्या गोष्टी शिकायला आणि त्या आत्मसात करायला काहीच हरकत नाही पण त्याआधी आपलाच पाया पक्का नसेल तर वहावत जाण्याची शक्यता अधिक असते. आपल्या विद्यार्थ्यांचे तसे होऊ नये या काळजी पोटी हा सगळा खटाटोप केलाय. आशा आहे याचा कणभर तरी उपयोग होईल. 
आयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-१: (पार्श्वभूमी)  

2 comments:

  1. खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.

    नमस्कार ,
    '१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
    गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
    माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
    Telegram Channel name : @visionump
    Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

    प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

    मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

    मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

    आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

    आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

    तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. I read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
    सांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = visit gruhkhoj .


    ReplyDelete