Thursday 21 October 2010

मुक्त होणे...

छायाचित्र महाजालावरून साभार
(खालील उतारा श्री जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर आहे. मागे खूप वर्षांपूर्वी मी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राच्या मुख्य कार्यालयात गेले असताना तिथेच काच फलकात मला हा इंग्रजी उतारा दिसला. तो वाचल्यावर मला एकदम खूप काही गवसल्यासारखं वाटलं आणि मी तो माझ्या डायरीत लिहून घेतला. आजही मला अस्वस्थ वाटत असेल तर मी ताबडतोब हा उतारा वाचते आणि मन शांत होतं. असं काय आहे या उतार्‍यात? वाटलं तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावं. म्हणून हे भाषांतर करते आहे.)
*********************************************************************************
मुक्त (फ्री) होण्यासाठी आपल्याला आपल्याच आत असणार्‍या सगळ्या परावलंबित्वावर (डीपेन्डन्सी) मात करावी लागेल. जर आपल्याला हेच समजलं नाही की आपण असे इतरांवर अवलंबुन का आहोत तर आपण आपल्या परावलंबित्वावर मात करू शकणार नाही. आपल्या मुक्तीचा मार्ग हा आपण परावलंबी (डीपेन्डट) का आहोत हे समजलं तरच उघडेल नाहीतर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण मुक्ती म्हणजे काही फक्त एक प्रतिक्रीया नाही. पण प्रतिक्रीया म्हणजे काय? जर मी काही तुम्हाला लागेल असं बोललो म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तर तुम्ही माझ्यावर चिडाल. हे चिडणं म्हणजे प्रतिक्रीया की जी परावलंबित्वातुन जन्मलेली आहे. स्वातंत्र्य (इंडीपेन्डन्स) ही अजुन एक प्रतिक्रीया झाली. पण मुक्ती ही काही प्रतिक्रीया नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला प्रतिक्रीया म्हणजे नक्की काय हे समजत नाही आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपण कधीच मुक्त होणार नाही.
     एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? एखाद्या झाडावर प्रेम करणं किंवा एखाद्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणं किंवा एखाद्या पक्ष्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? जरी ते झाड तुम्हाला सावली, फळं असं काहीच देणार नसलं तरी ते तुमच्यावर अवलंबुन नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या झाडाची, त्या पाळीव प्राण्याची किंवा पक्ष्याची तुम्ही काळजी घेता, त्याला खाऊ-पिऊ घालता, त्याची नीगा राखता. यालाच प्रेम असं म्हणतात. आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही. आपल्यापैकी कित्येकांना हे असं प्रेम म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. कारण आपलं प्रेम हे मुख्यत: राग, लोभ, मोह, मद, मत्सर, भिती यांच्याशी निगडीत असतं. यामुळेच आपण आपल्या आतून प्रेम करून घेण्यावर पराकोटीचे अवलंबुन असतो. आपण फक्त प्रेम करून तिथेच सोडून देत नाही पण परतफेडीची अपेक्षा करतो आणि या अपेक्षेमुळेच आपण परावलंबी बनतो.
      म्हणून मुक्ती आणि प्रेम हे हातातहात घालून जातात. प्रेम ही काही प्रतिक्रीया नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमच्यावर प्रेम केलं तर तो एक केवळ व्यापार होईल, एक अशे गोष्ट की जी बाजारात खरेदी केली जाते. ते प्रेम नव्हे. प्रेम करणं म्हणजे त्याबदल्यात काही मागणं नव्हे. अगदी असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही काहीतरी देता आहात. अशाच प्रकारच्या निरपेक्ष प्रेमाला मुक्ती जाणून घेता येते. पण आपल्याला यासाठी शिक्षण मिळतच नाही. आपल्याला गणित, रसायनशास्र, भूगोल, इतिहास याचं शिक्षण मिळतं आणि तिथेच ते थांबतं देखिल. कारण तुमच्या पालकांची काळजी ही फक्त तुम्हाला चांगली नोकरी मिळणे आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे यासाठीच असते. जर त्यांच्याकडे पैसा असेल तर ते तुम्हाला परदेशात पाठवतील, पण सगळ्या जगासारखाच त्यांचाही हेतू हाच असतो की तुम्ही श्रीमंत बनावं, तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान असावं; जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता. कारण त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागते, अगदी निर्दयी व्हावं लागतं. पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतात की जिथे महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे पण प्रेम आजीबात नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखा समाज सतत संघर्षात आणि गोंधळलेल्या अवस्थेत जातो आहे. म्हणूनच आपल्या देशातील राजकिय नेते मंडळी, न्यायमूर्ती आणि तथाकथित आदरणीय विद्वान जरी सतत शांततेच्या गप्पा करत असले तरी त्या शब्दाला फारसा अर्थ प्राप्त होत नाही.
 **************************************************************************
 


6 comments:

  1. waaaah excellent...

    hats off to your efforts for posting all so nice stuff...

    keep going .. :-)

    ReplyDelete
  2. प्रेम निर्व्याज असावं.. तरच ते खर.. व्यावहारिक गोष्ट आणि प्रेम यांची गल्लत करूच नये. तरीही बहुतेक माणसे हीच चूक करतातच.. निर्व्याज प्रेमाला व्यवहारीकातेची झालर चढवून मोकळे होतात आणि त्या यातना अतिशय दु:खदायी असतात...

    ReplyDelete
  3. खरच खुप सुंदर उतारा आहे हा.इथे सादर केल्याबद्दल आभार...
    >>आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही.
    >>जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता.
    कोणीही काहीही म्हणो पण हे अगदी १०० % खर आहे.

    ReplyDelete
  4. खरंच सुंदर उतारा आहे...

    ReplyDelete
  5. taai, ha mool utaara kashatil ahe ? pustakachh naav kinva link kahi share karu shakta ka?

    ReplyDelete
    Replies
    1. Rhucha, aga ha utaara nakki konatya pustakatil aahe maahit naahi pan mala to Kanyakumarichya Notice board var milala hota.....J Krushnamurthy yanchya sahityatil aahe. Mala net var kuthe milala tar nakkich tyachi link dete. nahitar mool engraji utaara mazya kade aahe. to tula type karun pathavate. :-)

      Delete