Saturday 11 September 2010

माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो..........

 (छायाचित्र महाजालावरून साभार)
अकरा सप्टेंबर आलं की मला नेहमी स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उद्गारलेले "माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो.........."  हे उद्गार आठवतात. त्याच बरोबर याच अमेरिकेतील बंधु भगीनींवर "विश्वबंधुत्त्व दिनाच्या दिवशीच" २००१ साली झालेला भीषण हल्ला सुद्धा आठवतो. सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. जिथे लिहीलेलं असतं  "येथे थुंकु नका" तिथल्याच भिंतींवर पानाच्या पिचकार्‍यांनी रंग भरलेले असतात. शिवाजी महाराजांच्या किंवा महात्मा गांधींच्या नावाखाली त्यांच्या शिकवणुकीच्या बरोबर विरूद्ध वर्तन करायचं. कलीयुग आहे........पण स्वामी विवेकानंदांना मात्र भारत सार्‍या जगाला अध्यात्माचं ज्ञान देईल याची खात्री वाटत होती......म्हणून तर त्यांनी भविष्यच वर्तवलं होतं की "भारत हा एक दिवस जगतगुरू होणार आणि सार्‍या विश्वाला बंधुत्त्व, अध्यात्म शिकवणार". तसं आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म इतर जगाच्या तुलनेत मुरलेलं आहे. म्हणूनच इथे निर्वासीतांना आसराही मिळतो आणि शरण आलेल्याला अभय. हे स्वामी विवेकानंदांचे शिकागोच्या भाषणातील उद्गारांमधील काही शब्द आहेत. आज त्याप्रसंगाला ११७ वर्षं पूर्ण झाली म्हणून मनात विचार आला की स्वामी विवेकानंदांनीच वेळोवेळी त्यांच्या पत्रांतून आपल्या शिष्यांना लिहीलेल्या काही निवडक विचारांचं संकलनच प्रसिद्ध करूया. म्हणून ही प्रस्तावना!
(खालील विचार हे स्वामी विवेकानंदांचे असून "विवेकानंदांची पत्रे" या पुस्तकातील मी काढलेल्या टिपणांवर आधारित आहे.)
 १) भगिनी निवेदिता यांना: माझें ध्येय कांही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्वरत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनांतील प्रत्येक कार्यांत हे ईश्वरत्त्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
२) जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय. जो आत्मत्याग करेल तोच जगाला प्रकाश देईल. पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना आत्मबलिदान करावेच लागेल.
३) अंत:करणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
४) धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज चारित्र्याची नितांत गरज आहे.
५) संपूर्ण आयुष्य म्हणजे एक स्वप्न मालिका आहे. जाणीवपूर्वक ही स्वप्ने पहावीत इतकीच माझी आकांक्षा आहे.
६) प्रलय म्हणजे कार्याचे कारणांत विलीन होत जाणे होय आणि सृष्टी म्हणजे कारणांतून कार्य प्रकट होत जाणे होय.
७) वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फंदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
८) प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरूषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वत: प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साह्य करणे हाच परम पूरूषार्थ होय.
९) अनुभवानेच आपण सर्व शिकत जातो. दुर्दैव एवढेच की या ज्ञानाचा उपयोग मात्र या जगात करता येत नाही; कारण ज्या क्षणी आपण शिकून तयार झालो असे आपल्याला वाटते त्याच क्षणी जगाच्या या रंगभूमीवरून आपल्याला अदृष्य व्हावे लागते आणि हीच खरी माया आहे.
१०) या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिल्या प्रकारचे लोक खंबीर मनाचे, शांत, निसर्गापुढे मान तुकविणारे व कल्पनेच्या आहारी फारसे न जाणारे, परंतु चांगले, सज्जन, दयाळू व मधुर स्वभावाचे असतात. जग हे अशा लोकांसाठीच आहे. हे लोक सुखी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. याच्या उलट दुसर्‍या प्रकारचे लोक अत्यंत संवेदनक्षम मनाचे असतात, ते कल्पनाप्रधान असतात व त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात. हे लोक एका क्षणात आकाशांत भरारी मारतील, तर दुसर्‍या क्षणी एकदम खाली येतील. या लोकांच्या नशिबी सुख नसते. पहिल्या प्रकारच्या लोकांचे आयुष्य साधारणपणे सुखाच्या सम पातळीवरून जात असते, तर दुसर्‍या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा ओघ कधीच सम नसतो; कधी कधी हे लोक अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतात तर दुसर्‍याच क्षणी ते दु:खी होताना दिसतात. परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्‍हेचा वेडेपणा’ या सध्याच्या प्रचलित सिद्धांतात काही सत्यांश आहे यात शंकाच नाही.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्‍या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्‍या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.

19 comments:

  1. खूप छान !! शेवटचा पॉईंट खूप इफेक्टिव वाटला!!!

    ReplyDelete
  2. श्री दिपक परूळेकर,
    शतपावलीवर स्वागत. प्रतिक्रीये बद्धल धन्यवाद. मलाही शेवटचा मुद्दाच अधिक परिणामकारक आणि महत्त्वाचा वाटतो. खरंतर मी तो अधोरेखितच करणार होते. पण रांगेत शेवटी "अत्युत्तम" असते म्हणून मी ते शेवटच्या क्रमांकावर टाकले. :-))

    ReplyDelete
  3. लेखन आवडले. काय काय आवडले ते खालीलप्रमाणे

    १)सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना.
    २)वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फांदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
    ३)आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्‍हेचा वेडेपणा’

    स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळात गरजेचे असतील म्हणून लेखिकेने केलेले संकलन मला मोलाचे वाटले. उत्तम लेखनाबद्दल मन:पूर्वक आभार........!

    ReplyDelete
  4. खरं सांगु तर,मी त्या दुसर्‍या प्रकारात मोडतो

    फक्त,

    "परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे." हे वाक्य सोडुन


    हे हे हे !!!

    ReplyDelete
  5. अरेच्चा, आपले विचार किती जुळतायत. मी पण अगदी हेच लिहीणार होते....शेवटचं वाक्य वजा म्हणून. :-))

    ReplyDelete
  6. मराठीत म्हण आहे ना. "ग्रेट पीपल थिंक अलाईक". हे हे हे.

    ReplyDelete
  7. अलताई,
    शेवटचा परिच्छेद प्रचंड भावला!
    प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं विवेकानंदांवरचं व्याख्यान ऐकलं होतं एकदा आणि तेव्हापासून विवेकानंदांचा आणि प्राचार्यांचा भक्त झालो...
    खूप आवडली ब्लॉगपोस्ट!

    ReplyDelete
  8. धन्यवाद प्रोफेटा, अरे बर्‍याच जणांना तोच परिच्छेद भावतोय. मला देखिल सगळ्यात जास्त तोच आवडला. खरं तर मी तो परिच्छेद अपूर्ण लिहीला होता आता पूर्ण लिहीतेच.

    ReplyDelete
  9. १)>>>>जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय.
    २)>>>>वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फांदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते....
    ही दोन्ही विधाने अतिरंजित आहेत...अगदी विवेकानंदांनी केलेली आहेत म्हणून काय झाले?
    १) आपल्यात म्हण आहे..अज्ञानातच खरा आनंद असतो..जे माहीत नाही त्याबद्दलची वृथा चिंता करण्यापासून तर माणूस वाचेल ना. ;)
    २)प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतात..तसेच लग्नामुळे होते...त्यामुळे असे सरसकट विधान विनं सारखी व्यक्ती कशी करू शकते..हे तर अविवेकाचे लक्षण आहे.
    शेवटी जाता जाता सांगतो...प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच फायदा आणि तोटा हे दोघेही हातात हात घालून चालत असतात.
    ह्या जगात अशी कोणतीही एक गोष्ट नाहीये..की ज्यामुळे केवळ फायदा किंवा नुकसानच होऊ शकते.

    ReplyDelete
  10. त्यात स्वामी विवेकानंदांनी अतिरंजित आणि भडक काही लिहीलं आहे असं मला तरी वाटत नाही. काय चूक आणि अतिरंजीत आहे त्या वाक्यात? त्यांचं चरित्रं वाचलंत तर त्यांना आलेले नातेवाईकांचे अनुभव तसेच आहेत. त्यांनाच कशाला मला सुद्धा नातेवाईकांचे असेच अनुभव आलेले आहेत. मला अजुनही तसे अनुभव येत आहेत. नातेवाईक म्हणजे आपली प्रगती होत असएल तर त्यावर पहीले जळणारे असा माझा अनुभव आहे. मग त्यासाठी ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापासून ते तुमच्याशी पूर्णपणे संबंध तोडून टाकणे काहीच संपर्क न ठेवणे असले प्रकार करतात. वर पुन्हा तुम्हीच व्यस्त असता अशी मखलाशी असते. असो. आपल्याकडची लग्न व्यवस्था हा स्त्रियांच्या व्यावसायिक प्रगतीमधील एक मोठा अडथळा आहे. काही वेळा लग्न करून आणि सासरच्यांचं व्यवस्थित सहकार्य मिळतं पण अशा केसेस खूप कमी. तेव्हा जर एखादी मुलगी लग्न करण्याच्या बाबतीत विचार करून वेळ घेत असेल तर तिला प्रचंड टोचून बोलणे, तिचा आत्मविश्वास खच्ची करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करणे, घरच्यांवर मानसिक दबाव वाढवणे आणि हे करून कमीच झाले तर तिच्यासाठी अत्यंत अयोग्य अशी स्थळं सुचवणे. हेच नातेवाईक, जेव्हा खरी मदतीची गरज असते तेव्हा पळ काढतात. ते कुठेच पिक्चर मध्ये नसतात. पण त्या व्यक्तीबद्धल गॉसिप करायला एकदम पुढे असतात. माझ्यासारखे अनेक जण/जणी निघतील.

    आहो देका, विवाकनंदांच्या पत्रां मध्ये बर्‍याच ठीकाणी आपल्याला काही विरोधाभास असलेल्या गोष्टी आढळतात. मी त्याचा अर्थ असा घेते की ते ते विचार त्यांनी त्या त्या वेळी विशिष्ठ परिस्थितीत व्यक्त केले आहेत. त्यामुळे परिस्थितीचा प्रभाव त्यावर असतोच. काहे ठीकाणी ते एकदम आत्महत्त्येच्या आणि अतिशय डीप्रेशन आलेल्या गोष्टी बोलतात. पण पुढच्याच एखाद्या पत्रात त्याच्या उलट म्हणजे एकदम मनोबल उंचावल्याचं दिसून येतं. पण हे सगळे विचार त्यांचे स्वानुभवातून आलेले आणि प्रामाणिक आहेत. त्यामुळे मला तरी ते अविवेकी वाटत नाहीत.

    मान्य आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात. पण जी बाजू आपल्याला वरचढपणे दिसते तसेच आपल्या जीवनाच्या उद्देशांना सोयीची असते तीच आपण उचलुन धरतो. त्यांनी तेच केलं आहे. त्यांना समाजासाठी झटणारे तरूण हवे होते त्यावेळी म्हणून त्यांनी हे सगळे उद्गार काढलेत आणि विचार व्यक्त केलेत. पण आपण बाबा आमटे, अभय बंग यांसारख्या व्यक्ती पाहतो की ज्या संसारी आणि मुलं असूनही समाजासाठी झटतात. आता हे स्वामी विवेकानंद होते त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत अशक्य होतं. पण इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे आपल्या समाजात थोडीफार जी जागृती झाली आहे त्यामुळे ते शक्य झालंय. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत की अमेरिकेतील महिला या खूप प्रभावी आहेत कारण त्यांना पुष्कळच स्वातंत्र्य आहे. तीच जर परिस्थिती त्यावेळी भारतात असती तर त्यांनी अजुन समतोल असलेलं विधान नक्कीच केलं असतं.

    ReplyDelete
  11. "सर्व दु:खांचे मूळ अज्ञान आहे" हे अतिशय सत्य आहे. ते स्वामी विवेकानंदांनी केलंय म्हणून नाही तर आपण जर खरंच विचार केला तर ते सत्य आहे. उदा: एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले नाहीत किंवा एखादी गोष्ट माहीत नसल्यामुळे एखादी संधी हुकली तर तो दु:खी होतो. या दु:खाचं मूळ अज्ञानातच आहे. तसेच जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती निवर्तते तेव्हा आपल्याला खूप दु:ख होते. काही जण तर इतके शोकसागरात बुडतात की वेडे होतात, सन्यस्त वृत्तीचे होतात, किंवा अत्महत्त्या देखिल करतात. आता गेलेली व्यक्ती परत येणार नाही हे माहीती असलं तरी ते दु:ख करत असतातच नं. त्या व्यक्तीला आपल्या आठवणीं मध्ये आपण जीवंत ठेवू, त्या व्यक्तीचा आत्मा मरत नसतो ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेवून माणूस आपल्या मनाला सावरू शकतो. पण हेच जर नाहीच जाणून घेतलं तर ते अज्ञानच नाही का?
    आणि जर अज्ञानात सुख असतं तर माणसाने या विश्वाचं कोडं उलगडण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले नसते आणि प्रगतीही झाली नसती. त्याअनुषंगाने येणारे भौतिक सुखही आले नसते. म्हणजे शेवटी कोणतेही ज्ञान होणे हे महत्त्वाचे असते. अज्ञानात सुख आहे हेच विधान अतिरंजित आहे.

    ReplyDelete
  12. >>>>ही दोन्ही विधाने अतिरंजित आहेत...अगदी विवेकानंदांनी केलेली आहेत म्हणून काय झाले?

    लेखिकेने वरील सन्माननीय अनुदिनी लेखकाच्या मतांचा आदर करुन योग्य समाचार घ्यावा असे वाटते.

    -दिलीप बिरुटे
    [श्रद्धाळू]

    ReplyDelete
  13. अपर्णा तू जे काही म्हणालीस ते चूक आहे असे मुळीच नाही...तेही बरोबर आहे...पण आधीच म्हटल्याप्रमाणे त्याला दुसरी बाजूही आहेच की.
    मुळात लग्न व्यवस्था आहे म्हणून तर एक किमान नैतिकता लोक पाळतात..एरवी काय होऊ शकतें हे मी तुला सांगण्याची गरज नाहीये. नातेवाईक चांगले /वाईट असू शकतात...जसं सुदैव/दूर्दैव असतं तसंच ते चांगले नातेवाईक मिळणार की वाईट हेही ओघानंच आलं...मग एखाद्याचा किंवा काहींचा अगदी एकांगी अनुभव(तुला किंवा विवेकानंदांना आला) हेच जागतिक सत्य होऊ शकत नाही...त्या विशिष्ट लोकांपुरतं होऊ शकतं हे ठीक आहे...पण हे असं आहे म्हणून लग्न करू नका...किंवा का करतात..असले प्रश्न जाहीरपणाने..ते ही विनं सारखे लोक विचारतात..हे मला अजिबात समर्थनीय वाटत नाही.

    आता भौतिक सुख म्हणजे खरे सुख आहे काय? आपण आज ज्याला प्रगती म्हणतो..ती खरंच प्रगती आहे की अधोगती..वगैरे प्रश्न असेच आपडी थापडी सारखे आहेत...कारण आज आपण ज्याला प्रगती म्हणतोय...आणि जी ज्या ’तथाकथित’ ज्ञानाने झालेय अशा टेर्‍या बडवतोय...दुसरीकडे ह्याच सर्वामुळे जग विनाशाच्या,पर्यावरणाच्या,जागतिक तापमान वाढल्यामुळे निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांना उत्तरे शोधतांना..अधोगती वाटायला लागलेय..
    शेवटी काय आहे...प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते असं म्हणतात..तसंच त्या उत्तरातून अजून काही नवे प्रश्न निर्माण होत असतात..म्हणजे अमूक म्हणजे सुख आणि तमूक म्हणजे दु:ख वगैरे सब झूट आहे...हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत...
    असो. उगाच हा काथ्या कूटण्याने काहीही होणार नाही..कारण वर म्हटल्याप्रमाणे उत्तरातून प्रश्न आणि प्रश्नातून उत्तर अशी साखळी आहे...साखळी कसली हा चक्रव्य़ूह आहे...तेव्हा इथेच थांबतो.
    तुझ्यासाठी विनं महान आहेत..मान्य!
    माझ्यासाठी..ते इतरांहूनही फारसे वेगळे नाहीत. :)

    ReplyDelete
  14. देका, १) स्वामी विवेकानंदांनी त्या विधानात लग्न करू नका असं म्हंटलं नसून लग्न करण्याच्या फंदात पडतात याचं नवल वाटतं असं म्हंटलं आहे. २) माझे आणि विवेकान्ण्दांचे नातेवाईकांच्या बाबतीतले अनुभव सारखे असतीलच असे नाही पण मानवी प्रवृतीचं वाईट स्वरूप आम्हाला त्या अनुभवांतून दिसलं आहे. माझ्या सारखे अनेक आहेत. ३) त्यांची सगळी विधानं ही सामाजासाठी कार्य करण्यास आणि व्यक्तीची अध्यात्मिक उन्नती करून घेण्यासंदर्भात आहेत. ४) मी स्वामी विवेकानंदांना मानणारी पण लग्न केलेली आहे तसेच काही स्वामी विवेकानंदांचा गंध सुद्धा नसलेले पण लग्न न केलेले य जगात अधिक सापडतील. त्यामुळे तुम्ही ज्या अर्थी त्यांचं विधान घेत आहात त्या अर्थी ते नक्कीच नाही. ५) लग्न करून सुद्धा जोडीने सामाजिक कार्य करता येतं हे बाबा आमटे आणि अभय बंग तसेच अनेक विवाहीत जोडपी चालवत असलेल्या सामाजिक प्रक्ल्प यांसारख्यांच्या उदाहरणावरून दिसेल. तसेच विवेकानंद केंद्राचे अनेक कार्यकर्ते, रास्वसंघ सारख्या संस्थांचे अनेक प्रचारक आहेत की जे अविवाहीत राहून समाजासाठी झटत आहेत. त्याच बरोबर स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाशी काहीही संबंध नसलेले तात्या अभ्यंकरांसारखे लोक दिसतील की जे अविवाहीत असून तुमच्या आक्षेपा प्रमाणे समाजात अनैतिकता पसरवत आहेत. ६) तुम्ही शेवटी जो प्रगती म्हणजे काय हा मुद्दा उपस्थित केलात तो बरोबर आहे आणि मला तुमचं म्हणणं पटतंय. पण स्वामी विवेकानंदांचं म्हणणं "ज्ञान" म्हणजे अध्यात्मिक ज्ञान असंच आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी ती सगळी विधानं केली आहेत. स्वामी विवेकानंदांच्या मते जी विद्या भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी वापरली जाते ते ज्ञान नव्हे.
    तुम्हाला स्वामी विवेकानंदां बद्धल काय वाटावं किंवा कोणाच्या त्यांच्या विषयी काय भावना असाव्यात हा खूप वैयक्तीक प्रश्न आहे. पण त्यांची चाहती म्हणून नाही पण जर कोणी त्यांच्या विधानांचा (माझ्या लेखनातून) गैर अर्थ काढत असेल तर तो शक्य तेवढा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून येवढं सगळं लिहीलं.

    ReplyDelete
  15. सुंदर पोस्ट...मलाही तो शेवटचा भागच जास्त भावला..मी ही दुसरया प्रकारातलाच भरारया घेउन पडणारा.... :)
    बाकी त्या दोन मुद्द्यांबाबत देवकाकाच स्पष्टीकरण वाचल तर तेही पटते आणि तुझ स्पष्टीकरण वाचल कि ते ही पटते...पण देवकाकांनी "ते इतरांहूनही फारसे वेगळे नाहीत." असे म्हटले आहे.त्याला मी अजिबात सहमत नाही.इतरांसारखेच असुनही ते इतराहुन वेगळे होते हे त्यांच एकुण कर्तुत्वच आपल्याला सांगुन जाते.

    ReplyDelete
  16. स्वामी विवेकानंदांबद्दल कोणाला काय काय वाटते आणि कोणाला काय वाटेल या कराल काळात त्याचा विचारही करणेही कठीण आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार अतिरंजीत अशी प्रतिक्रिया येणे हे त्याचेच उदाहरण आहे असे वाटते. स्वामी विवेकानंद म्हणाले होते ” एक दिवस आपण सर्व मरणार आहेत. चिरकाल असे कोणीच टीकणार नाही. तेव्हा, उठा, जागे व्हा. निष्कपट व्हा. माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती वाढली पाहिजे आणि आदर्श असे चरित्र घडले पाहिजे, घडवले पाहिजे” असा उच्च आदर्शवादाचा विचार देणा-या थोर महापुरुषांपुढे, थोर कर्तुत्वापुढे आपण केवळ नतमस्तक व्हावं....!


    -दिलीप बिरुटे

    ReplyDelete
  17. पोस्ट प्रचंड भावली... शेवटचा परिच्छेद जास्त हे सांगणे न लगे

    ReplyDelete