Friday 12 November 2010

पीपली लाईव्ह



जेव्हा एखाद्या चित्रपटात गोष्ट किंवा कथेची मांडणी हीच हीरो असते आणि बाकीचे काम करणारे बाजूल पडतात....तेव्हा ते खरं पडद्यामागच्या टीमचं यश असतं. पीपली लाईव्ह मध्ये आमीर खानचं दर्शन असंच होतं. पीपली लाईव्ह खरंतर तसा उशीराच पाहण्यात आला. पण चित्रपट संपल्यानंतर पहिलं वाक्य ओठांवर आलं तेच: "आमीर खान झिंदाबाद". चित्रपटाचा विषय तसा गंभीर! म्हणजे शेतकरी आत्महत्त्यांचा. संपूर्ण चित्रपट प्रचंड विनोदी अंगाने पुढे सरकत जातो. एखादा निष्णात डॉक्टर जसा पेशंटच्या घशाखाली कडू कडू औषध गोड आवरणाच्या माध्यमातून उतरवतो अगदी तसाच आमीरखानने इतका गंभीर विषय पण विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे. हीच तर प्रसिद्ध आमीरखान स्टाईल! जेवढे मला दिल चाहता है, तारे जमीन पर, थ्री इडीयट्स हे त्याचे चित्रपट आवडले होते तेव्हढाच पीपली लाईव्ह पण आवडला. चार्ली चॅपलीनच्या विनोदाला जशी दु:खाची झालर असायची, प्रत्येक विनोदी चित्रपटात काही ना काही गंभीर संदेश असायचाच तसंच आमीर खानचं आहे. प्रसारमाध्यमांचं सध्याचं अतिरेकी रिपोर्टींग आणि त्यांची समाजच्या सर्व थरांत असलेली दहशत अगदी अचूक टीपली आहे. मला तर पदोपदी दिपक चौरासिया आणि बरखा दत्त यांचीच आठवण येत होती. संधीसाधू राजकारणी, बिनडोक वार्ताहर कसे असतात त्याचप्रमाणे असवंदेनशीलता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींमध्ये कशी असते याचं सुयोग्य चित्रण पीपली लाईव्हमध्ये आहे. 
नथ्थु आणि बुधिया या दोन शेतकरी भावंडांची पीपली लाईव्ह ही कहाणी. त्यांचं वडिलोपार्जीत शेत बॅंकेचं कर्ज थकल्याने बॅंकेलाच विकावं लागणार असतं. त्यासाठी गवतील राजकीय नेत्याकडे जाऊन सुद्धा मदत मिळत नाहीच उलट आत्महत्त्या करून "आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना एक लाख रूपये शासनाकडून मिळतात" ही माहीती पुरवली जाऊन आत्महत्त्या करण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा नथ्थु आत्महत्त्या करणार ही बातमी एका स्थानिक वर्तमानपत्रात छापून येते त्यावेळी त्या वृत्तपत्रचा परवाना काढून घेतला जातो पण हीच बातमी जेव्हा इंग्रजी चॅनलचे लोक टीव्हीवर लाईव्ह दाखवतात तिथुन पुढे खर्‍या विनोदाला सुरूवात होते. नथ्थु आत्महत्त्या करतो का? तो मेल्यावर त्याच्या घरच्यांना शासनाकडून एक लाख रूपयाचा मोबदला मिळतो का? त्यातून कोणाच्या अयुष्यात किती फरक पडतो? त्यांचं वडिलोपार्जीत शेत वाचतं का? यासगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि आमीर खानला शाबासकी देण्यासाठी पीपली लाईव्ह हा चित्रपट नक्की पहावा. आपल्या मा (माजलेल्या) केंद्रीय आणि राज्यस्तरीय कृषीमंत्र्यांनी हा चित्रपट पाहून काय बोध घेतला हा एक संशोधनाचा मुद्दा बनु शकतो.

6 comments:

  1. अजून पाहिलेला नाही हा चित्रपट.. पण लवकरच पहायची इच्छा आहे.जेंव्हा अशा ( वर लिहिलेल्या नांवांच्या )बिनडोक वार्ताहारांना पद्मश्री दिलीजाते तेंव्हा खरंच जिवाचा संताप होतो.

    ReplyDelete
  2. ऐकुन तर आहे पण पाहाण्याचा योग अजुन आला नाही... पण आमिर खानचे नाव पुरेसे आहे.. पाहाणं भाग आहे

    ReplyDelete
  3. "त्यांना" पद्मश्री दिली जाते कारण "त्यांनी" "विशिष्ट लोकांना" हवे ते काम चोख पार पाडले. शेवटी राजकारण दुसरं काय?

    ReplyDelete
  4. यातला विनोद त्या पातळीवर जमला नाहीये हे माझ वैयक्तिक मत आहे....
    मला वाटत तुम्ही "वेल डन अब्बा" पहा तुमच मत बदलेल....मी आधी वेल डन अब्बा पाहिलाय आणि नसता पहिला तरी हा चित्रपट मला तितकाच आवडला नसता....माझ्या मते ही black कॉमेडी जमली नाहीये.....असो...
    मी तसही कमी चित्रपट मन लावून पाहते त्यामुळे माझ वेगळं मत असू शकेल....

    ReplyDelete
  5. धन्यवाद अपर्णा. नाही मी "वेल डन अब्बा" पाहीलेला नाही. तुमचं मत बरोबरही असू शकतं. मी सुद्धा काही खूप चित्रपट पहात नाही. त्यामुळे मी पाहीलेल्या चित्रपटातील ही ब्लॅक कॉमेडी आवडली. वेशभूषा, छायाचित्रणात घेतलेले शॉट्स, चित्रपटातील कलाकारांचे क्लोजप्स यासगळ्यातून ही ब्लॅक कॉमेडी रंगवण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे असं मला तरी वाटलं. अगदी पूर्ण ताकदीनिशी जमला नसेलही.

    ReplyDelete
  6. अलताई,
    मीही अजून पाहिला नाहीये 'पीपली लाईव्ह' बघतो आता जमेल तेव्हा...तू लिहिलेल्या वर्णनावरून तरी मस्तच असावा असं दिसतंय.
    @ अपर्णा,
    'वेल डन अब्बा' बहुतेक 'जाऊ तिथं खाऊ' ह्या उत्तम मराठी सिनेमावर बेतलेला आहे (विदाऊट क्रेडिट्स), जमल्यास तो ही पहा... मकरंद अनासपुरेनं नेहमीसारखा न करता संयत अभिनय केला आहे :)

    ReplyDelete