Tuesday 27 July 2010

कॅनडा ट्रीप - भाग ३

कॉन्फरन्स:

 मी मुख्यत: ज्या कामासाठी कॅनडा मध्ये गेले होते त्यातील एक काम म्हणजे एड-मिडीया कॉन्फरन्स मध्ये पेपर प्रेझेंट करणे. कॉन्फरन्स टोरंटो मधील प्रसिध्द फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये (वेन्स्टीन हार्बर कॅसल) येथे भरली होती. त्या स्थानाचं महत्त्व म्हणजे आमची कॉन्फरन्स सुरू होण्याआधी तिथे जी-२० कॉन्फरन्स भरली होती आणि सगळ्या जी-२० देशांतील महत्त्वाच्या व्यक्ती त्याच हॉटेल मध्ये राहील्या होत्या. 

मी असं ऐकलं की टोरंटो मधील नागरीकांना जी-२० कॉन्फरन्स टोरंटो मध्ये नको होती कारण त्यात सगळ्या वादग्रस्त मुद्यांवर मानवी मुल्ये बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. त्याचाच निषेध म्हणून जी-२० दरम्यान तिथे खूप मोठी निदर्शने झाली. सुरक्षेचा भाग म्हणून टोरंटो डाऊन टाऊन भागात हवाई दलाची हेलीकॉप्टर्स फिरत होती. टोरंटो मधील नागरीकांनी कधीच न पाहीली इतकी सुरक्षाव्यवस्था तैनात होती. त्यामुळे त्याभागाला एका युध्दभूमीचंच स्वरूप आलेलं  होतं. आमची कॉन्फरन्स चालू झाली तेव्हा मात्रं आदल्याच दिवशी दुपारी ह्या सगळ्या गोष्टी संपल्या होत्या. 

अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये जाण्याचा माझा पहीलाच प्रसंग. बर्‍याच देशांतून डेलीगेट्स आले होते. विषेषत: युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा, चीन, जपान, कोरीया, तैवान आणि काही मध्य पूर्वेतील देशांतून आले होते. भारतातून बहुधा मी एकटीच होते. अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये एकाच वेळी समांतर असे १२ पेक्षा जास्ती सेशन्स चालू होते. त्यात की-नोट स्पीकर्स, इन्व्हायटेड स्पीकर्स, ग्रॅड्युएट स्टुडंट्स साठीची लेक्चर्स असं सगळं एकाच वेळी ठेवलं होतं. त्यामुळे एकूण सहभागी सदस्य खूप असले तरी प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये ते विभागले जात. त्यामागील हेतू असा की प्रत्येक सदस्याला त्याला/तिला महत्त्वाचा वाटत असेल अशाच विषयाचं प्रेझेंटेशन बघता येईल. मला धास्तीच वाटत होती की माझ्या प्रेझेंटेशनला कोणी येतंय की नाही कारण माझं नाव कुणाला माहीती नाही, माझी इन्स्टीट्युशन कुणाला माहीती नाही. त्यामुळे आले तर फक्त विषय बघुनच येतील. त्यात मी पी एच डी स्टुडंट त्यामुळे स्टुडंट्च चं ऐकायला किती लोक उत्सुक असतील असं मला वाटलं. पण जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ आली त्यावेळी त्या ठिकाणी १०-१५ लोक बघुन जरा हायसं वाटलं. काही काही प्रेझेंटेशन्स मध्ये फक्त २-३ लोकच होते, काही ठेकाणी फक्त प्रेझेंटर्सच होते. त्या तूलनेत मी मला भाग्यवान समजते. हे सगळे लोक विषयाचं नाव बघुन आले होते हे विशेष. प्रेझेंटेशन झालं आणि नंतर लोकांनी प्रश्न सुध्दा विचारले. जेव्हा एखाद्या प्रेझेंटेशन नंतर लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्याचा अर्थ असा की लोकांना प्रेझेंटेशन समजलं आणि इंटरेस्टींग वाटलं. जर काही समजलंच नाही आणि इंटरेस्टींग वाटलं नाही तर प्रश्नच विचारले जात नाहीत. माझ्या आधी ज्या जपानी माणसाचं प्रेझेंटेशन होतं त्याचा विषय बहुधा कोणाला नीट कळला नाही किंवा इंटरेस्टींग वाटला नाही. म्हणून त्याला कोणीच प्रश्न विचारले नाहीत. 

आता अनेक जणांच्या मनात हा प्रश्न उभा राहीला असेल की या सगळ्या कॉन्फरन्स आयोजन करणे आणि त्या अ‍ॅटेंड करणे याला इतकं महत्त्व का? मुख्यं म्हणजे त्या कॉन्फरन्स मध्ये आपला पेपर प्रेझेंट करणं याला इतकं महत्त्व का? याला अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे आपल्याच विषयात जगभरात कुठे कुठे काय काम चालू आहे याची अद्ययावत माहीती मिळते. त्यावर काम करणार्‍या लोकांशी भेटीगाठी होवून माहीतीचे आदानप्रदान होत असते. आपल्याला जर एखादी उपटुडेट गोष्ट माहीती नसेल तर त्याची माहीती आपल्याला मिळू शकते. जगभरातील इतर युनीव्हर्सीटीज मध्ये काम करणार्‍या लोकांशी आपला संपर्क होतो. मुख्य म्हणजे अशा कॉन्फरन्स मध्ये एखादा पेपर प्रसिध्द झाला म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाला मान्यता मिळते. ते सुध्दा सध्याच्या जागतिक पातळीच्या रीसर्च आणि अ‍ॅकॅडमीक कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर काही लोक कुठल्याही कॉन्फरन्स किंवा जर्नल मध्ये आपलं झालेलं काम प्रसिध्द न करता तसंच चालू ठेवतात त्याला जागतिक पातळीवर फारसं महत्त्व नसतं. पण अशा कॉन्फरन्सला जाण्यासाठी पैसा सुध्दा खूप लागतो. ज्यांचं काम चांगलं असेल अशांना काही संस्था कॉन्फरन्स अटेंड करण्या करता ग्रॅन्टस देतात. माझा कॉन्फरन्सचा खर्च माझ्या एच पी लॅब्स इंडीयाच्या फेलोशिप मधून झाला. खरंतर पी एच डी करणे याविषयी अनेक लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. अनेकांचं मत असं आहे की पी एच डी करण्याचा काही उपयोग नसतो. या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. यावर आधारित एक लेख मी लवकरच शतपावलीवर टाकेन आणि अनेकांचे गैरसमज ज्यामुळे झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. असो.
यासगळ्या दौर्‍या मध्ये तसेच माझ्या केंब्रीजमधील वास्तव्या मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषा आपल्याला वाटते तितकी प्रचंड वापरली जात नाही. कॅनडामध्ये फिरताना तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तर हे खूपच जाणवले की इथे इंग्रजी पेक्षा इतर भाषिकच लोक जास्त आढळले. इतर भाषाच जास्त कानावर पडल्या. गंमत म्हणजे इतर भाषिक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांत बोलतात पण भारतीय लोक एकमेकांशी इंग्रजीतूनच बोलतात. आपली अशी एक राष्ट्रभाषा असायला हवी. भाषिक प्रांतवादाचं राजकारण करून हिंदीला जी बगल दिली जात आहे ती योग्य नव्हे. याचा अर्थ मुंबईत सगळे व्यवहार हिंदीतून व्हावेत असं नाही. पण आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावर आपल्या देशातील लोक एका सामायिक भाषेत बोलू शकले तर किती बरं होईल. मला आठवतंय, मागे एकदा बंगलोर मध्ये आम्ही आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्स मध्ये आम्ही सगळे भारतीय एकमेकांशी इंग्रजीत बोलत होतो आणि एका चिली हून आलेल्या प्राध्यापकांनी मला हा प्रश्न विचारला की भारताची राष्ट्रभाषा इंग्रजी कशी काय? मला जरा ओशाळल्यासारखंच झालं. मग मी त्यांना आपल्याकडील दक्षिण आणि उत्तरेकडील भाषांचा वाद याविषयी थोडं सांगीतलं आणि हिंदी ही तशी राष्ट्रभाषा समजली जाते कारण जास्तीत जास्त लोकांना हिंदी समजतं आणि बोलता येतं. आपण युरोपीय देशांसारखं का नाही करत? कोणत्याही युरोपीय देशातील शिकलेल्या व्यक्तीला इंग्रजी शिवाय आणि त्यांच्या मातृभाषे शिवाय फ्रेंच, इटालियन, जर्मन इ. भाषा येत असतात. मग आपल्यालाच का आपल्या देशांतील भाषा शिकण्याचं वावडं असावं? असो.
म्हणजे अगदी अ‍ॅकॅडमीक रीसर्च जगतात सुध्दा चांगलं काम हे त्या त्या देशांच्या मातृभाषांतूनच होतं. मला कौतुक वाटतं ते चीन, जपान, कोरीया, तैवान, युरोपीय देश यांमध्ये काम करणार्‍या लोकांचं. त्यांचं सगळं काम हे मुख्यत: त्यांच्या देशाशी नाळ जोडणारं आणि त्यांच्या भाषां मध्ये असतं. याचा अर्थ क्वालीटी मध्ये कुठेही कॉम्प्रमाईझ नाही. त्यांच्या कामाची क्वालीटी ही इंग्लीश स्पीकिंग देशांसारखीच आहे. किंबहुना बर्‍याचवेळा क्वालीटी जास्त चांगली असते. त्यांची सगळी सॉफ्टवेअर्स सुध्दा त्यांच्या भाषां मधुनच असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या भाषांबध्दल, त्यांत बोलण्याबध्दल,  त्यांचा वापर करण्यबध्दल कमीपणा वाटत नाही. मला असं वाटतं की आपण हे सगळं यालोकां कडून शिकण्यासारखं आहे. आपल्या कडे टॅलंट आहे, बुध्दीमत्ता आहे. मग आपणच का आपल्या मातृभाषेतून क्वालीटीचं काम करायला कमीपणा मानतो. मातृभाषेतून शिक्षण घेण्यात कमीपणा मानतो?....हे अजुनही न उलगडणारं कोडं आहे. का अजुनही आपण गुलामगीरीच्या मानसिकतेतून बाहेरच पडलेलो नाही. आपल्याकडे मराठी माध्यमातून होणार्‍या कामाची क्वालीटी वाईट का असते? ह्या प्रश्नांची उत्तरं गांभीर्याने शोधायला हवीत.  मला असं वाटतं की नुसताच मातृभाषेचा वृथा अभिमान धरूनही उपयोग नाही. आपण सध्या तरी इंग्रजीचा वापर अद्ययावत ज्ञान शिकण्यासाठी करावा आणि शिकलेलं ज्ञान स्वत:पुरतंच मर्यादीत न ठेवता त्याचा मातृभाषेत वापर कसा करता येईल, ते ज्ञान मातृभाषेत कसं आणता येईल याचा प्रयत्न झाला पाहीजे. हे सगळं काम आजीबात सोपं नाही. काही दशकं जर हे काम केलं तर आपल्या पुढच्या ३ पीढ्यांनंतर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. मला तर असलं काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आपल्याकडे लोकांनी गटबाजी, एकमेकांचे पाय ओढणे, स्वार्थीपणा, तुम्ही आम्हाला काय शिकवणार, आम्हाला सांगणारे तुम्ही कोण हे असले प्रकार बाजूला ठेवले तर असं काम करणं खरंच शक्य आहे. आणि मग तीन पीढ्यांनंतर आपल्याला पण अशा जागतिक दर्जाच्या कॉन्फरन्स मध्ये भारतीयांची संख्या अधिक दिसायला सुरूवात होईल. हा सगळा पोकळ आशावाद नाहीये. असं खरंच होवू शकतं. आपली इच्छा शक्ती पाहीजे.

कॅनडा ट्रीप - भाग २

टोरंटो : वाहन व्यवस्था

(टीटीसी मधील स्ट्रीट कार, एका स्ट्रीट कार मध्ये बसून तिला क्रॉस होणार्‍या दोन स्ट्रीट कार्सचा फोटो)
(टीटीसी मधील ट्युब)

टोरंटोला "टोरंटो ट्रान्झीट कमीशन" म्हणजेच टीटीसी ही पब्लीक ट्रान्सपोर्ट सेवा उपल्ब्ध आहे. या सेवे आंतर्गत टोरंटो मधील पब्लीक बसेस, ट्राम्स (स्ट्रीट कार), अंडरग्राउंड रेल्वे (ट्युब)थे सगळं वापरता येतं. टीटीसी वापरण्यासाठी एका मार्गाला ३ डॉलर्स तिकीट असते. मग तो मार्ग कीतीही मोठा किंवा छोटा असला तरी तिकीटाच्या किंमतीत फरक नसतो. या सिस्टीम मध्ये आपण एक ट्रान्स्फर वापरू शकतो. म्हणजे एका ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ट्युब आणि बस वापरायची असेल तर रेल्वे स्टेशन पासून बस मध्ये बसायचे असल्यास त्याला एक ट्रान्स्फर म्हणतात. प्रत्येक वेळी तिकीट काढून बसणं खूप महागात जातं. त्यामुळे चक्क एक दिवसाचा मिळणारा पास वापरावा. तो अधिक परवडतो. त्या पास मध्ये आपण एक दिवस कुठेही टीटीसीची व्यवस्था कितीही वेळा वापरू शकतो. मग ट्रान्सफर्स किती घ्याव्यात यावर बंधन नसतं. एक दिवसाचा पास पाच डॉलरला मिळतो. तिथले सूचना फलक आणि नकाशे अतिशय उपयुक्त आणि सेल्फ एक्सप्लनेटरी असतात. त्यामुळे सिस्टीम समजुन घेण्यात थोडा वेळ लागला तरी आपण लगेचच टीटीसी आपली आपण वापरू शकतो. टोरंटो फिरण्यासाठी टीटीसीचा पास (एक आठवड्याचा पास ३६ डॉलरला मिळतो), टीटीसी सिस्टीमचा नकाशा, टोरंटो डाऊन टाऊनचा नकाशा, टोरंटोचा नकाशा, चौकस वृत्ती आणि थोडंसं धाडस असं सगळं घेवून गेलो तर आपलं आपण टोरंटो फिरू शकतो. टोरंटो मधील रस्ते खूपच सरळसोट आणि काटकोनात आहेत. त्यामुळे खूप कॉम्प्लीकेटेड नाही. उन्ह नसेल तर टोरंटो मध्ये उंचच उंच इमारतींमधून, अत्यंत स्वच्छ आणि फेरीवाले रहीत पदपथांवरून चालण्याचा आनंद घ्यायला हरकत नाही. पाश्चात्य देशांत सगळीकडेच पायी चालणार्‍या लोकांना कायमच महत्त्व आहे. म्हणजे तिथे रस्ता ओलांडण्यासाठी जरी स्वतंत्र जागा असल्या तरी जर एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर चार चाकी वाहनांतील लोक त्या पादचार्‍यासाठी थांबतात. आपल्याकडे हे अशक्यच आहे. कारण आपल्याकडे रस्ते हे पादचारी सोडून बाकी सगळ्यांच्या मालकीचे असतात..........निदान बाकी सगळे तसं वागतात. तिथले मोठे मोठे बगीचे पाहून खूप हेवा वाटतो. तिथल्या सर्व प्ब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स मध्ये अपंग, वयस्कर आणि लहान मुलांना घेउन जाणारे यांची अतिशय काळजी घेतलेली असते. त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी (बगीचे, वाहने, सार्वजनीक ठिकाणी बसण्याची बाकडी) वेगळ्या जागा राखून ठेवलेल्या असतात. आम्ही तिथे असताना २-३ वेळा वीज गेल्यामुळे संपूर्ण व्यवस्था बंद पडल्याचेही अनुभवास आले. ट्युब बंद पडल्यावर देखिल सारख्या सूचना सांगून आणि व्यवस्थेच्या स्थिती बध्दल अद्ययावत माहीती सांगून लोकांना परिस्थीतीची माहीती दिली जात होती. सगळीकडे स्वच्छता, नेटकेपणा आणि प्लॅनींग यागोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. 

तसं रस्त्यांवर सगळीकडे सांभाळून रहावे लागते. कारण बरेच दारू प्यायलेले लोक वावरताना दिसतात. टीटीसी मध्ये जर असा कोणी (अशी कोणी) चढला तर ताबडतोब पोलीस येवून त्यांना खाली उतरवतात. मुंबईच्या लोकल सिस्टीम मुळे कसा मुंबईच्या आयुष्याला एकप्रकारचा वेग आहे तसाच टीटीसी मुळे टोरंटोला एक प्रकारचा वेग आहे. कॅनडातील इतर ठीकाणचे लोक टोरंटो मधील या वेगवान आयुष्याला टोरंटो कॅरेक्टर असे म्हणतात. त्यांचं असंही म्हणणं असतं की टोरंटो मधील माणसं खूपच आत्मकेंद्री आणि अहंभावी असतात. जर कोणी एखाद्या रस्त्याची दिशा विचारली तरी तोंड दुसरीकडे फिरवून निघून जातात. आपणहून मदत करणारे फारच थोडे. पण टीटीसीच्या बस ड्रायव्हर्सना विचारलं तर व्यवस्थित सांगतात. म्हणजे माहीती हवी असल्यास मिळेल फक्त योग्य व्यक्तीला विचारायला हवी.

टोरंटोपासून नायगरा फॉल्स, किंवा अजुन थोड्या जवळच्या उपनगरांत जाण्यासाठी गो-ट्रेन नावाच्या सुपरफास्ट ट्रेन्स असतात. त्याच प्रमाणे टोरंटो हे शहर ज्या तळ्याच्या काठावर आहे त्या तळ्यात टोरंटो आयलंड्स आहेत. तिथे जायला फेरी बोट्स वेस्टीन हार्बर पासून मिळतात. टोरंटो मधून ओंटॅरिओ स्टेट्च्या उत्तर भागात जाण्यासाठी नॉर्थ लॅन्डर्स म्हणून कंपनीच्या ट्रेन्स असतात. न्यु लिस्कर्डला जाताना आम्ही त्यातून प्रवास केला होता. 
 (गो-ट्रेन, नायगरा फॉल्स ला जाताना)


  (नॉर्थलॅन्डर कंपनीची ट्रेन न्यु लिस्कर्डला जाताना-येताना)
सामाजिक व्यवस्था:

कॅनडा मध्ये कॅनेडीयन गव्हर्नमेंट तर्फे एक सोशल वेलफेअर सिस्टीम असते. की ज्यामधुन कॅनेडीअन गव्हर्नमेंट नोकरी नसलेल्या आठरा वर्षे वयाच्या पुढच्या, वयस्कर लोकांना, मानसिक दृष्ट्या अपंग-रूग्ण असलेल्या लोकांना, ठरावीक रक्कम त्यांच्या उपजीविकेसाठी देत असते. तिथे कोणीही उपाशी मराताना किंवा रस्त्यावर ट्रीटमेंट अभावी मेलेला दिसणार नाही. एखादा माणूस दारू पिउन रस्त्यावर लोळत पडला असेल तर त्याला लगेचच पोलीस अ‍ॅम्ब्युलन्स मधुन उचलून रीहॅबीलीटेशन सेंटर मध्ये पाठवले जाते. रस्त्यावर राहणार्‍या (होमलेस) लोकांसाठी गव्हर्नमेंटने घरं बांधून दिलेली असतात. तिथे रहाणारे लोक हे गव्हर्नमेंटच्या वेलफेअर फंड वर जगत असतात. वेलफेअर फंडच्या लाभार्थीं कडे लक्ष ठेवण्यासाठी सोशल वर्कर्स नेमलेले असतात. त्यांच्या मार्फत या लाभार्थींना हे पेन्शन किंवा रक्कम मिळते. तसं पाहीला गेलं तर आपल्याकडे भुकेने रस्त्यावर मरणारे लोक पाहीले, योग्य आरोग्य सेवे अभावी मृत्युमुखी पडणारे लोक पाहीले, रस्त्यावर भीक मागणारे अपंग पाहीले की कॅनडातील सोशल वेलफेअर सिस्टीम बरी वाटते. पण याचे अनेक दूरगामी वाईट परिणामही त्यांच्या समाजावर झालेले आहेत. जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो करावा लागत नसल्याने जे धडधाकट आहेत पण त्यांना सोशल वेलफेअरवर जीवंत राहता येते त्यांच्या मधे व्यसनाधीनता, स्वत:ला काहीही काम करता येते याचा आत्मविश्वास या सगळ्याचा अभाव आणि त्यातूनच आलेला एकटेपणा ......या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला जागोजागी डोक्यावर परिणाम झालेले, दारूडे, प्रचंड अ‍ॅग्रेसीव्ह लोक दिसतात. दारू पीण्यासाठी पैसे हवेत म्हणून भीक मागणारेही दिसतात. हे सगळं पाहीलं की वाटतं.........नको आपली व्यवस्था चांगली आहे. गरजवंतांनाच मदत मिळाली पाहीजे. पण लोकांमधील क्रयशक्ती, आत्मविश्वास, जगण्यासाठी काम करण्याची उर्मी मरता कामा नये. 

अशा गोष्टीं मध्ये आपण हे एक बरोबर आणि अमुक एक चूक असं म्हणू शकत नाही. पण दोन्ही मधील चांगल्याची सांगड घातली तर अधिक फायदा होईल असे वाटते.

Monday 12 July 2010

कॅनडा ट्रीप - भाग १


पार्श्वभूमी

खरंतर कॅनडाला माझं सासर. पण आमचं लग्न झाल्यापासून तिकडे जाण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही. त्याचं मुख्यं कारण म्हणजे भारत आणि कॅनडातील अंतर आणि आमची आपापल्या कामातील व्यग्रता. मधल्याकाळात सासूबाई-सासरे आम्हाला भारतात येवून भेटले. चार-पाच महीन्यांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी माझा एक अ‍ॅकॅडमिक पेपर निवडला गेला. ती कॉन्फरन्स टोरंटोला असल्याने त्यानिमित्ताने कॅनडाला जाण्याचा योग जुळून आला. मग पूर्ण ट्रीपचं नियोजन मार्च ते एप्रील महीन्यांत केलं. त्यातच कॅनडातीलच व्हॅन्कुव्हर येथील सायमन फ्रेझर युनिव्हर्सीटी आणि एडमंटन येथील अथाबास्का युनीव्हर्सीटी यांमधील रीसर्च लॅब्सना भेट देण्याचं ठरलं. हे सगळं ठरवण्यात माझे पीएचडी सुपर्व्हायझर श्री प्रो. रमणी यांचा फार मोठा वाटा आहे. जेव्हा मी हे सगळं ठरवत होते त्याच वेळी माझे सासरे आमच्या कॅनडा भेटीच्या बातमीने उल्हसीत झालेले होते. शेवटच्या दिवसापर्यंत कामात बुडल्यामुळे निघायच्या आदल्या दिवशी खरेदी केली. बुक केलेली इ-तिकीटे बघताना एक गोष्ट लक्षात आली की आम्ही एक महीन्यात सात विमानं आणि पाच प्रमाण वेळा (टाईम झोन्स) [भारत, जर्मनी, टोरंटो (ओंटॅरिओ), व्हॅन्कुव्हर (ब्रीटीश कोलंबीया), एडमंटन (अल्बर्टा) क्रॉस करणार होतो. मला एक प्रकारचं प्रवासाचं दडपण यायला लागलं. येव्हढा लांबचा (२२ तास, फ्रॅन्कफुर्ट मधील ३ तास ट्रान्सीट धरून) विमान प्रवास पहील्यांदाच होणार होता त्यामुळे जेट-लॅगचा काय परिणाम होईल याची धास्ती वाटत होती. नवरा (ज्याने लहानपणापासून प्रचंड विमानप्रवास केलेला आहे कमीत कमी सामानात) आणि वडील (ज्यांचं पूर्ण भारतभ्रमण कामा निमीत्त झालेलं आहे) बरोबर असल्याने माझी धास्ती कमी झाली....पण एक मोठा प्रवास म्हंटला की मला तरी खूप ताण येतो......तसा मनावर ताण होताच. मागे इंग्लंडला जाताना एकटीनेच प्रवास केला होता आणि तो पहीलाच परदेश प्रवास असल्याने इतका प्रचंड ताण आला होता की मी इंग्लंडला जायला निघण्या आधी आठ दिवस जेवूच शकत नव्हते...असो. इतका प्रचंड प्रवास असल्याने (म्हणजे सात विमानं बदलणं इत्यादी) आम्ही अत्यंत कमी सामान जवळ बाळगलं. त्यामुळे सामान वाहून नेण्याचा त्रास तुलनेने खूप कमी झाला (यासाठी माझा नवरा अश्वमित्रं आणि सासरे श्री डेव्हीड अर्नेस्ट यांना धन्यवाद). म्हणता म्हणता जाण्याचा दिवस उगवला. मित्रंमंडळी आणि नातेवाईक यांचे शुभेच्छांसाठी दूरध्वनी येतच होते. अशाप्रकारे आप्तेष्टांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आणि शुभास्तेपंथान: असे म्हणत दिनांक २८ जून २०१० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री सुमारे २.१५ वाजता आम्ही बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमचा कॅनडा प्रवास सुरू केला.

विमानप्रवास

मध्यरात्रीचं विमान असल्याने झोपेचं खोबरं झालं होतं. लुफ्तान्साच्या विमानात बसल्यावर लक्षात आलं की आपण आधीच १२ तास आधी आपली आसनं ऑनलाईन बुक करू शकतो. त्यामुळे ह्यावेळी उरलेल्या मधल्या जागां मधील आसनं घ्यावी लागली. (श्री शशी थरूर यांनी इकॉनॉमी क्लासला कॅटल क्लास का म्हंटलं असेल याचा दुसर्‍यांदा प्रत्यय आला. पहील्यांदा एअर इंडीया च्या विमानात. असो.) तिघात मिळून दोन बॅग्स चेक इन केल्या होत्या आणि त्या एकदम टोरंटो ला मिळणार होत्या, तसेच बंगलोर विमानतळावरच आमची फ्रॅन्कफुर्ट ते टोरंटो आसन व्यवस्था बुक झाली होती त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. प्रचंड झोप आलेली असल्याने आणि टीव्हीची सोय नसल्याने आम्हाला छान झोप घेता आली. लुफ्तान्सामधील जेवण आणि नाश्ता खूपच छान होतं. विमानात सगळेच झोपलेले असल्याने नक्की बाहेर उजेड आहे की अंधार हे समजत नव्हतं. बर्‍यापैकी झोप मिळाल्यावर जाग आली तेव्हा सूचनांच्या फलकावर युरोपच्या नकाशावर विमान फ्रॅन्कफुर्ट पासून किती दूर आहे हे दाखवत होते. त्यावेळी ते इस्तंन्बुल पार करणार होते. आम्हाला फ्रॅन्कफुर्ट ला पोहोचायला अजुन एक तास दहा मिनीटे लागणार होती. घड्याळात अजुनही भारतीय प्रमाणवेळ असल्याने नक्की कितीवाजता पोहोचेल याचं कॅलक्युलेशन माझ्यामनात चालू होतं.

आम्ही फ्रॅन्कफुर्टवर उतरलो तेव्हा सकाळचे सात वाजले होते. उतरल्यावर लक्षात आलं की आमच्या इ-तिकीटावरचा फ्लाईट नाव-नंबर आणि बोर्डींग पास वरचा फ्लाईट नाव-नंबर वेगवेगळे आहेत. ताबडतोब ट्रान्झीटच्या खिडकीपाशी जावून शहानीशा केल्यावर लक्षात आलं की लुफ्तान्सा कंपनीचा एअर कॅनडा कंपनीशी करार आहे. त्यामुळे लुफ्तान्सातील ट्रान्सीट मधील प्रवासी त्या विमानात बसवले जातात. थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही एअर कॅनडाचं टर्मीनल शोधायला सुरूवात केली. सकाळ असल्याने कदाचित फ्रॅन्कफुर्ट विमानतळ पूर्णपणे रीकामा होता. चुकुन ३-४ प्रवासी दिसले तर दिसत होते. फ्रॅन्कफुर्टवर आमचं सिक्युरीटी चेक मध्ये संपूर्ण सामान स्कॅनकरायला लावलं (अगदी पायातील बूट वगैरे काढायला लावून). गंमत म्हणजे स्त्रियांचं स्वतंत्र पणे पूर्ण चेकींग केलं पण पुरूषांचं करत नव्हते. तिथेच दोन कुत्र्याची पिल्लं सुध्दा सिक्युरीटी चेक पास होवून आणलेली दिसली. (त्यांचं स्कॅनिंग केलं नसावं कारण ते ओरडत नव्हते. कदाचित अतिरेक्यांना अजुन प्राण्यांमार्फत बॉम्ब पेरायची कल्पना मिळाली नसावी.) आमच्या ४६ व्या टर्मीनल पाशी येईपर्यंत (चालत) आमची दमछाक झाली. एकूण साधारण एक ते दीड तास लागला. कमी सामान बरोबर असल्याने हायसं वाटलं. ४६ क्रमांकाच्या फलाटावर आल्यावर (न रहावून मी हा शब्द वापरते आहे कारण बंगलोरच्या लुफ्तान्साच्या सेवेच्या तुलनेत एअर कॅनडाची फ्रॅन्कफुर्ट मधील सेवा म्हणजे प्रचंड सावळा गोंधळ होता. आपल्या भारतातील एसटी स्टॅंड वर जसे गाडी जिथे लावली असेल तिथे लोकांना नेमकेपणाने दिशा न दाखवता वेगवेगळ्या ठिकाणांना पाठवून प्रवाशांचा फुटबॉल करतात त्याप्रमाणे) आम्हाला विमान प्रवेशासाठी उगाचच इकडून तिकडे फेर्‍या मारायला लावल्या. मग शेवटी पुन्हा माझी सगळी कागदपत्रं तपासली....कॅनडाला जाण्याचा उद्देश विचारला आणि इमीग्रेशन क्लीअरन्स चा शिक्का मारून मिळाला. विमान सुटायच्या वेळेप्रमाणे पाच मिनीटे आधी बीझनेस क्लासवाल्या लोकांना आधी पाठवले आणि मग इकॉनॉमीवाल्यांना. लुफ्तान्साच्या तुलनेत एअर कॅनडाचा स्टाफ कमी मैत्रीमधे वाटला. आम्हाला तिघांनाही छान आसनं मिळाली होती. आम्ही खूष होतो. विमान सुटल्यावर जेव्हा एअर होस्टेस जेवण द्यायला आली तेव्हा लक्षात आलं की आम्ही आधीच शाकाहारी असल्याचं सांगायला हवं होतं (आमच्या पुण्याच्या एजंटने ते केलं नव्हतं. वेगवेगळ्या धड्यांबरोबर हा सुध्दा एक धडा की विमान तिकीट बुक करताना एजंटने आहाराचा पर्याय भरला आहे नं याची खात्री करावी नाहीतर पूर्णपणे मांसाहार असलेल्या देशांच्या विमान कंपन्यांच्या विमानात सांगीतल्याशिवाय शाकाहार मिळणार नाही). दोनच पर्याय दिसत होते एकतर समोर आलेला मांसाहार खा नाहीतर उपाशी रहा. (९ तास + १ तास इमीग्रेशन + हॉटेल मध्ये पोहोचे पर्यंतचा वेळ). आमच्या नशीबाने आमची एअर होस्टेस चांगली होती. एक तासाने तिने आम्हाला दोन व्हेज पास्ता आणून दिले. माझा नवरा चीज सुध्दा खात नाही म्हणून त्याने ते खाल्ले नाही. मी सुध्दा चीज खात नाही पण त्यावेळी मला प्रचंड भूक लागल्याने आणि त्या पास्ताची चव चांगली असल्याने पास्ता खाल्ला. एअर कॅनडाची फ्लाईट मस्तच होती. प्रशस्त आसनं आणि प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र टीव्ही, त्यात वेगवेगळ्या चॅनल्सची सोय. म्हणजे मूव्हीज मध्ये सुध्दा (बॉलीवुड सोडून) इतर भाषांमधील छान छान चित्रपट होते. अ‍ॅलीस इन वंडर लॅन्ड आणि एक नवीन जपानी चित्रपट (अ वंडरफुल होम ऑफ उलुलु) पाहीला. जपानी चित्रपटावर एक स्वतंत्र लेख लवकरच लिहेन. टोरंटोला विमानतळावर उतरल्यावर जी-२० मुळे अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागले. पण फ्रॅन्कफुर्टच्या तुलनेत गोंधळ आजीबात नव्हता. ट्रान्सीट नंतर आम्हाला ५ मिनीटात आमच्या दोनही बॅग्स कुठेही न हरवता व्यवस्थित मिळाल्या. अशाप्रकारे आमचा २२ तासांचा विमानप्रवास संपवून आणि वेगवेगळे धडे-अनुभव घेत आम्ही सुखरूप टोरंटोला पोहोचलो.

पुढील भागात कॉन्फरन्सचा अनुभव वाचायला मिळेल.......कधी?.......सध्या प्रवासात असल्याने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा.