Tuesday 14 December 2010

२-जी स्पेक्ट्रम आणि २६/११ एक कनेक्शन!!

 २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात कोणी किती हजार किंवा लाख कोटी रूपये खाल्ले याची मोजदाद फक्त त्या पैसे खाणार्‍यांनाच माहीती. पण एकूणच वर्तमानपत्रात ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत, तसेच विविध नेत्यांची अगदी वेळ ठरवून दिल्यासारखी वादग्रस्त वक्तव्य येत आहेत त्यावरून तर माझा हाच कयास आहे की २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि २६/११ चा हल्ला यात नक्की काहीतरी कनेक्शन आहे. कसं ते बघुयात.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळा हा नक्की काय आणि कशामुळे झाला ते समजून घेणं क्रमप्राप्त आहे. माझ्या अल्प बुद्धीनुसार मला समजलेलं २-जी घोटाळ्याचं सोप्या भाषेतील स्वरूप म्हणजे सरकार तर्फे कोणतंही काम जेव्हा एखाद्याला द्यायचं असेल तर टेंडर म्हणजेच निविदा मागवल्या जातात. २-जी स्पेक्ट्रम म्हणजे आपल्या देशात मोबाईलच्या प्रचंड वाढलेल्या वापरामुळे उपल्ब्ध स्पेक्ट्रम (बॅंडविड्थ) अपूरी पडत होती. म्हणून दुसर्‍या जनरेशनची म्हणजेच अधिक बॅंडविड्थ मोबाईल कंपन्यांना देऊ करणे म्हणजे २-जी स्पेक्ट्रम देणे. आता हे अशा पद्धतीने होतं की ज्या कंपन्या अशी बॅंडविड्थ पुरवतात त्यांना अधिक क्षमतेचे भले मोठे टॉवर्स उभे करावे लागतात. त्यासाठीच सरकार त्यांच्या कडून पैसे घेते (एक गठ्ठा). मग त्या कंपन्या भारतातील मोबाईल कंपन्यांना ती बॅंडविड्थ विकतात. भारतीय मोबाईल कंपन्या अधिकाधिक वेगवान कनेक्शन पुरवून ते लोकांकडून वसूल करतात. सरकार ज्यांच्याकडून पैसे घेते या कंपन्या मुख्यत: विदेशी आहेत. आता २-जी स्पेक्ट्रम च्या बाबतीत सरकारने निविदा मागवायच्या होत्या पण स्पेक्ट्रमची किंमत आधीच्याच भावाने अत्यंत कमी दर घेऊन विकली गेली. निविदा तर काढलीच नाही पण जो पहिला आपलं बजेट समोर ठेवेल त्याला ते दराची कोणतीही चौकशी न कराता दाखवलेल्या दराने विकलं गेलं. त्यानंतर थोड्याच दिवसात लक्षात आलं की त्या कंपन्यांनी आजचा दर न लावल्याने सरकारचं काही लाख कोटींचं नुकसान झालं. कारण त्यांनी आणि भारतातील मोबाईल कंपन्यांनी यात प्रचंड पैसा कमावला. आता ह्या असल्या आतबट्ट्याच्या व्यवहारासाठी (जेव्हा चोर पकडला गेला तेव्हा) फक्त माजी केंद्रीय मंत्री एकटेच जबाबदार कसे? ते त्याच खात्यात मंत्री होते म्हणून त्यांची मान अडकलेली, सोडवणं अशक्य. म्हणून ते बळीचा बकरा झाले. बाकीच्यांचं काय? 

त्यापाठोपाठच कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रात असलेले सत्ताधारी यांच्यातील दलाल (फिक्सर) नीरा राडीया आणि भारतीय उद्योग जगताचे अनभिषिक्त सम्राट रतन टाटा यांचं खासगी संभाषण बाहेर आलं. टाटांनी "राजा" यांनीच दूरसंचार मंत्री बनावे असा आग्रह का धरला याचं आपल्या सामान्य बुद्धीला उत्तर मिळत नाही. साधारण एक महिन्यापूर्वी लोकसत्तामध्ये रतन टाटांच्या फाउंडेशनने २६/११ च्या हल्ल्यातील पीडीतांना कशी मदत केली आहे याचे वर्णनच लिहून आले होते. त्यांनी केवळ ताज आणि ट्रायडंट पुन्हा एक वर्षात उभेच नाही केले तर हल्ल्यात ताजच्या ज्या कर्मचार्‍यांना प्राण गमवावे लागले किंवा जखमी व्हावे लगले अशांच्या कुटुंबियांना सढळ हाताने मदत केली आहे. ते येवढं करूनच थांबलेले नाहीत तर सी एस टी हल्ल्यात पीडीत अनेकांना सढळ हाताने मदत केली आहे. आता जागतिक मंदीच्या काळात, २६/११ च्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झालेलं असताना देखिल टाटा उद्योग समूहाला इतका खर्च परवडतो तरी कसा? म्हणजेच केंद्रातील कॉंग्रेस सरकार आणि टाटांसारख्या इतर उद्योग समूह भारतीय आणि विदेशी यांच्या एखादा छुपा करार झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच २-जी स्पेक्ट्रम मध्ये कॉंग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ठरवून राजा यांना बळीचा बकरा बनवलं. संयुक्त संसदीय समीतीच्या चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळत आहेत. जर का कॉंग्रेसचे नेते यात गुंतलेले नाहीत तर जेपीसी चौकशी करण्यास विरोध का? सगळ्यांचंच बिंग फुटेल म्हणून? मग जनतेचं या मोठ्या गोष्टींपासून दुर्लक्ष होण्यासाठी उगाचच वादग्रस्त विधानं करून सगळ्यांचंच लक्ष वेगळीकडेच वेधायचा प्रयत्न करायचा. कदाचित २-जी स्पेक्ट्रमचं जहाज कधी ना कधीतरी फुटणार हे माहीत असल्यानेच त्याआधी राष्ट्रकुल घोटाळे, आदर्श, गुलमोहर इमारतींचे घोटाळे आधी बाहेर काढले. टाटा समूहाचं झालेलं नुकसान वेगळ्या प्रकारे भरून आणलं कॉंग्रेसने आणि त्याच बरोबर टाटांच्या गळ्यात दी बीगेस्ट फिलॉन्थ्रॉपीस्ट इन इंडीया अशा उपाधीची (अनौपचारिक) माळही पडली आहे. सामान्य जनता, चाकरमाने, करदाते यांचे काय? त्यांची स्थिती काही सुधारली नाही. उलट त्या क्रूरकर्मा कसाबला वाट्टेलते बोलू देण्यासाठी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न होता उगाचच खटल्याचा, अपिलाचा फार्स चालू आहे. आणि हे सगळं देखिल पुन्हा करदाते आणि जनसामान्य यांच्याच खिशातून.
रात्र वैर्‍याची आहे.

4 comments:

  1. टाटांचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे तर लक्षात येत नाही. पण टाटा कंपनी कधीही कुठेच लाच देऊन काम करून घेणे यात विश्वास ठेवत नाही. कामगारांच्या फायद्याचया पुढे किंवा सुरक्षितते पुढे टाटा कधीच कॉम्प्रोमाइझ करीत नाहीत. ममता बॅनर्जीच्या माणसांनी एका इंजिनिअरला सिंगूरला मारहाण केल्याबरोबर एका क्षणात तिथला कारखाना बंद करून गुजराथला हलवण्याचे निर्णय ( फायनान्शिअल लॉस ची पर्वा न करता) फक्त टाटाच घेऊ शकतात.
    मला स्वतःला विचाराल, तर रतन टाटा या उद्योगपती बद्दल उद्योग पती म्हणून सगळ्यात जास्त आदर आहे आजच्या घटकेला.

    ReplyDelete
  2. महेंद्रजी च्या मताशी मी सहमत आहे ....

    ReplyDelete
  3. खरंतर कुणाचा या प्रकाराशी कितपत संबंध आहे हे काहीच स्पष्ट नाही आहे. फक्त राजांना टारगेट करून (म्हणजे जो सापडला तो चोर) या न्यायाने आपण असंही म्हणू शकत नाही आहोत की बाकी कुणीच यात गुंतलेलं नाही. इतकेच जर इतर राजकारणी स्वच्छ असतील आणि फक्त राजकारणीच नाहीत तर इतर उद्योगपती (टाटांसकट) गुंतलेले नसतील (म्हणजे भ्रष्ट राजकारणी आणि उद्योगपती यांचं साटंलोटं बाहेर येणार नसेल) तर कॉंग्रेस येवढ्या मोठ्या घोटळ्याच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीस का तयार नाही? टाटांची त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी असलेली बांधीलकी माहीती आहे. पण मला काही प्रश्नं पडलेले आहेत त्याची उत्तरं कुठेच मिळत नाहीयेत. येवढ्या जागतिक पातळीच्या आर्थिक मंदीच्या काळात टाटा समुहाचं इतकं प्रचंड नुकसान झालं असताना देखिल एक वर्षांत ताज आणि ट्रायडंट पुन्हा उभी राहतात, तसेच टाटांच्या सोशल वेलफेअर फंड मार्फत जे त्यांचे कर्मचारी नाहीत अशा पिडीत लोकांना घसघसशीत मदत मिळते आणि हे सगळं दोन वर्षं पूर्ण व्हायच्या आत.........इतका पैसा आला कुठुन? टाटांनी या दीड वर्षांतच टाटा डोकुमु लॉंच केलंय. जर त्यांचे हात स्वच्छ आहेत तर त्यांनी २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेस आणि राजा यांची पाठराखण का करावी?
    माझी मनापासून इच्छा आहे की टाटांनी स्वच्छ असावं. पण भारतातील एकूण परिस्थिती पाहता लाच दिल्या घेतल्या खेरीज कोणतीच कामं होणार नाहीत (जो पर्यंत राजकारणी लोक लाच घेणारे नाहीत तोपर्यंत: गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी स्वच्छ राजकारण करून उद्योग जगताला सुद्धा गुजरातकडे वळवलं आहे. टाटांनी सिंगूर मधून प्रकल्प गुंडाळायला एका कर्मचार्‍याचा मृत्यु हेच एक कारण आहे यावर विश्वास बसत नाही. एकूण परिस्थिती पाहता टाटांना कल्पना आलेली होती की सिंगूर मध्ये हा प्रकल्प चालणं अशक्य आहे कारण राजकिय इच्छाशक्तीच नाहीये. त्यांचे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्यांनी प्रकल्प दुसरेकडे हलवण्याचा चतुर निर्णय घेतला (त्याला कोणी कुठला रंग दिला तो भाग महत्त्वाचा नाही) त्या निर्णयास योग्य असा पाठींबा नरेंद्र मोदींनी गुजरात मध्ये त्यांना जागा देऊन केला. टाटा आणि गुजरात यांचं फार जुनं नातं आहे. तिथे राजकिय इच्छा शक्ती आणि सुरक्षेची हमी या दोनही गोष्टी मिळाल्या मुळे सिंगूर मधला प्रकल्प हलवणं आणि नॅनोचे उत्पादन तातडीने चालू करणे शक्य असल्याने तसे घडले. यात एका कर्मचार्‍याच्या मृत्युचे एक निमित्त होते. बाकी काही नाही.

    ReplyDelete
  4. एका वेगळ्या दृष्टिकोनातुन लिहिलेला आपला लेख नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करतो...अजुन एक शक्यता ती अशी कि २जी घोटाळ्यातील बर्‍या पैकी रक्कम एलटिटिईला पुनरुज्जिवित करण्यास देखिल वापरली गेली असावी अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे...इतक्या मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार बघता हे किती सोकावलेत आणि निर्ढावलेत ते लक्षात येते.

    ReplyDelete