Sunday 21 November 2010

विक्रम - घोटाळ्यांचे आणि निर्लज्जपणाचे!!

राष्ट्रकुल खेळांतील भ्रष्टाचाराची नांदी झाली आणि जणूकाही सगळ्या विक्रमी घोटाळ्यांचा बांध फुटला आणि सगळे सरकारी पोतड्या सोडून पटापटा बाहेर पडले. आता एक बाहेर पडल्याचा परिणाम म्हणून बाकीचे बाहेर आले की ते सहजच बाहेर पडले हा एक संशोधनाचा मुद्दा असू शकतो. पण अशा संशयास वाव आहे. कलमाडी राष्ट्रकुल मधे येवढे घोटाळे करूनही सध्या चीनमध्ये भरलेल्या एशियाडमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत यातच सगळं आलं. मग ती कारवाई वगैरे बघुहो. काय घाई आहे. कदाचित कलमाडींवर कारवाई करणार असं सांगतानाच दबक्या आवाजात त्यांच्या कानात ही देखिल कुजबुज गेली असण्याची शक्यता आहे....की "कलमाडी तुम्ही निश्चिंत असा. आहो तुम्ही येवढं खाल्लंय तर किमान तोंड देखलेपणाकरता तरी आम्हाला तुम्हाला दूर ठेवलंच पाहीजे. तुम्ही निवांत चीन मधील एशियाड मध्ये तुमच्या (आणि आमच्या) मनी भोजनाची बोली लावा. इकडे आम्ही एकसे एक विक्रमी घोटाळ्यांचे बॉम्बगोळे टाकतो. आहो जनतेची स्मरण शक्ती इतकी वाईट आहे की आपल्याला काळजीचं कारणच नाही. आपण एकसे एक विक्रमी घोटाळ्यांच्या आवाजाने लोकांचे कान बधीर आणि डोळे दीपवून टाकू. म्हणजे जनतेची तसेच विरोधी पक्षांची अवस्था कोणत्या घोटाळ्याचा निषेध करू आणि कोणाला खरंच दोषी मानू अशी संभ्रमित होईल. मग आम्ही मि क्लीनना व्हॅक्युम क्लीनर सहित पाचारण करू.......पक्षाला क्लीन करण्यासाठी. तोपर्यंत जनता अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे निर्माण झालेल्या तसेच मा कृषीमंत्र्यांनी वेळीच साठेबाजांना विविध विधानं करून आगाऊ सूचना दिल्यामुळे निर्माण झालेल्या महागाईचा विचार करत जीवनाचं रहाटगाडगं ओढायला सुरूवात करेल. कोणाला येवढा वेळ आहे लक्षात ठेवायला आणि जाब विचारायला?" झाले कलमाडी या कानमंत्राने एकदम सुखावले आणि बिनधास्तपणे चीनला पुढची बोली लावण्यासाठी गेले.
इकडे आदर्शचं भूत कोणी बाहेर काढलं हे अगदीच ओळखता येतंय. पण ती व्यक्ती हे विसरली की आपण शेखचिल्लीपणा करायला जातो आहोत. पण म्याडमचा वरदहस्त इतका जबरदस्त आहे की लगेच.....शूर आम्ही सरदार (म्याडमचे) आम्हाला काय कुणाची भिती? म्हणूनच येवढा २६/११ चा हल्ला झाल्यावर लोकांना दाखवण्यासाठी जरी त्यांना राजीनामा द्यावा लागला तरी पुनर्वसन योजनेआंतर्गत त्यांना केंद्रीय मंत्रीपद बहाल केले गेले.
कारगीलमध्ये शहीद झालेल्या वीरांच्या विधवांसाठी देण्यात येणार्‍या घरांच्या जागेवर चक्क राजकीय तसेच लष्करातील अधिकारी सगळेच मिळून डल्ला मारतात. भ्रष्टाचाराचा इतका कडेलोट की नेव्हीची जागा असली तरी त्यांच्याकडून ना-हरकतीचं पत्रं मिळालंय हे खोटंच भासवून मजल्यांवर मजले इतके चढले की शेवटी नेव्हीच्या सुरक्षीततेचा धोका निर्माण झाला. किती आदर्शपणे हा सगळा घोटाळा घडवून आणला आहे नाही. कोणाच्या विरूद्ध बोलण्याची सामान्य जनतेला हिंमत नाहीच. महाराष्ट्रात भूखंडाचे श्रीखंड चापण्याची सुरूवात शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासूनच चालू झालेली आहे. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्त्वात नव्हती तेव्हाची गोष्ट आहे. केंद्रीय मंत्रीपदी असताना सध्याचं लवासा प्रकरणही नारायण राण्यांमुळे दाबलं गेलंय. १८ जूनलाच मटा मध्ये एक बातमी वाचली की मुंबईत सरकारी निवासाचा लाभ घेणार्‍या आय ए एस अधिकार्‍यांनी जुहु येथे "वसुंधरा" या सहकारी हौसिंग सोसायटीत अतिशय कमी दरात चांगल्या भागातले फ्लॅट्स आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. आणि त्यातील अनेक जणांनी तर स्वत: सरकारी निवास स्थानात राहून  वसुंधरा मधील फ्लॅट्स मध्ये भाडेकरू ठेवले आहेत. मध्येच टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा बाहेर आला की जो भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. कितीतरी लाख कोटी रूपयांचं शासनाचं नुकसान झालं. टू-जी स्पेक्ट्रमची विक्री करताना, निविदा मागवणे, तसेच त्यावर चर्चा घडवून आणून योग्य त्यादरात टू-जी स्पेक्ट्रम विकणं अपेक्षित होतं. पण म्हणतात ना पैशाची चटक जात नाही. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री यांनी सरळ सरळ जो पहिल्यांदा बोली लावेल त्याला अतिशय कमी किंमतीत टू-जी स्पेक्ट्रम विकले. काही वर्षांनंतर आता थ्री-जी स्पेक्ट्रमची गरज पडल्याने त्याची विक्री व्यवस्थित निविदा मागवून केली. टू-जी स्पेक्ट्रम विकल्यावर योग्य दर न घेतल्याने सरकारी तिजोरीचे नुकसान झाले.
भारतीय राजकारणी आणि नेते मंडळी यांनी तर भ्रष्टाचार, घोटाळे आणि निर्लज्जपणा यांचे प्रचंड मोठे विक्रम करण्यात गुंतले आहेत. एका मागून एक भ्रष्टाचार बाहेर येत असल्याने सामान्य जनतेला नक्की कशाचा पाठपुरावा करून दोषींवर कारवाई करावी हेच सूचत नाही. तिथंच सगळं संपतं. येवढं सगळं होउन देखिल मेरा भारत महान! "जय हो" भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांचा. 

6 comments:

  1. काय कॉमेंट लिहिणार ताई!
    काहीच सुचत नाही..सगळं वाचून जीव तुटत राहतो बस!

    ReplyDelete
  2. खरंय विभि. आता कळस झालाय सगळ्याचाच. पण हे सगळं कधी संपणार काही समजत नाही. प्रचंड संताप येतो. पण आपन काहीच करू शकत नाही. आणि राजकारणी लोक मोकाट सुटलेत.

    ReplyDelete
  3. अगदी खरय...संताप येतो नुसता हे सर्व पाहुन, पण तो सुद्धा काय कामाचा... :(

    ReplyDelete
  4. फ़क्त संताप अन चिडचिड या पलीकडे काहेच नाही,,,

    ReplyDelete
  5. mi ha lekh ushira vachatoy pan gammat mhanje atachya paristhitilahi ha shobhatoy ha aplyach nirllajapanacha kalas ahe.. ki 2 vashnantarsuddha hich paristhiti asunahi hyach lokana apan parat parat nivadun deto :(

    ReplyDelete